हिंदु-मुस्लीम अन् भोंग्याच्या राड्यात “बेरोजगारीच्या” आकड्यावर नजर मारा, भोंगा वाजेल..!

देशात सद्या फक्त हिंदू- मुस्लिम इतकंच दिसतंय.  रामनवमी असो हनुमान जयंती असो या दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना पाहिल्यात तर कळून येईल कि देशातलं वातावरण काय आहे. तुम्ही न्यूजपेपर, टीव्ही चॅनल्स पाहिलात तर सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्या बातम्याच दिसतील. 

पण या सगळ्या हिंदू-मुस्लिम च्या राड्यात तुम्हाला हे माहितीये का? की, देशातल्या महागाईचा दर काय आहे ? सद्या बेरोजगारीचा दर काय आहे ?

सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरून, हिजाबवरून, हलाल मटणावरून भांडतायत. मग ते सत्ताधारी असोत किंव्हा विरोधक असोत. 

धार्मिक वातावरण पेटवून हिंसाचार घडवणाऱ्या नेत्यांना काय माहित या हिंसा घडवणाऱ्या झुंडीतले कितीतरी तरुण बेरोजगार आहेत. महागाईचे चटके थोडीच श्रीमंत राजकारण्यांना बसणारेत. ते तर सामान्य जनतेलाच सोसावे लागणारे.  

आणि म्हणूनच एकही राजकीय नेता महागाई, वीजटंचाई अन बेरोजगारीबाबत चकार शब्दही काढत नाही. 

सगळ्या बातम्यांमध्ये महागाई आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी हे दोन मुद्दे कायमच झाकोळले जातात किंव्हा झाकले जातात. पण आपण यावर बोललंच पाहिजे. 

पहिलं म्हणजे आत्ताच्या घडीला महागाईचा काय दर आहे ?

भारतात दर वर्षाला वाढणारा दर प्रसिद्ध केला जातो. त्या नुसार, गेल्या मार्च २०२२ मध्ये ६.९५% इतका दर होता. जो ऑक्टोबर २०२० नंतरचा उच्चांक आहे. 

भारत सरकारतर्फे महागाईचा दर जास्तीत जास्त किती असावा यासाठी एक दर ठरवला गेला म्हणजे ६.३५% इतका ज्याची मर्यादा ओलांडली गेली आहे म्हणजेच देशात महागाईचा भडका उडाला आहे.     

खाद्य तेलाच्या किंमतीचा दर १८.७९ % इतक्या टक्क्यांनी वाढलाय. भाजीपाल्याच्या महागाईचा दर ११.६४% आहे. मांस व मासे यांच्या किमतीत पुन्हा सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली आहे, याचा महागाईचा दर ९.६३ टक्क्यांवर आला आहे. 

सलग ६ महिने झालेत अन्नधान्याच्या किंमती वाढतच चालल्या आहेत, सद्याचा ७.६८ % वाढला असून जो गेल्या नोव्हेंबर २०२० नंतरचा उच्चांक आहे.   

कपडे आणि पादत्राणेच्या महागाईचा दर ९.४ टक्के इतका आहे. इंधन आणि विजेचा दर ७.५२ % पर्यंत पोहचला आहे. तर पण आणि तंबाकूचे दर देखील २.९८ टक्क्यांनी वाढलेत.  गृहनिर्माण ३.३८ टक्क्यांनी दर वाढलेत तर विविध गोष्टींमध्ये महागाईचा दर ७.५२ टक्के इतका आहे. 

आता बघू बेरोजगारीचा दर 

अगदी या चालू एप्रिल महिन्यातील एकूण भारतामधील बेरोजगारीचा दर ७.९९ इतका आहे.

मार्च २०२२ – एकूण भारतामधील बेरोजगारीचा दर हा ७.६० इतका आहे त्यापैकी शहरी भागातील ८.२८ तर ग्रामीण भागातील ७.२९ इतका आहे. 

महिना- ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर –  शहरी भागातील बेरोजगारीचा दर. अनुक्रमे….

  • फेब्रुवारी  २०२२ – ८.१० – ७.५५ – ८.३५
  • जानेवारी २०२२ – ६.५७ – ८.१६ –  ५.८४
  • डिसेंबर   २०२१ – ७.९१  –  ९.३० – ७.२८
  • नोव्हेंबर  २०२१ – ६.९७ – ८.२० – ६.४१
  • ऑक्टोबर २०२१ – ७.७४ – ७.३७ – ७.९१
  • सप्टेंबर २०२१ – ६.८६ – ८.६४ – ६.०४
  • ऑगस्ट २०२१ – ८.३२ – ९.७८ -७.६४
  • जुलै २०२१ – ६.९६ – ८.३२ – ६.३४
  • जून २०२१ – ९.१७ – १०.०८ – ८.७५
  • मे २०२१ –  ११.८४ – १४.७२ – १०.५५
  • एप्रिल २०२१ – ७.९७ -९.७८ – ७.१३

आत्ताचं सोडाच गेल्या २० ते २२ वर्षांपासून बेरोजगारीचा दर पाहिल्यास, १९९९ सालात ५.६९ %, २००० मध्ये ५.६६ %, २००१ मध्ये ५.६६%, २००२ मध्ये ५.७२ %, २००३ मध्ये ५.७३ %, २००४ मध्ये ५.६७, तसेच २००७- २००८, २००९……अगदी २०१४ पर्यंत हा दर ५ ते ६ च्या दरम्यानच असायचा.

२०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्या नंतर बेरोजगारीचा दर हा ५.३३ इतका होता जो २०१९ मध्ये थेट ७.११% वर आला. २०२१ मध्ये तो ७.९७ इतका जास्त होता आणि चालू वर्षात हा दर ७.२९ असा आहे. 

थोडक्यात बेरोजगारीचा चढता क्रम वाढतच आहे.  

आणि अशा वाढत्या बेरोजगारीच्या आणि महागाईच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपापसांत भांडलं पाहिजे. पण यांचं कायतर वेगळंच चालूये…असो यातच एक सकारात्मक उदाहरण दिसून आलं ते म्हणजे उत्तर प्रदेशच्या वाराणसी मध्ये.

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये झालं असं कि, स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी रस्त्यावर हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली. काशीमध्ये काही ठिकाणी छतावरून लाऊडस्पीकरद्वारे चालीसा पठण सुरू केले गेले. 

देशभरात लाऊडस्पीकरवर अजान आणि हनुमान चालीसा वाजवण्याचा मुद्दा हळूहळू जोर धरतोय…

एकीकडे हा संवेदनशील विषय सामाजिक वातावरण बिघडवतेय तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या वाराणसी मध्ये समाजवादी पक्षाचे नेते, माजी नगरसेवक रविकांत विश्वकर्मा जे स्वतःच्या घरच्या छतावर सकाळी अन संध्याकाळी लाऊडस्पीकरवर महागाई आणि बेरोजगारीबाबतचे “महंगाई डायन खाये जात है…” गाणे वाजवून या प्रश्नांची नागरिकांना जाणीव करू देत आहे. 

महागाई, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील सरकारचे अपयश लोकांसमोर मांडत त्यांनी आवाहन केले आहे कि, तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित खर्‍या मुद्द्यांपासून तुम्ही विचलित होऊ नका. त्यांची ही आगळीवेगळी कामगिरी सगळीकडे चर्चेचा विषय ठरतेय.

असो हिंदु-मुस्लीम अन् भोंग्याच्या राड्यात “बेरोजगारीच्या” आकड्यावर नजर मारल्यावर देशातील खरं वास्तव कळलंच असेल.

बेरोजगारीची अन महागाईची आकडेवारी सांगत हे गाणं मात्र अजूनही गुणगुणतच आहोत…

सखी सईया तो खूब ही कमात है…….महंगाई डायन खाये जात है

हर महीना उछले पेट्रोल डीज़ल का उछला है रोल

शक्कर बाई के का बोल

हर महीना उछले पेट्रोल डीज़ल का उछला है रोल

शक्कर बाई के का बोल

उसमे बासमती धान मरी जात है

महंगाई डायन खाये जात है

सखी सईया तो खूब ही कमात है

महंगाई डायन खाये जात है……

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.