दहा वर्षे झाली आजही वारंगळमध्ये मुलींची छेड काढण्याच कोणी धाडस करत नाही कारण..
डिसेंबर २००८, आंध्रप्रदेशच्या वारंगल येथे दोन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींवर अॅसिड अॅटक झाला होता. स्वप्निका आणि प्रणीता नावाच्या या मुली मामनूर येथे असलेल्या आपल्या कॉलेजमधून घरी परत येत होत्या. त्यावेळी एका निर्जन ठिकाणी त्यांना स्वप्निकावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या श्रीनिवास रावने गाठले आणि आपल्या साथीदारांसह या दोघींवर हल्ला केला. त्यांच्यावर अॅसिड फेकले.
मामनुर हा तेलंगणामधला ग्रामीण भाग आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या होत्या. सगळ्या भागात दहशतीच वातावरण पसरल होतं. मुलीना कॉलेजला पाठवाव की नाही या चिंतेत पालक होते.
अशा वेळी ही केस गेली तिथले एसपी यांच्याकडे. त्यांनी तीनही आरोपींना घटनास्थळी चौकशीला नेले. तिथे त्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांना यमसदनी धाडले. इतक्या झटपट आपल्याला न्याय मिळेल हे त्या मुलींच्या पालकांना स्वप्नातही वाटले नसेल.
हे एन्काउन्टर केलं होतं व्ही.सी.सज्जनार यांनी.
त्यावेळी काही मानवाधिकार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप केले. पण सज्जनार यांनी स्पष्टीकरण दिलेलं की त्या आरोपींनी घटनास्थळावर काही शस्त्र व अॅसिड लपवून ठेवले होते. पंचनामा करण्यासाठी त्यांना तिथे नेले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यावाचून पर्याय नव्हता.
आजही त्यांना वारंगळ भागात दुवा दिली जाते. त्यांच्यामुळे तिथला सडकसख्याहरीची दहशत मोडीस काढली गेली. मुली ताठमानेने आपल्या शाळा कॉलेजनां जाऊ शकल्या.
त्यांनी योग्य केले अयोग्य केले ही गोष्ट दुसरी पण त्यानंतर कुठल्याही मवाल्याने एखाद्या मुलीची छेड काढायचा स्वप्नातही विचार केला नाही.
१९९६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असणारे व्ही सी. सज्जनार आपल्या धडाकेबाज स्टाईल साठी फेमस आहेत. जन्गाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. इंटेलिजन्स ब्युरोच्या आयजीपदी ही त्यांनी काम केलं आहे. त्यावेळी माओवाद्यांच्या विरुद्ध झालेल्या मोठ्या ऑपरेशनच नेतृत्व त्यांनी केलं.
तिथेच त्यांना एन्काऊंटर स्पेशालीस्ट ही बिरूद मिळाल.
गेल्या वर्षी हैदराबाद ग्रामीण उर्फ सायबराबाद येथे पोलीस कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आयटी इंडस्ट्रीमुळे वेगाने विकसित होणारा भाग म्हणून सायबराबादला ओळखल जातं. ग्रामीण भागात अचानक होत असलेला बदल, खेळता पैसा गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत होता. अमेरिकन टाईमिंग प्रमाणे काम करावे लागत असल्यामुळे महिला कर्मचार्यांना रात्री अपरात्रीही ऑफिस ला जावे लागत होते. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा झाला होता.
सायबराबाद मध्ये नियुक्ती झाल्या झाल्या सज्जनार यांनी घोषणा केली होती की महिलांची सुरक्षितता हा आपल्यासाठी प्राधान्याचा विषय असणार आहे.
मात्र काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑफिस मधून परतत असताना गाडी पंक्चर झालेल्या दिशावर ४ तरुणांनी बलात्कार केला आणि तिला जाळून ठार केले तेव्हा सायबराबाद मधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देशभर चर्चिला गेला.
व्ही.सी. सज्जनार यांच्या टीमने काही तासांतच गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी आपला गुन्हा देखील कबूल केला.
मात्र आपल्या देशातील बलात्कारानां शिक्षा देणारे कायदे कडक केले जावेत अशी मागणी देशभरात केली गेली. खुद्द राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी गुन्हेगारांना जनतेच्या हवाली करावे अशी मागणी केली होती. लांबत जाणाऱ्या कायदेशीर प्रक्रीयेमध्ये गुन्हेगारांना शिक्षा मिळेलच की नाही यावरून काहीजणांनी शंका व्यक्त केली होती.
लवकरातल्या लवकर बलात्कार्यांना मोठ्यातमोठी शिक्षा व्हावी असा देशभर आक्रोश होता.
दुसऱ्या दिवशी पहाटे व्ही.सी. सज्जनार यांची टीम दिशाचा खून जिथे झाला त्या ठिकाणी चारही गुन्हेगारांना घेऊन गेली असता दहा वर्षापूर्वी जसे घडले त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्या गुन्हेगारांनी पोलिसांचे हत्यार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर गोळीबारही केला याचे प्रत्युत्तर देताना चारही आरोपींचा पोलिसांच्या हातून मृत्यु झाला.
अनेक ठिकाणी मिडिया त्यांचे वर्णन खऱ्या आयुष्यातला सिंघम केले गेले. यावेळी देखील सज्जनार यांच्यावर टीका झाली. मात्र दिशाच्या आईने माझ्या मुलीला सज्जनार यांनी न्याय मिळवून दिला अशी प्रतिक्रिया दिली होती.
नुकताच झालेल्या युपीमधील हाथरस बलात्कार घटनेवेळी पोलिसांनी दाखवलेली बेपर्वाई पाहून येथे सज्जनार यांच्या सारखा खमक्या अधिकारी हवा होता अस बोललं जातं आहे.
हे ही वाच भिडू.
- या IPS महिलेनं १५ महिन्यात १६ अतिरेक्यांना खात्मा केला होता तर ६४ जणांना तुरूगांत डांबलं होतं.
- तर सोहराबुद्दीन सांगलीत असता..!
- प्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर !
- अधिकाऱ्यांच गाव : या गावातल्या प्रत्येक घरात IAS, IPS आहे.