शेवटची रेल्वे चुकणार म्हणून शिंदेनी अटलजींना सायकलवर डबलशीट बसवून नेलं
साठच्या दशकातला काळ. तेव्हा जनसंघ अजून भाजप बनला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे पालन करणारा हा पक्ष अजून देशभरात रुजायचा होता. संपूर्ण भारतातून त्यांचे फक्त चारच खासदार तेव्हा निवडून आले होती. स्वातंत्र्यलढचे गारुड अजून जनतेच्या मनातून उतरले नव्हते, नेहरूंच्या काँग्रेसला हरवणे जवळजवळ अशक्य मानलं जात होतं.
अशातच जनसंघाचा तरुण खासदार देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता,
त्यांचं नाव अटलबिहारी वाजपेयी
फक्त चारच खासदार होते पण अवघ्या तिशीतल्या वाजपेयींची लोकप्रियता त्या काळात देखील भरपूर होती. त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर खुद्द पंतप्रधान नेहरूंना देखील लोकसभेत बेजार केलं होतं. असं म्हणतात कि खुद्द पंडितजींनी परदेशी पाहुण्यांपुढे त्यांची ओळख भारताचा भावी पंतप्रधान म्हणून करून दिली होती.
महाराष्ट्रातला अहमदनगर हा साखरेची पंढरी म्हणून फेमस असलेला जिल्हा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीच संगम असलेला हा भाग, दुष्काळी पट्टा असला तरी महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ इथल्याच प्रवरा नदीच्या साक्षीने झाली. इथल्या श्रीरामपूर तालुक्यातच इंग्रजांनी पहिला साखर कारखाना सुरु केला होता.
इतके असले तरी अजून या तालुक्यात म्हणावा तितका विकास अजून पोहचला नव्हता.
या तालुक्यातील बेलापूर बुद्रुक हे आधीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेलं गाव. इथे जनसंघाची स्थापना करायचं म्हणून वाजपेयींना पाचारण करायचं ठरलं. सुरवातीला काहीजणांना वाटलं की इतक्या आडमार्गाच्या गावाला वाजपेयी येतील की नाही.
मात्र ठरलेल्या दिवशी अटलजी दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर पढेगाव स्टेशनवर उतरले.
तिथून बेलापूर गाव आठ किलोमीटर दूर होतं. रस्ता प्रचंड कच्चा होता. एसटी बस वगैरे सोयी नव्हत्या. त्याकाळी टांगे असायचे. त्यांच्या स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांच्या सोबत अटलजी टांग्यात बसून बेलापूरला आले.
या कार्यक्रमासाठी आरएसएसचे माधवराव डावरे, बद्रीशेठ हरकूट, अण्णाजी जाधव, पांडुरंग शिंदे, वासुदेव कोळसे, मुरलीधर खटोड, राधेशाम व्यास असे कार्यकर्ते उपस्थित होते.
वाजपेयींच्या उपस्थितीत बेलापूर परिसरात दिवसभर जनसंघाच्या प्रचार कार्यासंदर्भात भरगच्च कार्यक्रम झाले.
कामाच्या व्यापात त्यांना जेवणाचेही भान राहिले नाही. रात्री उशिरा १० वाजता त्यांची परतीची रेल्वे होती. पण प्रचाराच्या सभांमुळे वाजपेयींना संध्याकाळी निघायला उशीर झाला. टांगे व इतर प्रवासाची साधने देखील आता बंद झाली होती. आता परत कस निघायचं हा प्रश्न पडला.
त्यावेळी एक पांडुरंग शिंदे नावाचे संघाचे कार्यकर्ते तेलाचा घाणा चालवायचे. त्यांच्याकडे सायकल होती. ते वाजपेयींना सायकलवरून सोडण्यास तयार झाले.
त्याकाळी हा भाग म्हणजे निव्वळ निर्मनुष्य जंगल होते. त्यामुळे इथून रात्रीच्या वेळी प्रवास करणे म्हणजे अनेकांना धडकी भरायची.
शिंदे यांच्या सायकलला मागे कॅरियर देखील नव्हते. प्रचाराला आलेले जनसंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार व भावी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी शिंदेच्या सायकलच्या नळीवर बसले.
पढेगाव ते बेलापूर हा आठ किलोमीटरचा रस्ता दगडमातीचा होता. त्याला मोठमोठे खड्डे पडलेले होते. एका छोट्या कार्यकर्त्याच्या सायकलवर बसून वाजपेयींनी तो प्रवास केला आणि रात्रीची ट्रेन पकडली. त्या रात्री स्टेशनवर त्यांनी मुरमुरे खाऊन आपली भूक भागवली होती.
बेलापूरवासी हि आठवण कधीच विसरले नाहीत. पुढे जेव्हा वापेयी पुन्हा नगर दौऱ्यावर आले होते तेव्हा बेलापूरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हक्काने गावात आणलं आणि जंगी मिरवणूक काढली. या अशा नेत्यांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे दोन-चार खासदार असणारा पक्ष आज तीनशेच्यावर खासदार निवडून आणणारा देशातला सर्वात मोठा पक्ष बनला.
हे ही वाच भिडू.
- या एका अटीवर वाजपेयी चक्क काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार झाले होते
- अटलजी खामगाव बँकेच्या चेअरमनला म्हणाले, आमच्या पक्षाला कर्ज देणार काय ?
- निवडणूक हरलेले अटलजी अडवाणींना म्हणाले, फिर सुबह होगी
- कराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते !
Karyakare etake bhikhari hote aalelya netyala upashi station var sodun dile
Murmure khaun parat jave lagale
Pakhandala Seema aasatat ki nahi