वास्को द गामाला रस्ता या माणसानं दाखवला आणि भारताचा इतिहास बदलला

अहमद इब्न माजिद या माणसाचं नाव आपल्याला माहित असायचं कारण नाही. अरबी माणूस, १४३२ सालचा व्यापारी. पण याच माणसानं भारताचा नकाशा बदलण्याचं आणि युगाची कुसपालट करण्याचं काम केलं होतं.

कारण वास्को-द-गमाला भारतात आणून इथं परकी सत्तेचा पाया रोवण्यात या माणसाचा वाटा होता.

अहमद इब्न माजिद याच्या घरातच जहाज बनवायचा धंदा होता. वयाच्या १७ व्या वर्षीपासून त्यानं समुद्री सफर करायला सुरुवात केली. त्याचे वडील स्वतः नावाजलेले खलाशी होते. या माणसानं आपलं अर्धं आयुष्य समुद्रावर घालावलं असं म्हणावं लागेल इतका त्याचा महासागरात वावर होता.

त्याने नक्की कधीपासून हा उद्योग केला याची तारीख माहित नाही पण त्या काळी तीन खंडांमध्ये त्याच्या नावाचा दरारा होता. सागरात प्रवास करणारा धाडसी वीर म्हणून तो प्रसिद्ध होता. कोलंबस आणि बाकीचे लोक यात उतरण्यापूर्वी कित्येक भारतीय आणि आफ्रिकन माणसांनी यात हातखंडा मिळवला होता.

१५०० सालच्या आसपास त्याचा मृत्यू झाला. पश्चिमेकडे अनेक वर्षे त्याची ख्याती गामाला भारताचा मार्ग दाखवणारा माणूस म्हणून सर्वश्रुत होती. हा माणूस मनानं कवी होता. त्याने लिहिलेली कवितेची जवळपास ४० पुस्तके आजही अरेबिक भाषेत प्रसिद्ध आहेत. त्याला ओमान आणि इतर भागांमध्ये समुद्रावरचा सिंह म्हणून ओळखले जात असे.

इब्न माजिद यानं समुद्राच्या ज्ञानाविषयी, सागरी सफारीच्या विज्ञानावर अनेक पुस्तके लिहिली. पूर्व आफ्रिका, भारत आणि जगातील इतर काही स्थानांवर पोचण्यासाठी त्याने अनेक लोकांना मदत केली. पर्शियामध्ये समुद्रमार्गे उतरणारा तो पट्टीबाज खलाशी होता. त्याने जहाजांच्या हालचाली कशा कराव्यात आणि समुद्रात विविध प्रसंगात जहाज कसे तारून न्यावे याची इत्यंभूत माहिती आपल्या लेखनात दिली आहे.

‘किताब आलं फवाईद उसूल इल्म आल बहर वा कवाईद’ आपल्या पुस्तकातून तो बरच प्रसिद्ध झाला. या पुस्तकात “खलाशीकामाची तत्त्वे, मूलभूत बाबी आणि फायदे” याचं इत्यंभूत वर्णन त्यानं केलं आहे. हा खलाशीकाम आणि त्यासंबंधीच्या माहितीचा ज्ञानकोशच आहे असे म्हणता येईल. यात त्याने समुद्रपर्यटनची मूळ तत्त्वे, त्याचे विज्ञान, चंद्राचा समुद्रावर होणार प्रभाव, लाटांची गती, मुक्त समुद्रातील चलन अशा अनेक गोष्टी त्यानं यात मांडल्या आहेत.

पूर्व आफ्रिका, इंडोनेशिया, भारतातला पाऊस, मौसमी वारे, वादळे आणि इतर अनेक गोष्टींवर त्याने आपल्या लेखनातून प्रकाश टाकला आहे.हिंदी महासागराच्या कानाकोपऱ्यात कसं फिरावं याची माहिती त्याच्या पुस्तकात आहे.

त्याला समुद्रगमनाचे मुआल्लीम म्हणजे गुरु म्हणून संबोधले जाते. त्याचे बरेचसे गणित आणि प्रवास हा ताऱ्यांच्या जागेवरून आणि ग्रहांच्या माहितीवरून होत असायचा.

वास्को द गामा हा आफ्रिकेच्या पुढे भारतात कसा आला यासंबंधी अनेक गोष्टी इतिहासकारांनी लिहून ठेवल्या आहेत. ऑटोमन तुर्कांनी १४१४ साली कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकले. याच शहराचे नाव नंतर बदलून इस्तंबूल करण्यात आले. युरोपातून भारताकडे येणारा मार्ग इस्तंबूल मधून येत असे. मात्र हा मार्ग बंद झाल्यानंतर समुद्रमार्गे भारतात येण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती. त्यासाठी अनेकजण तयार होते पण हा मार्ग कुणाला सापडत नव्हता.

सरतेशेवटी आपल्या अंदाजाने अनेक खलाशी भारताच्या शोधात निघाले मात्र ते दूरवर भटकत राहिले. वास्को द गामा हासुद्धा पोप आणि राजाच्या आदेशाने दूरच्या सफरींवर निघाला होता. मालिंदीच्या राजाने त्याची ओळख इब्न मजीद याच्याशी करून दिली.

त्या काळी देशनमध्ये नवनवे मार्ग शोधण्यासाठीजीवघेणी स्पर्धा लागलेली होती, त्यामुळे कोणीही खलाशी आपल्याला माहित असणारे ज्ञान बाहेर सांगत नसे. अशा काळात आपल्या अनुभवावर जगातील सर्व लोकांचा अधिकार आहे अशा उदार मनाने मजीद याने आपल्या लेखनातून आपले अनुभव सर्वांसाठी खुले केले.

त्याने वास्को द गामाला हा मार्ग सांगितला. त्यानुसार तो भारतात येऊन पोचला आणि जगाच्या इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले.

काही इतिहासकारांच्या मते एका दारूच्या नशेत असणाऱ्या गुजराती माणसाने वास्को द गमाला भारताचा मार्ग सांगितलं होता. आणि हा व्यापारी भारतात आल्यानंतर पोर्तुगालला परतही गेला होता. पण यासंदर्भात इतर कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. शिवाय हा प्रवास तब्बल २३ दिवसांचा होता. त्यामुळे असे काही घडले असण्याची शक्यता फार अल्प आहे.

त्याने लिहिलेल्या एंक पुस्तकांचा वापर करून पोर्तुगीजपुढे जगभर  फिरले. त्याचे नाव मात्र जनतेच्या स्मरणातून कायमचे गेले. युरोपीय आणि इतर लोकांना नौकायनाची अतिशय त्रोटक माहिती असतानाच्या काळात हा माणूस जीवावर उदार होऊन जग फिरला होता. ‘किताब आलं फवाईद उसूल इल्म आल बहर वा कवाईद’ हे जवळपास प्रत्येक खलाशाकडे मिळणारे पुस्तक होते. त्या पुस्तकांशिवाय प्रवास करू नये असं म्हटलं जाई. या पुस्तकात अगदी तक्त्यांचा स्वरूपातील माहितीसुद्धा दिलेली आहे.

त्याने स्वतः लिहिलेली काही पुस्तके त्याच्याच हस्ताक्षरात अजूनही फ्रान्सच्या संग्रहालयामध्ये आहेत.

पण पाश्चात्त्य देशांत त्याच्या नावाची चांगली दखल घेतली गेली आहे.

आत्तापर्यँतचा सगळ्यात गाजलेला हॉलीवूडपट म्हणजे स्टार ट्रेकची सिरीज. २४ व्य शतकात अंतराळात फिरणाऱ्या अनेक यानांची करामत यात दाखवली आहे. त्यात  २३९० साली कप्तान अलोन्झो वॉन्डरमीर याच्या जहाजाचे नाव USS इब्न मजीद NCC ७५७१० असं ठेवलं आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.