२५ वर्षांपुर्वी बांग्लादेशी नागरिकांनी दिल्लीजवळ ही “नसबंदी कॉलनी” उभा केली.

बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न आजही तसाच आहे. बांग्लादेशी घुसखोर या एका शब्दावरुन देशभरातलं वातावरण अनेकदा चिघळवण्यात अनेक राजकारणी लोकांना यश आलं आहे. आज CAA, NRC चा विषय लावून धरण्यात आला आहे. यातून जे घुसखोर सापडतील त्यांच्यासाठी कॅम्प उभारणार असल्याची देखील चर्चा आहे.

आजच्या सारखीच बांग्लादेशी घुसखोरांची समस्या 20-25 वर्षांपुर्वी देखील होती. बांग्लादेशी नागरिकांना सरकारमार्फत हाकलून लावण्याचे प्रयत्न चालू होते. अशाच एक सरकारी स्किम आली आणि बांग्लादेशी नागरिकांनी या स्किमचा फायदा घेवून आपली कॉलनी तयार केली. या कॉलनीच नाव आहे नसबंदी कॉलनी. बांग्लादेशी नागरिकांच्या भारतात स्थानिक होण्याचा हा अजब किस्सा.

नसबंदी कॉलनी.

देशाच्या राजधानीच्या अगदी जवळ गाझियाबाद जिल्ह्यात ही नसबंदी कॉलनी आहे. २०-२५ वर्षांपूर्वी ही कॉलनी देखील शहरातील टिपिकल उपनगरांसारखी “बुद्धनगर” या नावाने ओळखली जायची. नाव जरी बुद्धनगर असलं तरी बहुतांश बांगलादेशी नागरिकांची ही वस्ती होती. पोलिसांकडून वारंवार धाड घालून ही वस्ती उठवायचा प्रयत्न सुरु होता. ज्यात पोलिसांना यश देखील आलं होत. मात्र यादरम्यानच वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकार मार्फत एक विचित्र योजना सुरु करण्यात आली,

“नसबंदी करा आणि मोफत जमीन मिळवा”.

या योजनेच्या घोषणेनंतर तब्बल ५ हजार लोकांनी नसबंदी करून घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणात नसबंदी झाल्यानेच हे नगर नसबंदी कॉलनी या नावाने ओळखलं जावू लागलं. या योजनेनुसार नसबंदी केलेल्या लोकांना बुद्ध नगरमध्ये ४५० स्क्वे. फुटाचा प्लॉट देण्यात आला. त्यामुळे या कॉलनीला मिळालेलं नाव हे सरकार तफ्तरी देखील जोडलं गेलं. 

आज या कॉलनीची अवस्था काय आहे…?

नसबंदीचा खरच उपयोग झाला का.. ?

आज या कॉलनीत पक्के रस्ते नाहीत. जागोजागी कचरा साठलेला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. घाणीमुळे पसरणाऱ्या रोगांमुळे बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे. शैक्षणिक व्यवस्थेबाबत देखील हीच परस्थिती आहे. सरकातर्फे या परिसरात कोणत्याही शाळा, कॉलेज सुरु करण्याचा प्रयत्न झालेला नाही.

बहुतेक नसबंदी कॉलनी मध्ये लहान मुले नसतीलच असा समज सरकारचा झालेला असावा. राजधानीच्या इतक्या जवळ असून देखील हि कॉलनी इतकी दुर्लक्षित आहे कि पालिकेचे सफाई कर्मचारी देखील इकडे यायचे कष्ट घेत नाहीत. सरकारनेच सुरु केलेली आणि सरकारतर्फेच विस्मृतीत गेलेली देशातील हि पहिली कॉलनी असेल.

आता तुम्ही म्हणाल कि नसबंदी योजनेनंतर अशी किती लोक या कॉलनी मध्ये राहत असतील ? नसबंदी केल्यानंतर देखील या ठिकाणाची लोकसंख्या कशी काय वाढत आहे ? याच उत्तर देखील आपल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी च्या प्रक्रियेत आहे.

नसबंदी कॉलनी मध्ये जमीन मिळवण्यासाठी लोकांनी आपल्या बायकांची शस्त्रक्रिया करून घेतली आणि जमीन मिळाल्यानंतर दुसरं लग्न करून आपला संसार वाढवला. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित व्हायच्या ऐवजी बहुपत्नीत्वाची पद्धत वाढली आणि पर्यायाने लोकसंख्या देखील वाढली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.