विवेक ओबेरॉयला एकच सांगणे आहे, आता तरी त्या राड्यातून बाहेर ये.
१ एप्रिल २००३
भारताच्या सगळ्या न्यूज चॅनलवर एक प्रेस कॉन्फरन्स सुरु होती. फिल्मस्टार विवेक ओबेरॉय ही प्रेस कॉन्फरन्स घेत होता.
“२९ तारखेला रात्री १२, १२.३० वाजताची ही घटना आहे. सलमान खानने मला फोन केला. मला अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. मला तो म्हणाला तू अगदी माझ्या सारखा बॅड गाय आहेस. तेव्हा मी त्याला म्हणालो की मी तुझ्यासारखा वाईट नाही. मी मुलींचा रिस्पेक्ट कसा करायचा हे जाणतो. “
आधी तर जनतेला कळेना नेमक काय झालय. काही जणांना वाटलं की एप्रिल फुल चालू आहे. पण नंतर एक नाव आलं त्यामुळ सगळा उलगडा झाला. ऐश्वर्या राय
राम गोपाल वर्माच्या कंपनी या गँगस्टर सिनेमामधून जबरदस्त एंट्री करणारा, यशराजच्या साथिया सारख्या हळूवार प्रेमकथेतून आपली छाप सोडणारा विवेक ओबेरॉयची संभावना अनेक जण पुढचा सुपरस्टार म्हणून करत होते. वेगवेगळ्या रोल मध्ये आत्मविश्वासपूर्ण अभिनय सुखावणारा होता. फॅन्स बरोबर क्रिटिक सुद्धा त्याच कौतुक करत होते. विवेकचं विमान सुद्धा फुगून हवेत उडत होते.
हाच तो काळ होता जेव्हा सलमान खानचं करीयरचा ग्राफ घसरला होता. फक्त फिल्मचं नाही पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील बऱ्याच घटना घडत होत्या. हम दिल दे चुके सनम च्या सेटवर त्याचे आणि ऐश्वर्या रायचे जुळलेले प्रेमाचे धागे तो पर्यंत विस्कटून गेले होते. सलमानची अतिदारू पिण्याची सवय, पझेसिव्हनेस याला ऐश्वर्या कंटाळली होती.कधीकधी तो तिच्यावर हात उचलतो अशी ही चर्चा होती.
याच दरम्यान तिच्या आयुष्यात आला विवेक.
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, विवेक यांचा क्यू हो गया ना? या नावाचा सिनेमा येत होता. तिथे असं म्हणतात की नुकताच सलमान बरोबर ब्रेक अप झालेल्या ऐश्वर्याला आधाराचा खांदा दिला विवेक ओबेरॉयने. दोघांच्या जवळ येण्याच्या स्टोरीज गॉसिप सर्कल मध्ये फिरू लागल्या. आधीच ऐश्वर्यासाठी पझेसिव्ह असणाऱ्या सलमानचे डोके फिरले नसेल तर नवल. त्याने विवेकला फोन वर काय डोस दिला माहित नाही पण विवेकनेसुद्धा हवा करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली.
आजही आपल्या पैकी अनेकांना लाल शर्ट घालून वरची दोन बटने काढून पत्रकार परिषद घेणाऱ्या विवेकची मूर्ती आठवत असेल,
“सलमान ने मला मारण्याची धमकी दिली. तो रात्रभर मला फोन करत राहिला. त्याने ४१ वेळा फोन केला. पण मी त्याला प्रत्येकवेळी समजावून सांगत राहिलो. अखेर मी त्याला म्हणालो माझ्याशी फायटिंग करायचे असेल तर माझ्या घरी ये. मी किक बॉक्सिंगचा चँपियन आहे.”
विवेक ओबेरॉयला वाटले की या प्रेस कॉन्फरन्समुळे आपल्याला फायदा होईल. लोक सलमानला शिव्या देतील, आपण ऐश बरोबर लग्न करून सुखाचा संसार करू. पण घडलं उलटचं. फिल्म इंडस्ट्रीमधूनही कोणी विवेकला साथ दिली नाही. ऐश्वर्याबरोबर त्याच्या नात्याने काही पुढची स्टेप गाठली नाही. शिवाय क्यू हो गया ना सुद्धा सुपर फ्लॉप झाला.
जनता सुद्धा या सगळ्यामध्ये सलमानला सहानुभूती देत होती. विवेकला फोन स्वीच ऑफ करता येत नव्हता काय? एकेचाळीस वेळा फोन का घ्यायचा? आणि भांडण असतील तर ती अशी पब्लीकली कशाला चव्हाट्यावर आणायची असं मत व्यक्त होत होतं.
विवेक च्या करीयरला तिथून ग्रहण लागल. त्याच म्हणण होत की सलमान ने सगळ्यांना धमकी दिली होती की विवेकला घ्यायचं नाही. पण त्याला करण जोहर शाहरुख खानचा काल, सुभाष घई यांचा किस्ना असे बिग बजेट सिनेमे मिळाले. पण ते काही चालले नाही. हळूहळू विवेक सिनेमामधून गायब होत गेला.
नाही म्हणायला त्याचा शूट आउट अॅट लोखंडवाला सुपरहिट झाला. पण परत त्याने फ्लॉप सिनेमाची रांग लावली. कधी स्वतःच्या अभिनयाची तुलना अमेरिकन सुपरव्हिलन हिथ लीजरच्या जोकर बरोबर कर तर कधी सलमानची जाहीर कार्यक्रमात कान पकडून माफी माग असे चाळे त्याने केले. पण काही उपयोग झाला नाही.
आपल्याला सिनेमे मिळत नाही कारण आपण अभिनय भंगार करतोय ही गोष्ट त्याने स्वीकारलीच नाही. आपल्या अपयशाचं कारण सलमान आणि ऐश्वर्या आहेत हे तो वेगवेगळ्या मुलाखती मध्ये सांगत राहिला.
दरम्यानच्या काळात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. सलमान परत फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनला, ऐश्वर्यासुद्धा अभिषेक बच्चन बरोबर लग्न करून सेटल झाली. तिला एक मुलगी देखील आहे. तिच्यासाठी सलमान, विवेक ओबेरॉय वगैरे सगळा जुना भूतकाळ झालाय. सलमानने देखील त्या घटनेनंतर कधीही कोणत्याही कार्यक्रमात विवेक ओबेरॉय, ऐश्वर्याबद्दल उल्लेख ही केला नाही. फक्त एकदाच करण जोहरने त्याला ऐश्वर्यावरून डिवचल्यावर “वो अब ऐश्वर्या राय बच्चन है” इतकच बोलून त्याने तिच्याबद्दल बोलण टाळल.
पण विवेक बाबाचे अजूनही अच्छे दिन आलेले नाही आहेत. त्याच्या मेनस्ट्रीम फिल्मी करीयरला ब्रेक लागलाय. तो सध्या राजकरणात हातपाय मारायचा प्रयत्न करतोय. मोदीजींच्या आयुष्यावर निघालेल्या बायोपिकमध्ये त्याने काम केलंय. पण या सिनेमावरून बरेच वाद झाले, कोर्टात केसेस झाले. आता येत्या २४ ला कसाबसा तो सिनेमा रिलीज होतोय.
आता राजकारणात तरी विवेक सेटल होईल असं वाटत होत पण तेव्हड्यात त्याने परत २००३च्या प्रेस कॉन्फरन्ससारखी चूक केली आणि यावेळीही या चुकीमागे ऐश्वर्या होती. त्याने ऐश्वर्या राय वर टीका करणारं एक मिम ट्विट केलं. त्यावरून पूर्ण देशभरातून त्याच्यावर जोरात टीका झाली. महिला आयोगाने देखील या ट्विटची दाखल घेतली आहे. त्याला त्याबद्दल माफी मागायला लावली आहे.
प्रश्न उरतोय विवेक ओबेरॉय!! त्याला एकच सांगण आहे, बाबा आता तरी २००३ या सालातून बाहेर ये. तुझी एक्स होती म्हणाव एवढा वेळ सुद्धा ऐश्वर्या तुझ्याबरोबर नव्हती. कशाला त्या लग्न झालेल्या पोरबाळ असणाऱ्या बाईला त्रास देतोस. कामाकड लक्ष दे आणि जमल तर काही चांगले सिनेमे कर, आहे तुझ्यात पण टॅलेंट वाया घालवू नको.
हे ही वाच भिडू.
- निर्जरा सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.
- त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.
- बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर सलमान खान एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला हजर झाला !