शनी महाराजांच्या नावाने सुद्धा ज्यांची टरकते त्यांनी नक्की वाचायला पाहिजे.
आज शनिवारी सकाळी सकाळी एका मोठ्या नामांकित वृत्तपत्रात ‘या राशींना शनीची साडेसाती सुरू’ अशी बातमी वाचली. साडेसाती आणि शनी हे नावच इतकं महान आहे ना, विचारू नका. मनात म्हंटल आपल्या राशीला काय वाढून ठेवलंय पाहूया. वाचत वाचत शेवटपर्यंत आलो खरं काही ठोस घावलचं नाही.
त्यात आणि शनी असा काही पहिल्यांदा ऐकलय असं ही नाही. म्हणूनच आज म्हंटल आज शनी साहेबांची माहिती शोधूनच काढायची. कोण आहेत हे ? कुठून आलेत ? काय काय करतात ? हे सगळंच शोधुया म्हंटल.
पाहिले तर या शनी महाराजांची जन्मकथा बघू.
तर ब्रम्हदेवाचा पुत्र मरिची, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपाचे पुत्र द्वादश, आदित्य, मार्तंड यापैकी मार्तंड हा अत्यंत प्रतापशाली होते. हे मार्तंड म्हणजेच आपले सूर्यदेव…
देवशिल्पी विश्वकर्माने आपली संज्ञा नावाची अत्यंत तेजस्वी कन्या मार्तंडला दिली. या संज्ञेला सूर्यापासून (मार्तंडापासून) दोन मुल झाली. मुलाचं नाव यम आणि मुलीच नाव यमुना ठेवलं गेलं. मार्तंडचं तेज अत्यंत प्रखर असं होत ते संज्ञेला काही सहन होईना. तेव्हा तिने आपल्याच रुपाची प्रतिमा निर्माण केली आणि तिच नाव छाया ठेवलं. छायेला घरात ठेऊन संज्ञा घोडीचं रूप धारण करून तप करण्यासाठी उत्तरकुरुप्रदेशात निघून गेली. जाताना तिने हि गोष्ट मार्तंडाला न सांगण्याबद्दल छायेला बजावल आणि छायेनेही ते कबुल ही केलं होतं.
पुढे छाया मार्तंडाच्या घरी संज्ञा म्हणूनच राहू लागली. यम व यमुनावर ती आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करू लागली. याच काळात छायेला सूर्यापासून दोन मुलं झाली. पुत्राच नाव शनि व मुलीच नाव तपती किंवा तापी असं ठेवलं गेलं.
शनिचा जन्म पौष शु. अष्टमी शनिवारी संध्याकाळी झाला. शनिने आपला प्रताप जन्मापासूनच दाखवायला सुरवात केली. पुत्र जन्माची वार्ता ऐकूण सूर्य आपल्या रथातून पुत्र मुख पाहण्यासाठी आले. त्यावेळी शनिची दृष्टी सूर्याच्या सार्थ्यावर पडताच तो पंगु झाला व रथाचे घोडे अंध झाले. मग कृपादृष्टीने शनि पाहताच ते पूर्ववत झाले.
पुढ छाया मुलांशी भेदभावाने वागू लागली. यमाला आणि यमुनेला सावत्र मुलांप्रमाणे वागवू लागली. हे जेव्हा सूर्याला कळालं तेव्हा तो रागाणे लालबुंद झाला. तो छायेला म्हणाला आपल्या मुलांशी भेदभावाने वागतेस हे योग्य नाही, तरी छायेच्या वागणुकीत फरक काही पडला नाही. अशातच यम एकेदिवशी आपल्या पित्याला सूर्याला म्हणाला,
पिताजी हि आमची आई नाही कारण हि फक्त शनिवर व तप्तीवरच प्रेम करते माझ्याशी व यमुनेशी शत्रुत्वाने वागते.
यमाने सूर्याकडे केलेली तक्रार ऐकताच छायेला राग आला तिने यमाला शाप दिला की तू प्रेतांचा राजा होशील. छायेने असा शाप दिला असता पुत्र कल्याणाची इच्छा असलेला सूर्य यमाला म्हणाला तू काळजी करू नकोस, तू मनुष्यांच्या पापपुण्याचा निवडा करशील आणि लोकपाल म्हणून स्वर्गात प्रतिष्ठा तुला प्राप्त होईल.
आणि त्यावेळी छायेवर सूड उगविण्यासाठी सूर्याने शनिला शाप दिला, पुत्रा तुझ्या मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील. मग सूर्याला कळले कि छाया हि आपली खरी पत्नी नव्हे. त्याने छायेला खरा प्रकार विचारला. छायाने सगळं खरखंर सांगून टाकलं. मग सूर्य संज्ञा तप करीत होती तिथे गेले आणि नंतर तिला प्रसन्न करून आपल्याबरोबर घेऊन आले.
अशाप्रकारे शनिंची वक्रदृष्टी पडली की लोकांना अडचणी येतात. पण मारूतींची प्रार्थना केली की शनिदेव प्रसन्न होतात असं म्हणतात. तर यामागे ही एक गोष्ट आहे.
शनि आणि मारुती बद्दल अशी क लोक कथा सांगितले जाते कि कोणे एके काळी जगाचा अहंकार घालविणाऱ्या शनि महाराजांनाच गर्व झाला. ते त्या नशेत रामभक्त मारुतीकडे आले. त्यांनी आरोळी ठोकली,
हनुमंता ! आता मी तुझ्या राशीला येणार आहे ! तयार राहा !
बिचारे मारुतीराय काही एक प्रती उत्तर न करता स्तब्धच राहिले. पुन्हा शनि महाराजांनी सांगितले. मारुती तू रामभक्त आहेस. म्हणून तुला विचारतोकी, तुझ्या राशीला केव्हां येऊ ! कारण जे देवभक्त, सत्याचे उपासक, जगउद्धारक असतात त्यांच्या राशीला मी येतो. पण ते त्यांच्या इच्छेप्रमाणे व ते सांगतील तितकाच काळ.
मारुती हसले आणि म्हणाले, शनिदेव माझ्या राशीला लागून तुला काय फायदा ? मी अमर आणि ब्रम्हचारीहि आहे. त्याचप्रमाणे जगाच्या उलाढाली पासून अगदीच अलिप्त आहे. मला तू त्रास काय आणि कसा देणार ? यावर शनि महाराज म्हणाले, ते काम माझे ! तू रामभक्त आहेस म्हणूनच तुला सतवायचे आहे. सारे साधूसंत, देव-दैत्य साडेसातीतून पार पडले आहेत आता फक्त तुचं उरलास. तुला छळले नाही. तर माझा पराक्रम कमी प्रतीचा ठरेल. मी अजिंक्य ठरणार नाही. झालं..! मारुती म्हणाले, येतो म्हणतोस तर ये बाबा.
दुसऱ्या दिवशी पहाटेच शनिमहाराज मारुती समोर येऊन दाखल झाले व त्या रामदुताच्या डोक्यावर बसले. मारुतीने आपल्या दैवी सामर्थ्याने आपल्या भक्तांना अशी आज्ञा केली कि, त्यांनी आज पूजेला आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले न ठेवता मोठे दगडच मारावेत. दगडांचा वर्षाव सुरु झाला. ते सर्व दगड अर्थातच शनिमहाराजांनाच लागतं. एखादा चुकून मारुतीला लागलाच तरी ते व्रजदेहीच.
अखेर शनिची घाबरगुंडी उडाली. ते उठावयास लागले तर मारुतीने त्यांचे पाय पकडून ठेवले आणि म्हटले, बसा कि राव नुकतेच आलात आणि एवढ्यात जाता होय. हि कुठली तुमची मुलखा वेगळी का रीत झाली. अखेर शनिला आपली चूक कळून आली आणि त्याने मारुतीयांना वरदान देऊन टाकले कि,
आजपासून तुझे जो ध्यान करील त्याला मी छळणार नाही. माझ्या नावाने तुझी पूजा केली तरी ती मलाच पावेल. तेव्हा शनिच्या साडेसातीत गांजलेल्या लोकांनी मारुती आराधना जरूर करावी असं सांगितलं जातं.
हिस्ट्री बेस्ड माहिती तुम्ही वाचलीत पण साडेसाती म्हणजे नेमकं काय ?
तर जुन्या काळी भारतीयांना गुरु, शनी, युरेनस इत्यादी ग्रह माहीत होते. त्यांचे मानवावर होणारे परिणाम म्हणुन साडेसाती हा प्रकार पुढे आला. शनीचा आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला संस्कृतमध्ये ’मंद’ म्हणतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या माणसाची जी (चंद्र)रास असेल त्या राशीत किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत जेव्हा शनी असतो, तेव्हा ता माणसाला साडेसाती आहे असे समजले जाते.
पण शनीचाच कोप का? कारण शनीला कडी आहेत हे ही आपल्या पुर्वजांना माहीत होते. त्याचा कोप घालवायला शिख कडी घालतात, आणि हिंदु अंगठ्या. अशाप्रकारे शनीच्या साडेसातीची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !
टीप – ही शनीची गोष्ट आहे. भिडू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.