मिटकरींच्या निमित्ताने समजून घ्या ; महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास काय होता..
अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत ब्राह्मण समाजावर टिका केली. त्यानंतर ब्राह्मण संघाकडून अमोल मिटकरीचा निषेध करत पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास तुम्हाला सांगू वाटतो.
महाराष्ट्रात “ब्राह्मण्य” वादावर टिका करत ब्राह्मण्यतर चळवळ उभारण्यात आली होती. राजर्षी शाहू महाराज, केशवराव जेधे, वि.रा.शिंदे, भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर, अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, प्रबोधनकार ठाकरे, सीताराम बोले, श्रीपतराव शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकूंदराव पाटील, दाजीराव विचारे, गंगाजी काळभोर, आनंदराव सुर्वे, निंबाळकर, पांडुरंग जाधव अशी अनेक मंडळी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीचा पाया होती.
महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळ का सुरू झाली..
ब्राह्मणेत्तर चळवळीची पाळेमुळे ही जोतिबा फुलेंनी पेरलेल्या सत्यशोधक चळवळीत होती. धार्मिक परंपरा, चातुर्वण्य पद्धत यावर जोतिबा फुलेंनी आक्षेप घेतले. त्यातूनच सत्यशोधक चळवळीचा पाया रोवला गेला.
पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त प्रकरणाने ब्राह्मणेतर चळवळीला जोर दिला. सत्यशोधक चळवळीचे पुर्नजीवन, वेदोक्त प्रकरण व त्यातून निर्माण झालेल्या राजकीय मागण्या व त्यास असणारा राजर्षी शाहू महाराजांचा पाठींबा या गोष्टी महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळ उभारण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख गोष्टी होत्या.
जोतिबा फुलेंची असणारी सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळीचे झालेले राजकीय सुधारणांची चळवळ अस स्वरूप ब्राह्मणेत्तर चळवळीचं सांगितलं जातं.
ब्राह्मणेत्तर चळवळीचा प्रवास
ब्राह्मणेत्तर चळवळीची पाळेमुळे ही मॉंटेग्यु यांच्या सुधारणांमध्ये असल्याचं सांगितलं जातं. १९१७ साली एडविट मॉंटेग्यु हे भारतमंत्री झाले होते. त्यांनी हप्त्याहप्त्याने भारतीयांना जबाबदार सरकार देण्यात येईल अस सांगितलं.
त्या काळात कॉंग्रेसमध्ये फक्त ब्राह्मण जातीचाच पगडा होता. त्यामुळे स्वातंत्र मिळाले, जबाबदार शासन मिळाले तरीसुद्धा ही सत्ता ब्राह्मणांच्याच हातात जाईल याची जाणीव इथल्या शिकलेल्या मराठ्यांच्यात निर्माण झाली. त्या काळात डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठी लीग अशा ब्राह्मणेत्तर संघटना निर्माण होत होत्या किंवा झाल्या होत्या.
डेक्कन रयतन समाज ही १९१६ साली अस्तित्वात आलेली संघटना ही ब्राह्मणेत्तरांची पहिली संघटना समजली जात होती. १९१७ साली विरा शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला होता. तर भास्करराव जाधव, बाबूराव जेधे यांनी ऑल इंडिया मराठा लीग स्थापन केली होती. ब्राह्मणांना विरोध करून ब्राह्मणांची मक्तेदारी संपवून काढणं हेच मुळ या संघटनांच्या स्थापनेत होतं.
शाहू महाराज ही मोठ्ठी शक्ती उभा राहिली..
राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत १८८९ साली वेदोक्त प्रकरण घडले होते. तेव्हा राजपुरोहित नारायण भटजीने वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणले त्याचं कारण शाहू महाराज हे शुद्र असल्याचं सांगितलं. भटजीच्या या उत्तरामुळे शाहू महाराजांच्या क्षत्रियत्वाला आव्हान मिळाले व ब्राह्मणांचा हा धार्मिक अहंकार मोडून काढण्याचा पण शाहू महाराजांनी घेतला.
शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर संघटनांना पाठबळ देण्यास सुरवात केली त्यामुळे ब्राह्मणांची मक्तेदारी संपुष्टात आणणारी एक टिमच महाराष्ट्रात उभा राहिली. या टिमलाच ब्राह्मणेत्तर चळवळ अस म्हणलं गेलं. यात प्रामुख्याने मराठा जातीच्या व्यक्तींचाच समावेश होता.
या चळवळीतलं महत्वाचं नाव म्हणजे मारूतीराव जेधे आणि जेधे कुटूंब. बाबूराव, केशवराव, सखाराम, बळवंत ही चार मारूतीराव जेधेंचे पुत्र. जहागिरदार, जमीनदार असणाऱ्या जेधेंची पुण्यातील शुक्रवार पेठेत असणारी जेधे मॅन्शन हे ब्राह्मणेत्तर चळवळीचं प्रमुख केंद्र बनली.
स्वतंची वर्तमान पत्रे काढण्यापासून ते आर्थिक शोषणावर प्रकाश टाकणे, राजकीय सुधारणा घडवून आणणे ही कामे ब्राह्मणेत्तर पक्षाने खूप जाणीवपूर्वक व नेटाने केली.
याच पुण्याच्या जेधे मॅन्शनमध्ये १२ डिसेंबर १९२० रोजी बाबूराव व केशवराव जेधे, भास्करराव जाधव, धनजीशहा कूपर, आनंदस्वामी, गंगाजी काळभोर, बाबूराव जगताप, वालचंद कोठारी यांनी ब्राह्मणेत्तर पक्षाची स्थापना केली.
ब्राह्मणांना विरोध करत बहुजन समाजात जागृती निर्माण करण्याच काम या पक्षाने केलं. १९२० ते ३८ सालापर्यन्त ब्राह्मणेत्तर पक्ष मुंबईच्या कायदेमंडळात होता. पक्षाच्या स्थापनेपासूनच या पक्षाचे १२ ते १५ आमदार निवडून येवू लागले होते. १९२० च्या कालखंडानंतर या पक्षाला संपूर्ण भारतात घेवून जाण्याचे प्रयत्न करण्यात येवू लागले.
पण ब्राह्मणेत्तर हे नाव जातीवाचक असल्याने पक्षाला शेतकरी किंवा बहुजन पक्ष अस नाव देण्याची मागणी होवू लागली. धनजीशहा कुपर मंत्री झाले होते. कुपर यांच्यासोबतच भास्करराव जाधव, सिद्धप्पा कांबळे यांना देखील ब्राह्मणेत्तर पक्षाकडून मंत्रीपदे मिळाली.
पुढे १९३७ सालात या पक्षात फुट पडली. कूपर आणि जवळे यांनी नागरिक शेतकरी पक्षाची स्थापना केली. तर दौंड व सावंत यांनी मुंबई इलाखा शेतकरी पक्षाची स्थापना केली. नंतरच्या काळात ब्राह्मणेत्तर पक्षाच्या नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरवात केली आणि पुढे १९३८ साली ब्राह्मणेत्तर पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला…
हे ही वाच भिडू
- सातारचा नगराध्यक्ष ते मुंबई राज्याचा पंतप्रधान झालेला माणूस..
- बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणलं ते केशवराव जेधे यांनी..
- बहुजन समाजाच्या विकासासाठी राज्यपालपद नाकारणारे जेधे एकमेव नेते असतील