कट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं होतं…
आयपीएलची फायनल अगदी जल्लोषात आणि थाटामाटात पार पडली. मॅच सुरू होण्याच्याही आधी काय गाजलं असेल, तर आयपीएलचा समारोप सोहळा. नेहमीप्रमाणे बॉलिवूडच्या सिताऱ्यांची हजेरी, गाणं, डान्स असं बरंच काही या समारोप सोहळ्यात झालं.
पण या सगळ्यात कुठली गोष्ट गाजली असेल, तर ती म्हणजे ए आर रेहमानचं गाणं.
रेहमान स्टेजवर आला तेव्हाच कित्येकांच्या अंगावर काटा आला असेल, त्यात जेव्हा त्यानं ‘माँ तुझे सलाम’ गायला सुरुवात केली तेव्हा तर कहरच झाला. २०११ च्या वर्ल्डकप फायनलवेळी सगळं स्टेडियम एका सुरात ‘वंदे मातरम’ गात होतं आणि यावेळी स्वतः रेहमान. पण हे गाणं गाण्यापर्यंतचा रेहमानचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
रेहमानच्या गाण्यांमध्ये असलेली मेलडी, वेगवेगळ्या ट्यून्स, ऐकणाऱ्या लोकांना मोहित करून टाकतात. पण रेहमानच्या नावाचा किस्साही त्याच्या गाण्यांइतकाच प्रसिद्ध आहे.
धार्मिक मुद्यांमध्ये रेहमान कधी अडकत नाही मात्र त्याच्या आत्मचरित्रात त्यानं एक किस्सा सांगितलेला की, एका हिंदू ज्योतिषानं मला मुस्लिम नाव दिलं होतं.
रेहमानचं पूर्वीचं नाव होतं दिलीप शेखर. घरची परिस्थिती बेताची होती, त्यात वडील आजारी पडले आणि दुर्धर आजाराने गेले. घरात कायम चिंतेचं वातावरण, पैशाची अडचण अशा सगळ्या परिस्थितीत हा परिवार सापडला होता. याच दरम्यान दिलीप शेखरच्या घरचे एका मुस्लिम पीराला खूप मानायचे.
दिलीपची बहीण एकदा आजारी पडली, त्या पिराकडे दिलीपच्या घरचे तिला घेऊन गेले. त्यानं काही उपचार केले आणि बहीण बरी झाली. याच दिवशी दिलीपच्या आईनं कस्तुरीनं ठरवलं की, आता आपण इस्लाम धर्म स्वीकारायचा. पण आता इस्लाम स्वीकारला म्हणल्यावर नाव बदलावं लागेल असं सांगण्यात आलं. दिलीप परिवारासोबत एका ज्योतिषाकडे गेला.
ज्योतिषी हिंदू होता, नाव बदलण्याव्यतिरिक्त दिलीपच्या आईला मुलीच्या लग्नाबद्दलही विचारायचं होतं. ज्योतिषाने आधी दिलीपला बघितलं त्याला त्याच्यात काहीतरी वेगळं वाटलं. दिलीपला नाव बदलायचं होतं, आईने विचारलं कि दिलीप तुला कोणतं नाव आवडेल ?
तेव्हा दिलीप म्हणाला, ‘अब्दुल रेहमान किंवा अब्दुल रहीम.’ त्याचबरोबर हेही सांगितलं की, अब्दुल रहीम रेहमान सुद्धा चालेल कारण ए आर रेहमान हे शुभ नाव आहे.
नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ए आर रेहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक पुस्तकात रेहमान सांगतो की, एका हिंदू ज्योतीषानं मला मुस्लिम नाव दिलं, हीच आपल्या देशाची विविधता मला भावते.
रेहमान नाव दिलीपनं ठेवलं पण पुढे जाऊन अब्दुल रहीम ऐवजी अल्ला रख्खा हे कायम केलं.
जागतिक संगीतात प्रवेश करण्याचा रेहमानचा प्रवास सुद्धा सुंदर आहे. एका जिंगलसाठी रेहमानला अवार्ड मिळाला आणि त्या अवार्ड सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम हे सुद्धा उपस्थित होते, मणिरत्नम यांची भेट रेहमानशी झाली, रेहमानचं कौतुक ऐकून ते भारावून गेले होते.
रेहमानचं काम आणि गाणं त्यांनी ऐकलं आणि रेहमानला चित्रपटासाठी संगीत दे म्हणून साइन केलं. २५ हजार रुपयांमध्ये रेहमानने मणिरत्नम यांचा चित्रपट संगीतबद्ध केला.
१५ ऑगस्ट १९९२ साली रोजा चित्रपट आला. या चित्रपटाने सगळ्या जगाला दाखवून दिलं कि ए आर रेहमान काय चीज आहे. रेहमानला भलेही कंप्यूटर जगातला संगीतकार मानतात मात्र त्याने आपल्या गाण्यातून असं कधीही जाणवू दिलं नाही. भारतीय संगीत ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे मेलडी, रेहमानने मेलडी सोडली नाही.
भारतात वंदे मातरम वरून अनेकदा वाद, चर्चा निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी रेहमानने सांगितलं होतं की, ‘इस्लाम धर्मात मला शांतता मिळते, इस्लाम हे फक्त शांततेचं प्रतीक आहे.’ त्यावेळी कट्टर धर्मीय लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमाननं वंदे मातरम गायलं आणि पुढे त्याचा अल्बम सुद्धा काढला.
सोनी म्युझिक कंपनीचा प्रचंड खपाचा हा अल्बम होता. रेहमाननं देशभक्तीपर गाणी अशा अंदाजात सादर केली की ती सगळीच गाजली.
रेहमान म्हणतो कि, ”सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे, देश माझ्यासाठी सर्वोच्च स्थानावर आणि सर्वप्रथम आहे.”
इतकं नाव कमवूनही त्याचं आपल्या मातीशी किती घट्ट नातं आहे, हे त्याने ऑस्कर वेळी दाखवून दिलं होतं. ऑस्कर स्वीकारताना दीवार चित्रपटातला ‘मेरे पास माँ हें’ हा डायलॉग तो म्हणाला आणि तेव्हा त्यानं लोकांची मनं जिंकली.
यंदाच्या आयपीएलच्या फायनलवेळीही त्यानं जेव्हा वंदे मातरम गायलं, तेव्हा अंगावर शहारा आला, जो २०११ च्या वर्ल्डकपवेळीही आला होता आणि अगदी पहिल्यांदा त्याच्या तोंडून वंदे मातरम ऐकलं तेव्हाही आला होता…
हे ही वाच भिडू:
- सुखविंदरने गायलेलं छैयां छैयां ऐकून रेहमानने त्याला दर्ग्यात माथा टेकवायला नेलं.
- शिवमणीचं ड्रम वादन म्हणजे हान की बडिव न् धुरळा उडिव….
- या भिडूने टाईमपासमध्ये गाडीत बसून गाणं बनवलं आणि आज तेच गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंड करतंय…