भारत पाकिस्तान मॅचमुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची चर्चा क्रिकेटच्या भाषेत झाली होती…

गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले, कुठल्याही कट्ट्यावर जा योगी, केजरीवाल, चन्नी आणि सिद्धू ही नावं फिक्स चर्चेत आहेत. कट्ट्यावरची पोरं कोण का हरलं, कोण का जिंकलं यांचा अंदाज मांडायला व्हा पेनं घेऊन बसलीच होती, तेच त्यांना दुसऱ्या गोष्टीत डोकं खुपसावं लागलं. विषय थोडासा किचकट असला, तरी महत्त्वाचा आहे त्यामुळं पोरं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय सांगणार? घरनं पैशे कमी मागवायचे का जास्त या विवंचनेत गेली. आणि तुमचे भिडू लोक म्हणजे आम्हीच, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा इतिहास शोधू लागतो. इतिहास हा रटाळ विषय नसतोच, त्यात कायतर भारी घावतं…

आम्हाला घावलं, मग म्हणलं तुम्हाला सांगावं…

३० मार्च २०११, देशातलं वातावरण वेगळं आणि महाष्ट्रातलं वातावरण वेगळं अशी स्थिती होती. राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. त्यानंतर त्याच्यावर चर्चा आणि प्रश्नोत्तरे सुरु झाली. ३० मार्चला अर्थसंकल्पावरच्या चर्चेचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. अर्थमंत्री विधानसभेत आणि अर्थराज्यमंत्री विधानपरिषदेत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार होते.

पण त्या दिवशी देशात वेगळीच गडबड सुरु होती.

सगळ्या भारतीयांसाठी तो दिवस महत्वाचा होता. कारण भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडत होते. त्या दिवशी मोहालीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल होती. एकतर भारत-पाकिस्तान सामने २६/११ नंतर बंद झाले होते. खूप वर्षांनी या दोन्ही टीम समोरासमोर येत होत्या आणि त्यात वर्ल्डकप सेमीफायनल म्हणल्यावर आधीच तापलेलं वातावरण स्फोटक बनलं होतं.

शाळेत जाणाऱ्या पोरांच्या पोटात, डोक्यात दुखायला सुरुवात झाली होती. निम्मा भारत सुट्टीवर गेला होता. तिकडं पाकिस्ताननं सरकारी सुट्टी जाहीर केली होती. दोन्ही देशाची मिडिया तापलेली होती. राष्ट्रभक्तीचा चेव आला होता.

क्रिकेटच्या चर्चेमध्ये निवृत्त सेनाधिकारीसुद्धा तावातावानं भारतानंच सामना जिंकला पाहिजे असं सांगताना दिसत होते.

एकीकडं सगळा देश क्रिकेटच्या महायुद्धात रंगला होता आणि महाराष्ट्राचे आमदार बिचारे अर्थसंकल्पासारख्या बोरिंग विषयावर चर्चा करणार होते.

पण आपले आमदारही हुशार होते, सगळ्या आमदारांनी विधीमंडळात आदल्या दिवसापासून फिल्डिंग लावली. विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चा नेहमी ११ वाजता सुरु होते आणि विधानपरिषदेत १२ वाजता. सगळ्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून ती चर्चा १ तास आधीच घ्यायचं ठरलं.

मॅच आहे म्हणून कॉंग्रेसचे निलेश पारवेकर आणि भाजपचे आमदार जयकुमार रावल हे दोघे जण थेट क्रिकेटची जर्सी घालून विधानसभेत आले होते.

काही आमदारांनी थेट सुट्टी मारली होती. यात प्रमुख होते सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ.

भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि विधान परिषदेतले भाजपचे आमदार विनोद तावडे मंगळवारीच मॅच बघायला मोहालीला गेले होते.

जे हजर होते त्यांना देखील अर्थसंकल्पाच्या चर्चेत विशेष रस नव्हता. सगळेजण मॅचचा निकाल काय लागणार याचीच चर्चा करत होते. काही वेळातच विधानसभेतील चर्चा आवरती घेण्यात आली. अर्थमंत्र्यांना उत्तर देण्याचा वेळच मिळाला नाही.

इतरवेळी भांडणारे आणि राडा घालणारे सगळ्या पक्षांचे आमदार एकत्र आले आणि सर्वानूमते अर्थमंत्र्याचं उत्तर दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आलं.

बरोबर १ वाजता विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील सभागृहाबाहेर आले. तेव्हा काही तरुण आमदारांनी त्यांच्याभोवती कोंडाळं केले. गुंडाळी केलेल्या कागदांचा माईक त्यांच्यासमोर धरून एक लय भारी प्रश्न विचारण्यात आला.

“साहेब मॅच कोण जिंकणार?”

इकडं बाकीचे आमदार मॅच पाहण्याची वेळ चुकेल म्हणून गडबडीत विधान भवनाबाहेर सटकताना दिसत होते. अजून विधानपरिषदेची चर्चा बाकी होती. तिथल्या आमदारांच्यात तर वेगळाच जोश आला होता.

चर्चेवेळी सगळे आमदार क्रिकेटच्या भाषेत बोलत होते.

तेव्हा भाजपमध्ये असलेले आमदार धनंजय मुंडे यांनी तर सुरुवाती पासून क्रिकेटिंग भाषेत टोलेबाजी सुरु केली. त्यांच्या आधी भाषण केलेल्या राष्ट्रवादीच्या हेमंत टकले यांच्याबद्दल ते म्हणाले की,

‘‘टकले साहेबांचं वक्तृत्व चांगलं होतं. मात्र खराब मैदानावर एखाद्या कसलेल्या खेळाडूला आपलं कसब दाखवताना जी कसरत करावी लागते, ती टकले यांना करावी लागत होती.’’

धनंजय मुंडे यांचं पुढचं टार्गेट होते काँग्रेसचे भाई जगताप. त्यांच्याकडे बघून ते म्हणाले,  

‘‘भाईंचीही तशीच अवस्था झाली होती. अर्थसंकल्पात सांगण्यासारखे काही नसल्यामुळे भाईंना हातवारे करण्यावरच जास्त भर द्यावा लागला होता. शेवटी मात्र त्यांनी चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखाद्या खेळाडूने नो बॉलवर षटकार मारावा, तशी फलंदाजी त्यांनी केली.’’

मुंडे यांच्या बोलण्यात क्रिकेटचेच संदर्भ जास्त येऊ लागले तेव्हा उपसभापती वसंत डावखरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले,

‘‘तुम्ही अर्थसंकल्पावरील भाषण करत आहात की क्रिकेटची कॉमेंट्री?’’

त्यांच्या बोलण्यावर सभागृहात एकच हशा पिकला. तिकडं भारत आणि पाकिस्तान मैदानात भिडायची तयारी करत होते आणि इकडं महाराष्ट्राचा दिवस अर्थसंकल्पाच्या चर्चेपेक्षा क्रिकेटमयच ठरला. ज्या गोष्टीमुळं आमदारांचं लक्ष विचलित झालेलं, ती मॅच मात्र भारतानं जिंकली आणि पुढं जाऊन वर्ल्डकपही मारला… त्यानंतर मात्र जर्सी घालून आमदार विधानभवनात आलेत हे चित्र दिसलं नाही.

संदर्भ – http://rahibhide.blogspot.com

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.