पेरियार कोण होते..?
१९०४ चं साल…
तामिळनाडूच्या एका सुखवस्तू घरातला मुलगा काशी विश्वनाथला गेला. तिथे फिरताना पोटात कावळे ओरडायला लागल्याने तो एका ढाब्यावर जेवणासाठी गेला, पण तो ब्राम्हण नसल्याने त्याला अन्न नाकारण्यात आलं. तो थोडासा बाजूला गेला, कुठूनतरी एका जानव्याची व्यवस्था केली आणि परत धाब्यावर गेला. तरीही पहिले पाढे पंचावन्न. विशेष म्हणजे तो ढाबासुद्धा एका ब्राम्हणेतर व्यक्तीचा होता. पोटात आग होती आणि खायला अन्न मिळत नव्हतं, कारण काय तर तो ब्राह्मण नव्हता. अशा स्थितीत त्यानं काय केलं असेल ..? त्यानं आजूबाजूला पडलेल्या पत्रावळ्यातलं उष्ट अन्न खाऊन पोटाची खळगी भरवली. पण या प्रसंगाने तो पुरता हादरला. समाजात असणाऱ्या जातिव्यवस्थेचं भीषण स्वरूप अनुभवून झाल्याने, या विरोधात आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यानं ठरवलं आणि समाजात घट्ट असणाऱ्या ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात लोकांना संघटीत करायला सुरुवात केली. इ.व्ही. नायकर रामास्वामी किंवा ‘पेरियार’ असं त्याचं नांव.
‘पेरियार’ या तमिळ शब्दाचा अर्थ अतिशय उच्च प्रतिष्ठा असणारं व्यक्तिमत्व थोडक्यात महात्मा. पेरियार हे विसाव्या शतकातील तमिळनाडूतील फार मोठे समाजसेवक आणि राजकीय नेते. तामिळनाडूमध्ये विवेकवादी चळवळ रुजविण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. तर्काधारित आणि वैज्ञानिक दृष्टी असलेल्या समाजाची निर्मिती हे त्यांचं उद्दिष्ट्ये होतं. माणसं ज्यावेळी तर्कशील आणि विज्ञानवादी होतील, त्यावेळी समाजातील जातिवाद आपोआपच संपुष्टात येईल, अशी त्यांची मांडणी होती. तमिळ राष्ट्रवाद, अब्राम्हनी चळवळ, महिलांविषयक प्रश्न यासंदर्भात पेरियार यांनी तामिळनाडूमध्ये फार मोठं काम उभारलं. पेरियार यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना मानणारा मोठा वर्ग तामिळनाडूमध्ये अस्तित्वात आहे. ‘पेरियार’ हा तामिळनाडूतील नागरिकांच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
ब्राम्हण ही जात आणि ब्राम्हण्य या संकल्पनेत ते फरक करत असतं. आपला ब्राम्हण समाजाला विरोध नसून ब्राम्हण्याला विरोध आहे, असं ते म्हणायचे. धर्माच्या नावाखाली उच्च जातींकडून, कनिष्ट जातींच्या करण्यात येणाऱ्या शोषणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. उच्चजातीय लोकांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय आणि अत्याचारावर सडकून टीका केली. लोकांना संघटीत केलं. त्यातूनच ब्राम्हणेतर अशा द्रविड चळवळीचा जन्म झाला. तामिळनाडूच्या राजकारणात जी काही मोठी नावे आहेत, ती सर्व नावे याच द्रविड चळवळीतून आलेली आहेत.
पेरियार यांची महिलांच्या प्रश्नांविषयीची भूमिका काळाच्या खूप पुढची होती. ते स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक होते. कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळावेत, यासाठी पेरियार यांनी त्या काळात आवाज उठविला. विधवा विवाहाचं त्यांनी समर्थन केलं. पतीच्या अकाली निधनानंतर विधवा झालेल्या स्त्रीने आपलं उर्वरित आयुष्य कुढत बसू नये. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आपलं आयुष्य सुखाने घालवण्यासाठी पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे, असंही ते सांगत.
तमिळ ही भारतातील सर्वात जुनी भाषा आहे आणि म्हणून आपण आपल्या गौरवशाली भाषेचा, सन्मान केला पाहिजे. आपली समृद्ध तमिळ परंपरा जपली पाहिजे, असं ते लोकांना सांगत. त्यामुळेच त्यांचा हिंदी भाषेला त्यांचा जोरदार विरोध होता. १९३७ साली ज्यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमधील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याचा जोरदार विरोध झाला. हा विरोध करण्यात पेरियार सर्वात पुढे होते. पेरियार यांचं स्वातंत्र्य तमिळ राष्ट्राच्या मागणीस समर्थन होतं.