यावर्षी महिलांचं क्रिकेट खेळवण्यात आलं, पण पुरुषांचं क्रिकेट कॉमनवेल्थ गेम्समध्ये का नसतं ?
यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं सिल्व्हर मेडल जिंकलं. तसं भारताला गोल्ड मेडल मिळालं असतं, पण शेवटच्या टप्प्यात भारतीय बॅटर्स गंडल्या आणि गोल्ड मेडल जिंकण्याची संधी भारताच्या हातून निघून गेली. भारतीय खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये चांगलं यश मिळवलं, ज्या खेळांमध्ये आपल्याला पदकाची अपेक्षाही नव्हती, तिथं भारतानं यश मिळवून दाखवलं.
पण ज्या क्रिकेटमध्ये आपण गोल्ड जिंकू असं म्हणलं जात होतं, तिथं मात्र सिल्व्हरवर समाधान मानावं लागलं. महिलांचं क्रिकेट पार पडल्यावर एक साधा सिम्पल प्रश्न पडला,
महिलांचं क्रिकेट खेळवलं गेलं मग पुरुषांचं क्रिकेट का नाही ?
क्रिकेटचा शोध लावला ब्रिटिशांनी, कॉमनवेल्थ गेम्समध्ये कधीकाळी ब्रिटिश अधिपत्याखाली असणारे देशच समाविष्ट होतात, जे देश क्रिकेटमध्ये यशस्वी आहेत, त्यातले बहुसंख्य देश कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळतायत, तरी पुरुषांचं क्रिकेट खेळवण्यात का आलं नाही, याचं उत्तर सापडतं बीसीसीआयच्या धोरणात आणि वर्चस्वामध्ये.
मेन विषयाकडे वळण्याआधी थोडासा इतिहास पाहायला हवा…
आजवर कधीच कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांचं क्रिकेट झालं नाही, अशातली गोष्ट नाही. १९९८ मध्ये मलेशियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या वनडे क्रिकेटचा समावेश होता. त्यात तब्बल १६ क्रिकेट संघ समाविष्ट झाले होते. यात सध्या क्रिकेटविश्वात फारसे न दिसणारे नॉर्दन आयर्लंड, कॅनडा आणि यजमान मलेशिया हे संघ होते. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या झेंड्याखाली एकत्र येणारे बार्बाडोस, अँटिग्वा, जमैका हे देश वैयक्तिकरित्या समाविष्ट झाले होते.
भारताचा संघ खेळणार का नाही, याबाबत तेव्हा खतरनाक चर्चा घडत होती…
तेव्हा भारतीय क्रीडा विश्वात दोन गट पडले, एका बाजूला भारतीय क्रिकेट टीमनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळावं यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आग्रही होतं, तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयचा आग्रह होता की भारतीय संघानं आधीच ठरल्याप्रमाणं पाकिस्तानविरुद्ध सहारा कपमध्ये खेळावं.
या भांडणाचं केंद्रबिंदू होता सचिन तेंडुलकर. दोन्ही गटांची, टेलिव्हिजन हक्क बाळगणाऱ्यांची इच्छा होती की, तेंडुलकरनं आपल्याकडच्याच स्पर्धेत खेळावं. अखेर भारताच्या स्टार खेळाडूंची दोन गटात विभागणी झाली आणि तेंडुलकर कॉमनवेल्थ गेम्सच्या संघात गेला. मात्र भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये अपयश आलं आणि साधी ग्रुप स्टेजही भारताला पार करता आली नाही.
भारतानं कॉमनवेल्थमध्ये टाकलेल्या टीममध्ये सचिन, जडेजा, लक्ष्मण, कुंबळे सोडले तर फार दिग्गजही नव्हते. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या क्रिकेटला मिळणारा प्रतिसाद ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार की नाही हे ठरवणारा होता.
हे माहीत असूनही बीसीसीआयनं कॉमनवेल्थ गेम्सला झुकतं माप दिलं नाही, याला अर्थातच कारणं होती.
बीसीसीआयला आपली स्वायत्तता आणि क्रिकेटवरचा कंट्रोल गमवायचा नव्हता, १९९१ नंतर भारतानं धोरणात केलेले बदल आणि जाहिरात क्षेत्रामुळे असलेल्या प्रचंड संधी यामुळं बीसीसीआय चांगलीच श्रीमंत झाली होती. साहजिकच त्यांना यात वाटेकरी मंजूर नव्हता.
त्यात तेव्हा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष असणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी बीसीसीआयला नॅशनल स्पोर्ट्सच्या अधिपत्याखाली आणायचे प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळं बीसीसीआय इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला आणि पर्यायानं सरकारला उत्तर द्यायला बांधिल ठरली असती.
ज्याचा धक्का बीसीसीआयच्या आणि त्याचे तत्कालीन सर्वेसर्वा असणाऱ्या जगमोहन दालमिया यांच्या साम्राज्याला बसला असता.
सुरेश कलमाडींनी तेव्हा हे सगळे प्रयत्न क्रिकेटला ऑलिम्पिक गेम बनवण्यासाठी सुरू असल्याचं सांगितलं होतं, मात्र दालमियांनी त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. पुढे जाऊन दालमिया आयसीसीचे अध्यक्ष झाले, सगळ्या जगातलं क्रिकेट त्यांच्या कंट्रोलमध्ये आलं, मात्र तेव्हाही क्रिकेटचा ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश व्हावा यासाठी त्यांनी हिरवा कंदील दाखवला नाही.
यामागचं अजून एक कारण सांगण्यात येत होतं की, १९९८ मध्ये कॉमनवेल्थ सारख्या मोठ्या आणि वेगवेगळे खेळ असलेल्या स्पर्धेत क्रिकेटला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळं हातात असलेला वेळ आणि उत्पन्नाची संधी क्रिकेट बोर्डांना गमवावी लागली. त्यामुळं क्रिकेट बोर्ड आणि विशेषतः बीसीसीआय फारसे उत्सुक नव्हते.
पुढं २०१४ मध्ये क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हायला हवा का, यासाठीही बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची होती, पण तिथंही नकारच कळवण्यात आला आणि साहजिकच क्रिकेटला आणखी व्यापक स्टेजवर नेण्याची आणखी एक संधी हुकली.
दिवस बदलत गेले तसं बीसीसीआयनं आपली भूमिका काहीशी सौम्य केली, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशा प्रसिद्ध नसलेल्या देशांमध्येही क्रिकेट लोकप्रिय होत आहे.
२०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्सची घोषणा झाली, तेव्हा यात महिलांच्या आणि पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला. मात्र नंतर स्पर्धेचं ठिकाण ठरवण्यात वेळ लागला आणि तोवर पुरुषांच्या क्रिकेटचं इतर सामन्यांचं वेळापत्रक नक्की झालं. साहजिकच पुरुषांचं क्रिकेट यंदाच्या स्पर्धेत दिसलं नाही.
२०२८ मध्ये लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश असेल, असं सध्यातरी सांगण्यात येतंय. बीसीसीआयही दोन्ही संघ पाठवण्यास अनुकूल आहे. त्यामुळं ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्टेजवर क्रिकेट खेळलं जाऊ शकतं.
आता धोरणात बदल केला जात असला, तरी १९९८ च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि त्यानंतरही दालमिया आणि बीसीसीआयनं भूमिका बदलली असती, तर क्रिकेटचा प्रसार आणखी काही देशात झाला असता आणि भारताच्या मेडल्सच्या संख्येमध्येही वाढ झाली असती.
बीसीसीआयकडून इतकी वर्ष होणाऱ्या विरोधाचं कारण अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणाऱ्या भारताच्या महिला टीमच्या जर्सीवर बीसीसीआयचा लोगो तेवढा नव्हता…
हे ही वाच भिडू:
- म्हणून टिका होते “कॉमनवेल्थ”चा सदस्य असणं ही लाज वाटणारी गोष्ट आहे..
- देशात कोण गिणत नव्हतं, आज भारतानं ॲथलेटिक्समध्ये ८ पदकं जिंकलीत…
- क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.