वसंता, तू मला अशा ठिकाणी नेवून बसव जिथून इंदिरा बाईंना सिगरेटचा वास जाणार नाही..
राजकारणात फसवाफसवी जूनी नाही. खरतर समोरच्या व्यक्तीला फसवणं हा राजकारणाचा पहिला नियमच. असच एकदा यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींना फसवलं होतं. पण त्याचं कारण पाहिलं तर यशवंतराव एका नेत्याहून एक सामान्य माणूस होते आणि सामान्य व्यक्तीसारख्याचं त्यांच्या फसवण्यासंबधीत भावना प्रामाणिक होत्या हेच लक्षात येईल,
हा किस्सा सांगितला आहे ते कराडचे यशवंतरावांचे सहकारी वसंतराव वराडकर यांनी. मार्च २०१२ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी हि आठवण राष्ट्रवादी मासिकामध्ये सांगितली होती.
वसंतराव वराडकर सांगतात,
“यशवंतराव आणि आमचं सामायिक घर होतं. दोन्ही घरात एकच भिंत. कधी त्यांच्या घरात जास्तीचे पाहूणे आले तर आमच्या घरात झोपत तर कधी आमच्या घरात जास्तीचे पाहूणे आलेत तर त्यांच्या घरात झोपत. असा आमचा घरोबा. एके दिवशी मुलींना डिएडचे शिक्षण देणाऱ्या कमला नेहरु कॉलेजच्या उद्धाटनाला त्या आला होत्या. त्या वेळेला यशवंतराव चव्हाणांनी मला बोलवून घेतलं आणि इंदिरा गांधीसाठी जेवणाची व्यवस्था करण्याच सांगितलं.”
यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधीच्या जेवणाची सोय करायला सांगितल्यानंतर वसंतराव थेट कराडचे श्रीमंत ग्रहस्थ रामविलास लाहोटी यांच्याकडे गेले. वसंतरावांनी त्यांना इंदिरा गांधी आज तुमच्या घरी जेवायला येतील म्हणून सांगितलं. खुद्द इंदिरा गांधी आपल्या घरी जेवायला येणार म्हणल्यानंतर रामविलास आनंदाने नाचू लागले. लागलीच त्यांनी साताऱ्यावरुन चांदिचे ताटे मागवून घेतली. इंदिरा गांधींना जेवण्यासाठी खास पेशवाई थाळीची सोय करण्यात आली.
रामविलास यांनी इंदिरा गांधीच्या पाहूणचाराची उत्तम सोय केली होती. पुरणपोळी, एकवीस कोशिंबरी, हात धुवायला केशर पाणी, बसायला पाट, जेवणाच्या ताटासाठी पाट, सभोवताल रांगोळी असा शाही थाट जेवणासाठी करण्यात आला होता.
संध्याकाळची सातची वेळ होती. इंदिरा गांधी आल्या. जेवणाची केलेली सोय पाहून आनंदित झाल्या. त्या जेवायला बसणार इतक्यात यशवंतरावांनी वसंतरावांना हाक मारून बाजूला नेले. यशवंतरावांनी वसंतरावांना सांगितल की बाईंना सांग, यशवंतराव तुमच्या नंतर जेवण करतील. आमच्याकडे पाहूण्यासोबत जेवणाची पद्धत नाही. घरातील व्यक्ती नंतर जेवण करतात.
वसंतरावांनी इंदिरा गांधींना यशवंतराव नंतर जेवतील अगोदर पाहूण्यांनी जेवण्याची पद्धत आहे म्हणून सांगितलं.
इंदिरा गांधींना निरोप पोहचवून ते यशवंतराव चव्हाणांजवळ गेले. त्यांनी यशवंतरावांना तुम्ही इंदिराबाईंना अगोदर जेवण्यास का सांगितलं अस विचारताच यशवंतराव म्हणाले,
“वसंतराव पहाटे पाच वाजल्यापासून मी बाईंसोबत फिरतोय. माझं डोक गरगरतय. आत्ता हे कसं सांगू बाईंना. तू काय कर पहिला मला सिगरेटचं पाकिट आणि काड्यापेटी आणुन दे. आणि मला अशा ठिकाणी नेऊन बसवं जिथून कुठेही सिगरेटचा वास जाणार नाही.”
वसंतरावांनी त्यांना बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर नेलं. यशवंतरावांनी तिथ बसून सिगरेट पिली आणि म्हणाले वसंता आत्ता मला जेवायला वाढ. माझं डोकं कमी आलय.