इंग्रजांपासून ते चिनी लोकं, सर्वांच्या प्रयत्नातून जगातील पहिला शिवरायांचा पुतळा उभारला !

१९२० मध्ये ग्वाल्हेर येथे मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. यात कोल्हापूरचे महाराज राजर्षी शाहू महाराज, ग्वाल्हेरचे संस्थानिक माधव महाराज शिंदे, सरदार खासेराव पवार यांनी पुढाकार घेतला.
जेथे शिवरायांचे बालपण गेले, ज्या जिल्ह्यात स्वराज्य जन्मास आले त्या पुणे शहरात हे स्मारक उभारायचे असे नक्की झाले. १९२१ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला. १९२८ मध्ये शिवजन्माला ३०० वर्ष पुर्ण होणार म्हणून हा पुतळा १९२८ मध्ये उभारायचा असे ठरवले. (आत्ताच्या कालखंडानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारिख १९ फेब्रुवारी १६३० हि मान्य झालेली आहे त्याकाळी शिवरायांचा जन्म १६२७-२८ मध्ये झाला अशी समजूत दिसते).
पुतळ्याच्या कामासाठी सर्व जाती धर्माचे, राष्ट्रांचे हात कामास आले. चिनी कारागीर, ब्रिटीश शासक, मुस्लीम असे सर्व घटकांचा पुतळा उभारणीमध्ये हातभार राहिला.
कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराजांनी हे काम ख्यातनाम शिल्पकार श्री गणपतराव म्हात्रे यांना दिले. गणपतराव म्हात्रे यांनी अश्वारुढ पुतळा तयार करणे तर करमरकर यांनी पॅनेल्स तयार करणे असे ठरले. पॅनेल्सच्या अभ्यासासाठी करमरकर यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीत अभ्यास केला. या पॅनेल्सवरती शिवरायांचे शौर्य, राजकारणपटुत्त्व, धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता दाखवायची होती. पॅनेल्सचे काम तपासण्यासाठी इंग्रज परिक्षक आला असता करमरकर यांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली. पुढे म्हात्रे यांना काम वेळात पुर्ण करणे अशक्य दिसू लागताच हे काम करमरकरांनी पुर्ण करावे असे ठरले. अन्यथा हे काम परदेशी शिल्पकाराला मिळणार होते. याप्रसंगी छत्रपतींचे दिवाण म्हणाले,
“करमरकर या कामामुळे तुम्ही जगद् विख्यात व्हाल.”
शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील अचूकतेसाठी हेन्री ऑक्झेंन्डेन व आर्म्स हिस्ट्री मधील वर्णन उपयोगी पडले. भारतात तोपर्यन्त ब्रॉन्झमध्ये एकसंध घोड्यावरचा पुतळा कोणीही केलेला नव्हता. हे आव्हान करमरकरांनी स्वीकारले. मेकेगॉन अॅण्ड मॅकॅन्झी कंपनीतील एक मुख्य फोरमन रॉसमिसन, काशीराम देसाई आणि गुलाम मोहम्मद यांनी हे काम तडीस नेले. रॉसमिसनने हाताखालच्या कामगारांना सांगितले होते की,
“काम मैं गडबड हुईं तो मैं टुमपर गोली चलांकर खुद को भीं गोली मारेगां , फॉउंन्ड्री औंर करमरकरका नाम रखों या मर जाओं.”
पुतळा मुंबईवरुन पुण्यास आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला होता. पुतळा बोगद्यांमधून व्यवस्थितरित्या येण्यासाठी रेल्वेच्या पायाची उंची साडेतीन फुटींवरुन एक फुट करण्यात आली होती. तसेच पुतळ्याचा एक लाख रुपयांचा विमा काढण्यात आला होता.
पुतळ्याचे हातावरील तासकाम चिनी कारागिरांनी केले. पुतळा पुण्यात आणणे हे एक दिव्यच होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हि पहिलीच घटना होती.
११ जून १९२८ रोजी रेल्वे पुण्याला निघाली. पुतळ्याचा १ लाखांचा विमा उतरविण्यात आला होता. बोगद्याच्या तिथे पुतळा तिरपा करुन गाडी पुढे नेण्यात येत होती. गव्हर्नर विल्सन याने करमरकरांचे पुतळ्याच्या कामाबद्दल अभिनंदन केले. पुतळ्याच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला दहा हजार लोक हजर होते. अनावरण प्रसंगी २१ तोफांची सलामी देण्यात आली.
या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची जबाबदारी असलेले लोक शिल्पकाराला निमंत्रण द्यायचे विसरले.
१५ जूनला सकाळी सकाळी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली. करमरकरांनी कार्यक्रमास माझ्या सर्व सहकार्यांना बोलवा अशी भूमिका घेतली. त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली.
१६ जूनला हा सगळा कार्यक्रम पार पडला. त्याचे वृत्त केसरीने २६ जून १९२८ रोजी छापले.
या कार्यक्रमात शिल्पकाराचा सत्कार करण्याचा कार्यक्रम समाविष्ट नव्हता. म्हणून २१ जुलै रोजी पुण्यात पंडित मदनमोहन मालविय यांच्या हस्ते शिल्पकाराचा सत्कार करण्यात आला.
पुतळा ओढण्यासाठी २० बैलगाड्या जुंपण्यात आला. तरिही पुतळा पुढे नेणे अशक्य झाल्यानं नगरपालिकेचा स्टीम रोलर बोलवण्यात आला.
कार्यक्रमाची व्हिडीओ चित्रण कल्याणजी धरमसी यांनी केल्याची नोंद आढळते.
- प्रा. गणेश राउत.
संदर्भ –
- मराठी विश्वकोश क्रमांक ३
- शिल्पकार करमरकर – लेखक सुहास बहुळकर
हे ही वाचा –
- खरंच व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का..?
- शिवाजी राजांचा तिसरा डोळा !!!!
- मराठा साम्राज्याच्या नाशास कारणीभूत ठरलेल्या माणसानेच आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला !
Excellent information