आजीबाई म्हणाल्या, ”सगळं गाव यशवंताला नावाजतंय, त्याला हार घालाय आलिया”
संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाल्यावर नव्या महाराष्ट्राची जडणघडण झाली ती यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली.
कृषी-औद्योगिक समाजरचना, सहकारातून समाजप्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बॅंका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगर सारखी मोठी धरणे व छोटी गाव-शेततळी योजना, जलसंधारण कामे, विभागीय विद्यापीठांची उभारणी लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, विश्वकोष निर्मिती मंडळ, अशी चौफेर दृष्टी ठेवून केलेली रचनात्मक काम हे यशवंतरावांच कार्य कर्तृत्व होत.
याच सोबत सामान्य लोकांचा समाजकारणात, राजकारणात सहभाग असावा म्हणून पंचायतराज, जिल्हा परिषद निर्मिती, स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तृत्वाचे डोंगर उभा करण्याचे आव्हान हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून घडवून दाखविले.
या सर्व गोष्टींवरुन लक्षात येत की यशवंतराव चव्हाण हे जनसामान्यांनांचे नेते होते. त्यावेळी यशवंतराव अर्थमंत्री असावेत, ते कराडच्या विश्रामगृहामध्ये सहकुटुंब उतरले होते. एक म्हातारी फाटक्या लुगड्यात काहीतरी गुंडाळून म्हातारपणामुळे कापत कापत यशवंतरावांच्या भेटीचा प्रयत्न करीत होती. पोलिसांनी तिला जवळ जाऊ दिलं नाही. यशवंतरावांनी हे पाहिलं त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, ”का आली होतीस बाई?”
बाई म्हटली, ”सर्व गाव यशवंताला नावातंय, तेव्हा त्याला भेटून हा हार द्यावा म्हणून आलिया.” त्या बाईनं तीच्या फाटक्या लुगड्यातून तो हार काढला आणि बाहेर यशवंतरावांना दिला. त्यांनी तो हार घेतला आणि तिच्या गळ्यात घालून तिच्या पाया पडले. वेणूताईंना बोलवून घेतलं आणि तिला जेऊ घालायला सांगितलं.
अशा उदार मनाचा नेता अजून तरी महाराष्ट्राच्या मातीने पाहिला नाही.
त्याचसोबत देशात महाराष्ट्र विकासाच्याबाबतीत सर्वप्रथम राहील याची दक्षता त्यांनी घेतली. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आज महाराष्ट्र विकासाची घोडदौड करीत आहे हे त्यांचे द्रष्टेपण आहे.
हे ही वाच भिडू:
- पाकिस्तानला हरवणाऱ्या ईशापुर रायफलच्या निर्माणाचं श्रेय जातं यशवंतराव चव्हाणांना
- फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.
- यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत यावेत यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती ?