गावकऱ्यांनी रेडिओवर राडा केला आणि ‘झुमरी तलैय्या’ गाव बॉलिवूडमध्ये फेमस झालं..
बराच काळ बॉलिवूडमध्ये झुमरी तलैय्या या गाण्याचा उल्लेख होत असायचा. लोकांना हे गाव काल्पनिक वाटणं स्वाभाविक होतं. रणबीर कपूरचा एक चित्रपट आला होता जग्गा जासूस म्हणून त्यात अरिजित सिंगने झुमरी तलैय्या हे गाणं गायलं होतं. पण हे झुमरी तलैय्या कुठलं काल्पनिक ठिकाण नाही. या झुमरी तलैय्या गावाला फार मोठा इतिहास आहे. जो देशाला जोडणारा होता. झुमरी तलैय्या बद्दलचा हा इतिहास आपण जाणून घेऊ.
झारखंड राज्यातल्या कोडरमा या जिल्ह्यात वसलेलं झुमरी तलैय्या हे शहर मनोरंजन क्षेत्राशी अनेक वर्षांपासून आपले संबंध टिकवून आहे. १९५० ते ६० च्या दशकात झुमरी तलैय्या शहरात देशातले सगळ्यात जास्त फोन कनेक्शन होते. याच कारण होतं रेडिओ.
आधीच्या काळात टीव्ही नसल्याने मनोरंजनाच साधन म्हणून लोक रेडिओ ऐकायचे. त्याकाळात आजच्यासारखा पॉप आणि मॉडर्नच्या नावाखाली काहीही गोष्टी खपवल्या जात नसायच्या. त्याकाळी रेडिओ सिलोन आणि विविध भारती द्वारे गाण्याची फर्माईश केली जायची. इतकंच नाही तर सगळ्यात जास्त फर्माईश या झुमरी तलैय्या या शहरातून येत असे.
१९५२ साली इंटेलिजन्स ब्युरोच्या बी.व्ही. केसकर यांनी झुमरी तलैय्याच्या लोकांच्या या त्रासाला वैतागून रेडिओवर हिंदी गाणी वाजवण्यावर बॅन आणला होता. यामुळे रेडिओ सिलोनची मागणी प्रचंड वाढली होती.
याचा एक मजेदार किस्सा आहे. हा ट्रेंड नक्की सुरु कसा झाला.
सगळ्यात आधी झुमरी तलैय्या शहरातून रेडिओला फर्माईश केली ती रामेश्वर प्रसाद बर्नवाल या व्यापाऱ्याने.
रेडिओ आणि हिंदी गाण्यांच्या नादात ते रोज २०-२५ फर्माईश रेडिओ सिलोनला पाठवत असे.
एकदा त्यांची फर्माईश त्यांच्या नावासकट प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांनी बिनाका गीतमाला मध्ये रेडिओवर म्हणून दाखवली. १९५० साली बिनाका गीतमाला हा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम होता.
त्यांचं नाव रेडिओवर पुकारण्यात आल्याने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या घटनेमुळे त्या शहरातील लोकांमध्ये धाडस वाढलं. लगेचच पान टपरी चालवणाऱ्या गंगाप्रसाद मगधीया आणि इलेकट्रोनिक वस्तूंच्या दुकानाचे मालक नंदलाल सिन्हा यांनीही नावासकट फर्माईश पाठवली आणि त्यांचही नाव रेडिओवर आलं.
हळूहळू हे इतकं पसरत गेलं कि गाणं आणि नाव यांच्या फर्माईशी विविध भरती आणि रेडिओ सिलोनला स्वीकारणं मुश्किल झालं होतं. दर महिन्याला आणि आठवड्याला बऱ्याच पत्रांचा खच रेडिओला मिळू लागला. अनेकांच्या आवडीची गाणी त्यात कल्ट आणि क्लासिक गाणी वाजू लागली. हि एक प्रकारची मनोरंजन क्षेत्रातली क्रांती होती. लोकांमध्ये स्पर्धा लागू लागल्या कि कोण किती फर्माईश पाठवतो आणि कोणती गाणी पाठवतो.
याचा परिणाम इतका झाला कि पोस्टमनची पत्र सुद्धा रेडिओ स्टेशनला जाऊ लागली. विविध भारती आणि रेडिओ सिलोन हे सुद्धा इतके डेंजर होते कि ते फक्त झुमरी तलैय्या शहरातल्या लोकांच्या फर्माईशी मोठ्या प्रमाणात स्वीकारत असत. इतर लोकांनी यावर आक्षेप नोंदवला होता पण त्याच पुढे काही झालं नाही कारण गाणी सुरेख होती तेव्हाची.
या झुमरी तलैय्यातील लोकांचं आणि हिंदी गाण्यांचं एक वेगळं नातं तयार झालं होतं. आजच्या काळात मात्र हे सुख गायब झालं आहे. ७०-८०च्या दशकानंतर मात्र बरीच क्रांती झाली, स्मार्टफोन आले, नवीन नवीन रेडिओ स्टेशन आलेत, नवीन म्युझिक आलं त्यामुळे या फर्माईशी मागे पडत गेल्या.
आजही झुमरी तलैय्या मध्ये लोकं त्या जुन्या आठवणी कायम ठेवण्यासाठी रेडिओ ऐकतात. आधुनिकीकरणाच्या काळात रेडिओ जपून त्यांनी गावाची विशेषता जपली आहे. रेडिओ फेमस होण्याचं कारणच झुमरी तलैय्या हे शहर होतं. सगळ्यात जास्त फर्माईशी आणि चांगल्या दर्जाची गाणी हे समीकरण दीर्घ काळ सुरु होतं.
आज घडीला रेडिओ भलेही मागे पडला असेल पण इतिहासामध्ये झुमरी तलैय्या शहरातील लोकांच्या फर्माईशी कायमच्या कोरल्या गेल्या. संगीत क्षेत्रातील हृदय म्हणून झुमरी तलैय्या प्रसिद्ध आहे.
हे हि वाच भिडू :
- रवांडा रेडिओ, ज्याच्यामुळे नरसंहार सुरु झाला अन् आफ्रिकेतील एक अख्खी जमात संपवण्यात आली..
- श्रीलंकेच्या रेडिओला उत्तर देण्यासाठी तयार झालेलं विविधभारती बंद होत आहे का..?
- जीव वाचवण्यासाठी भारतात आला, आणि ऑल इंडिया रेडिओची आयकॉनिक ट्यून देवून गेला.
- मध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..