सुरवातीला सपक असलेल्या भारतीय उसाचा गोडवा वाढवला या महिला शास्त्रज्ञाने
फेब्रुवारीला सुरवात झालेय.आता हळू हळू थंडी कमी होत जाईल आणि उनाचे तडाखे बसायला सुरवात होईल. हिवाळ्यात तीन ते चार घेतल्या जाणाऱ्या अमृततुल्याचे कपांचे प्रमाणही आता जवळपास सकाळ आणि संध्याकाळ एवढयावरच येऊन थांबेल. दुपारच्या चहाची जागा आता एक थंडगार पेय ते म्हणजे उसाचा रस. पण चहा असू दे की उसाचा रस भारतात ऊस आणि साखर मुबलक प्रमाणात होत असल्यानं किफायतीशीर किमतीत आपण या अमृततुल्यांचा आस्वाद घेऊ शकतो.
भारतात अगदी ऋग्वेदिक काळापासून ऊस असल्याचे पुरावे भेटतात.
डॉ.के.टी. आचाय यांनी त्यांच्या “इंडियन फूड: ए हिस्टोरिकल कम्पॅनियन” या पुस्तकात लिहिले आहे की भारतात ऊस ऋग्वेदिक काळापासून (इ. स. १५०० ईसापूर्व)आहे आणि तो इक्षू आणि या नावाने प्रसिद्ध होता. कौटिल्याने तर उसापासून बनणाऱ्या उत्पादनांची एक मोठीच्या मोठी लिस्टच दिली आहे. पण आपल्याकडील ऊस तेवढे गोड नव्हते.
या गोड उसांची पैदास पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया या पूर्वेकडील देशांमध्ये केली जाते.
अनेक वेळा या देशातून भारतात हा ऊस आयात केला जात असे. मात्र भारताटाळ्या उसावरही प्रक्रिया करून त्याच्या ही गोडव्यात वाढ करावी अशी गरज अनेकांनी बोलवून दाखवली होती ज्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांचा देखील समावेश होता.
भारताची हीच गरज ओळखून स्थापन झाली कोईम्बतूर शुगरकेन ब्रीडिंग सेंटरची.
आणि याच सेंटर मधून भारताला मिळाला स्वतःचा गोड ऊस आणि याच श्रेय जातं जानकी अम्मल यांना. भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ असणाऱ्या जानकी अम्मल यांनी भारतात स्वदेशी गोड ऊसाचा संकर तयार केला ज्याचा आज आपण स्वाद घेत आहोत.अम्मल यांनी गोड उसाची जी हायब्रीड व्हरायटी विकसित केली त्यामुळं भारताला इंडोनेशियाकडून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नव्हते. त्यांनी कोईम्बतूर येथील शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे महत्वाचे संशोधन केले होते.
पण जानकी अम्मल यांचा पहिली भारतीय महिला वनस्पती शास्त्रज्ञ बनण्याचा प्रवास ही सोपा नव्हता.
जानकी अम्मल यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील तेल्लीचेरी (आता थल्लासेरी) येथे झाला. तेल्लीचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जानकी मद्रासला गेल्या. जिथे त्यांनी क्वीन मेरी कॉलेजमधून बॅचलरची पदवी मिळवली आणि १९२१ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बॉटनीमध्ये ऑनर्स पदवी मिळवली. समाजातून लग्नासाठी असलेला दबाव झुगारत त्यांनी शिष्यवृत्तीचे जीवन निवडले आणि त्या मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी रवाना झाल्या. जिथे त्यांनी १९२५ मध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली.
मिशिगन विद्यापीठाकडून १९३१ मध्ये बॉटनीमध्ये पीएचडी मिळविणाऱ्या अम्माल या अमेरिकेतील पहिल्या भारतीय महिला होत्या.
१९३५ मध्ये, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमण यांनी इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली आणि जानकीची पहिल्याच वर्षी संशोधक फेलो म्हणून निवड केली. तथापि, मागासवर्गीय जातीतील आणि त्यातही अविवाहित स्त्री म्हणून त्यांना कोइम्बतूर येथील पुरुष समवयस्कांकडून अनेक असह्य अडचणी निर्माण केल्या गेल्या.
शेवटी या भेदभावाला कंटाळून जानकी लंडनला रवाना झाल्या आणि तिथे त्यांनी जॉन इनेस हॉर्टिकल्चरल इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक सायटोलॉजिस्ट म्हणून प्रवेश घेतला.
१९५१ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिला वैयक्तिकरित्या भारतात परतण्यासाठी आणि भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ची पुनर्रचना करण्यासाठी आमंत्रित केले. ते त्यांनी मान्य केले. त्यांना बीएसआयचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले. वैयक्तिक आयुष्यात जानकी एक कट्टर गांधीवादी होत्या आणि त्यांनी त्यांचे जीवन अखेरपर्यंत सध्या पद्धतीनेच जगले.
७ फेब्रुवारी १९८४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी, जानकी अम्मल यांचे मदुरावायल येथील संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्रात म्हटले गेले होते की “ती आयुष्याच्या शेवटपर्यंत तिच्या अभ्यास आणि संशोधनासाठी समर्पित होती.” .