खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…?

‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येकवेळी आपल्याला त्यांच्या शहनाईचे सूर आठवतात, आणि जेव्हा कधी शहनाई या वाद्यप्रकाराविषयी लिहायचं, बोलायचं असतं तेव्हा ते प्रकरण खां साहेबांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. शहनाईच्या सुरांनी कमारुद्दिन खान यांना ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां साहेब’ बनवलं तर खां साहेबांनी शहनाईला जागतिक ओळख मिळवून दिली. केवळ एखाद्या शुभमुहूर्ताच्या प्रसंगी  वाजवल्या जाणाऱ्या वाद्याच्या परंपरेतून शहनाईची मुक्ती करून तिला शास्त्रीय संगीताच्या मेहफिलींमध्ये स्थान मिळवून दिलं, असं हे नातं.

ustad bismillah khan

खां साहेबांचं आपल्या शहनाईवर अपार प्रेम होतं. ते कधीच शहनाईकडे एक वाद्य म्हणून बघत नसत. शहनाई त्यांना आपली सखी, प्रियतमा वाटे. पत्नीच्या मृत्यूनंतर तर खां  साहेबांनी शहनाईलाच आपली ‘बेगम’ अर्थात पत्नी मानलं होतं. रोज रात्री झोपताना सोबत शहनाई घेऊनच ते झोपत असत. पत्नीच्या मृत्युनंतर याच ‘बेगम’ने त्यांच्या आयुष्यात ‘रोमान्स’ भरला. लहानपणापासूनच शहनाई वादन हे खां साहेबांसाठी प्रार्थनेसमान होतं. संगीताची देवी सरस्वतीप्रती आपली आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी ते मंदिरात आणि गंगाघाटावर शहनाईवादन करत असतं. त्यामुळेच खां साहेब गंगा-जमनी तहजीब मधलं सर्वात महत्वाचं नांव ठरलं.

खां साहेबांचं आपल्या शहनाई प्रतीचं जे प्रेम होतं, जी श्रद्धा आणि  निष्ठा होती ते लक्षात घेऊन २१ ऑगस्ट २००६ रोजी ज्यावेळी खां साहेबांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीरासोबत त्यांची शहनाई सुद्धा दफन करण्यात आली. हे एकप्रकारे शहनाई प्रती व्यक्त करण्यात आलेलं ऋण होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.