हर हर मोदी ; बिग्रेड मोदी
पुतळ्याच्या नादाला लागून माणसांनी महत्वाची गोष्ट सोडली.
“ नाय नाय हा इतिहास मान्यचं नाय ना भाऊ !! काय पण काय लिहताय ” सदरचे वाक्य तुम्ही गेली दहा -पंधरा वर्ष ऐकत आलाच असाल. याचं कारण इतिहासाची मढी वर काढायचं काम हा एकविसाव्या शतकात भारतीयांना लागलेला उत्तम शोध म्हणून गणला जातो. इतिहास हा विषयच लक्षात राहू शकत नाही अशी आपल्या समाजाची वस्तूस्थिती असताना विचारवंतांनी त्यात देखील कन्फ्यूजन वाढवत खरा इतिहास आणि खोटा इतिहास असा दूहेरी ऑप्शन आपणासमोर उभा केला.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर या कामात अग्रेसर असणार नाव म्हणजे ब्रिगेड. संबध महाराष्ट्राच्या इतिहासावर या संघटनेनं इतकी दहशत निर्माण केली आहे की, चेष्टा करायला देखील त्यांच नाव घेताना आमची जीभ धजावते. तर आत्ता मुद्याची गोष्ट या ब्रिगेडच्या लोकाच मुख्य काम काय तर दिसला इतिहास की बदल पानं.. दिसला इतिहास की बदल पानं..
आत्ता याच खेळात आपल्या देशाचे सर्वेसर्वो आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी काय केलय तर आत्ता इतिहासाच्या पुर्नलेखणासाठीच नवी समिती गठित केली आहे. पुतळ्याच्या चर्चेत देखील रायटर या संस्थेनं हा रिपोर्ट छापला याचं कौतुक करावं वाटतं.
या रिपोर्टनुसार, हि समिती १४ सदस्यांची असणार आहे. के. एन. दिक्षीत या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या अध्यक्षांवर पुरातत्वीय संशोधन व DNA चा अभ्यास करुन हिंदू हेच भारताचे मुलनिवासी आहेत व हिंदू शास्त्र हे मिथक नसून तो इतिहास आहे हे सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी या समितीच्या स्थापनेचे आदेश दिलेले असून ते म्हणतात, ”हिंदू शास्त्र हे मिथक नसून ते तर्कावर आधारलेलं आहे. काही लोकांच्या मते रामायण ही काल्पनिक कथा आहे.परंतु मला वाटतं की हे लोकं चुकीचे आहेत. मी स्वतः रामायण पूजतो आणि मला वाटतं की रामायण हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. कुराण आणि बायबलला इतिहास मानलं जात असताना हिंदू धर्म ग्रंथांना इतिहास मानण्यास काय हरकत आहे. (छान म्हणतात)
थोडक्यात काय तर भारतीय इतिहासात संशोधन करून त्याचे पुनर्लेखन करण्यासाठीच्या अनेकविध योजनांपैकी एक म्हणजे ही समिती असणार आहे. १२,००० वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीचा उगम आणि जगभरातील इतर प्राचीन संस्कृतींशी असलेला भारतीय संस्कृतीचा संबंध याबाबतीतील माहिती संशोधित करण्याचं काम ही समिती करणार अाहे. थोडक्यात मुलनिवासी कोण या प्रकरणात संघाची असणारी भूमिका खरी करून दाखवण्याची जबाबदारी या समितीवर पडणार आहे.
आत्ता दरवेळी सारखं याला जबाबदार कोण. खिक्क… हरहर श्री मोदी !!!