आठ आण्यासाठी गोवऱ्या थापण्यापासून ते ७००करोडची मालकीण होण्यापर्यंतचा प्रवास
कुछ कर गुजरने का जुनून जहां होता है
वहा जिंदगी रेहती है, खुदा होता है
आयुष्यात कितीही अडथळे आले तरी परिस्तिथीच्या छाताड्यावर ठामपणे उभे राहतात त्यांना आयुष्यात कशाचीच कमी नसते. अनेक कचखळग्यातून मार्ग काढत अशी माणसं आपल्या ध्येयापर्यंत पोहचतातच. असाच एक प्रेरणादायी प्रवास होता कल्पना सरोज यांचा.
कल्पना सरोज यांचा जन्म महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात रोपड़खेड़ा गावातला.
त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.वडिलांना मदत करण्याच्या दृष्टीने मग त्यांनी लहानपणापासूनच कामं करायला सुरुवात केली. शाळा सुटल्यावर कल्पना जवळच्या जंगलात जाऊन लाकडे गोळा करून आणायच्या. लहानपणी कल्पना यांनी शेणाच्या गोवऱ्यादेखील बनवून विकल्या. कल्पना सांगतात की, या कामाचे त्यांना कधी आठ आणे तर कधी बारा आणे मिळायचे मात्र घरच्यांना थोडीशी का होईना मदत होते म्हणून त्या हे काम करायच्या.
मात्र अवघ्या बारा वर्षांच्या असताना कल्पना यांचा विवाह त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या व्यक्तिशी झाला.
त्यामुळे कल्पना यांना शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले होते. त्यांची स्वप्न कायमसाठी संपली असं त्यानं वाटत होतं. लग्नानंतर पति कल्पना यांना मुंबईला घेऊन गेला. अगदी बालविवाह झालेल्या कल्पना यांचा सासरच्यांनी कोणतीही तमा न बाळगता अतोनात छळ केला. एकदिवस त्यांच्या वडिलांनी हा छळ पहिला आणि ते आपल्या मुलीला घेऊन पुन्हा माहेरी आले. मात्र तितेही त्यांच्यामागील शुक्लकाष्ट संपले नाही. सासरहून पळून आली म्हणून समाजानं त्यांना टोमणे मारण्यास सुरवात केली. त्यामुळं आयुष्याला वैतागलेल्या कल्पना यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला मात्र नियतीच्या मनात काहीतरी दुसरंच होतं आणि त्यांचा जीव वाचला.
आता आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी कल्पना यांनी पुन्हा स्वप्ननगरी मुंबईचा रस्ता धरला.
मुंबईत त्यांना सुरवातीला शिवणकामाच्या कंपनीत धागा कापायचे काम दिले गेले, जे हेल्परचे काम होते. या कामाचे कल्पना यांना दररोज दोन रुपये मिळायचे. म्हणजे त्यांना महिन्याकाठी साठ रुपये पगार मिळायचा.
मुंबईत मिळेल ती कामं करत असताना कल्पना यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला कि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. एकदा त्यांची बहीण खूप आजारी पडली. उपचारासाठी कल्पना यांनी खूप प्रयत्न केले.
मात्र पैशांअभावी पुरेसे उपचार भेटू न शकल्याने त्यांच्या बहिणीनें त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले.
यातून योग्य तो धंदा घेत त्यांनी आता मागे वळून ना पाहता चिक्कार पैसे कमवण्याचा कल्पना यांनी निर्धार केला.मग त्यांनी स्वतःच्या व्यवसाय काढायचं ठरवलं आणि शासनाच्या एक योजनेसाठी दिलं जाणारं कर्ज घेत त्यांनी फर्निचरचं दुकान थाटलं. कल्पना सरोज यांच्या मेहनतीनं हे दुकानही चांगला चाललं. त्यांनतर त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल टाकलं.
जो मेहनत करतो त्याला नशिबाची ही साथ मिळते या उक्तीप्रमाणे कल्याणमध्ये अवघ्या २.५ लाखांमध्ये घेतलेल्या जमिनीची काही वर्षांनंतर ५० लाख रुपये किंमत झाली होती.
बांधकाम व्यवसायात अगदी जीवघेणे हल्ले होण्यापर्यंत त्यांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र कल्पना ताई आता इथून मागे हटणाऱ्या नव्हत्या.
बांधकाम व्यवसायात आल्यावर कल्पना यांच्या यशाच्या नव्या कहाणीचा जन्म झाला. लवकरच त्यांची व्यापारी आणि उद्योजिका अशी नवी ओळख तयार केली.
१९९९ मध्ये त्यांनी अहमदनगर येथे साईकृपा शुगर मिलचा व्यवहार केला.
त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा वळवला कयानी मोटर्सकडे. कमानी ट्यूब कंपनी काही साधारण नव्हती, त्याची सुरुवात प्रसिध्द उद्योगपती रामजी हंसराज कमानी यांनी केली होती. रामजी कमानी यांची महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू यांच्याशी जवळीक होती.
१९९७ पर्यंत कंपनीचा तोटा ११६ कोटी होता. २००६ मध्ये कल्पना यांच्या हाती सूत्र आली आणि स्थिती पालटू लागली.
त्यांनी या उद्योगाला पुन्हा नफ्यात आणण्याचे आव्हान स्विकारले कंपनीचा त्यांनी कायापालट करून दाखविला. कमानी ट्यूब्जला त्यांनी ज्याप्रकारे तोट्यातून बाहेर काढून नफेदार कंपनी बनविले ती कहाणी आज देशभर सांगितली जाते.
हे ही वाच भिडू :
- महागड्या ब्रँडिंगच्या स्पर्धेत झुडीओचं आगमन झालं आणि आम आदमीचा ब्रँड उभा राहिला
- लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब..९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड
- जाहिरातीवर पैसे खर्च न करताही ग्रो-प्रो कॅमेरा जगातला सगळ्यात भारी ब्रँड कसा बनला?
कल्पना सरोज बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रध्दा आहे. त्या म्हणतात की, “ मी आज जे काही आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे.”
कधीकाळी शेणाच्या गोवऱ्या थापणाऱ्या कल्पना सरोज आज जवळपास ७०० कोटींच्या मालकीण असल्याचं सांगण्यात येतं. भारत सरकारनंही त्यांच्या या उत्तुंग प्रवासाची दाखल घेत त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं आहे.