राष्ट्रीय शोक म्हणजे काय? शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कधी केले जातात?
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षीय वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशात झाला. लता दीदींनी गायलेली गाणी अजूनही जनमानसात लोकप्रिय आहे. त्यांचा गीता शिवाय मैफिली पूर्णच होऊ शकत नाही. अशा लता दीदी गेल्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे संगीताला दिलेले योगदान पाहता त्यांना भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला होता.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय शोक म्हणजे काय ? कुठल्या परिस्थितीत ते घोषित केले जाते?
यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मूर्खजी यांच्या मृत्यू नंतर ७ दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.
जाणकार सांगतात की, जगातील जवळजवळ प्रत्येक देशात राष्ट्रीय शोक व्यक्त केला जातो. त्या-त्या देशाची वेगवेगळी परंपरा आहे. असे असले तरीही प्रक्रिया सारखीच आहे.
‘राष्ट्रीय शोक’ हा पूर्ण देशाचं दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग समजला जातो. ‘राष्ट्रीय शोक’ हा एखाद्या ‘व्यक्तीच्या’ मृत्यू नंतर अथवा पुण्यतिथीच्या दिवशी साजरा करण्यात येतो.
भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय शोकाच्या काळात संपूर्ण भारतात आणि परदेशात असणाऱ्या भारतीय संस्थांमध्ये (जसे की दूतावास इ.) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.
या संपूर्ण काळात औपचारिक आणि सरकारी महत्वाचे काम केले जात नाही.
दौरे, कार्यक्रम, मेळावे आणि अधिकृत मनोरंजन कार्यक्रमावर देखील बंदी असते.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे लता मंगेशकर यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मागच्या काही वर्षांपूर्वी केवळ विद्यमान आणि माजी पंतप्रधान, विद्यमान आणि माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान आणि माजी राज्यमंत्री यांच्या निधनानंतरच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र हळूहळू ते नियम बदलत गेले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असतं. यासाठी कुठलेही लिखित नियम नसल्याचे सांगण्यात येत. राजकीय, साहित्य, कायदा, विज्ञान आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूंनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यांचा मृतदेह तिरंग्याने झाकण्यात येतो.
त्यासाठी संबंधित राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. यानंतर हा निर्णय पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवला जातो. जेणेकरून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करता येईल.
शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करताना मृतदेह तिरंग्यात गुंडाळला जातो. मृत व्यक्तीला संपूर्ण सन्मान दिला जातो. यामध्ये पोलीस बँडद्वारे ‘संवेदना संगीत’ वाजवणे आणि त्यानंतर बंदुकीची सलामी दिली जाते.
स्वतंत्र भारतात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यावर पहिल्यांदा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
गैर-राजकीय आणि गैर-सैन्य व्यक्तींमध्ये – मदर तेरेसा, सत्य साई बाबा, श्रीदेवी इत्यादींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या १९९७ मध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सध्याचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांचे निधन झाल्यासच सार्वजनिक सुट्टी दिली जाऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. पण त्यानंतर दिल्लीसारख्या अनेक राज्यांनी दिवसभर सुट्टी ठेवली होती.
हे हि वाच भिडू
- लता दीदींच्या कठोर परिश्रम आणि रियाझामागे त्यांच्या लहानपणीची एक आठवण होती…
- बाळासाहेबांची तब्येत बिघडली की एकच रामबाण उपाय असायचा. लतादीदींची गाणी….
- भावाला संगीत दिग्दर्शनाचं काम दिलं नाही म्हणून लतादीदी राज कपूरवर चिडल्या होत्या…