अमेझॉनने विकायला काढलेल्या तिरंग्याच्या पायपुसण्यांनी देशात वातावरण पेटवलेलं
गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर म्हणजे एक वॉर रूम तयार झालीये. वॉर इंडिया वर्सेस पाकिस्तानचा, आता हे चित्र काही नवीन नाही म्हणा, पण या भांडणांत आता इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा पडल्यात. म्हणजे ६ फेब्रुवारीला दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदईच्या पाकिस्तानी शाखेने ट्विटरवर केलेल्या ट्विटमुळे या वादाला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या एका Hyundai डीलरच्या ट्विटर अकाउंट @hyundaiPakistanOfficial ने ‘काश्मीर एकता’ दिनाचे समर्थन करणारा मॅसेज पोस्ट करून काश्मीर फुटीरतावाद्यांचे समर्थन केले.
अर्थातचं वाद पेटणार होता, दोन्ही देशाचे सोशल मीडिया यूजर्स एकमेकांवर हल्लाबोल करायला लागले. वाद इतका वाढला कि, भारतात #boycotthundai ट्रेंड व्हायला लागलं. मग काय कंपनीला माफी मागणं भाग होत, पण कंपनीने माफी न मागता आपण भारताच्या बाजूने आहोत, वगैरे वगैरे असं म्हणतं पोस्ट टाकून दिली.
आता तो वाद थोडा कमी होत नाही तर पाकिस्तानने त्यागोष्टीचा फायदा घेतलाच. ह्युंदाईनंतर बाकीच्या इंटरनॅशनल कंपन्यानी सुद्धा या वादात उडी घेतली. या कंपन्यांच्या पाकिस्तान शाखेने काश्मीर दिवस बाबत ट्विट करायला सुरुवात केली. यात केएफसी, पिझ्झा हट, ओसाका बॅटरी, Isuzu D-Max, Bosch Pharmaceuticals, अॅटलास होंडा लिमिटेड आणि किया मोटर्स या कंपन्यांचा समावेश आहे.
या सर्व कंपन्यांच्या पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलवरून काश्मीर एकता दिनानिमित्त केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यांनंतर या कंपन्यांना सुद्धा भारतात बॉयकॉट करण्याची मागणी होतेय. आता हा वाद पेटणार हे तर फिक्स आहे, पण भिडू तशी ही काही पहिली वेळ नाही, जेव्हा इंटरनॅशनल कंपन्यानी भारताच्या विरोधात कोणतं कांड केलंय.
तर गोष्ट आहे २०१७ सालची. जगातली दिग्गज ऑनलाईन शॉपिंग कंपनी अमेझॉन. जिला भारतात सुद्धा विश्वासच सर्टिफिकेट भेटलंय. पण कंपनीने तेव्हा स्वतःहून वाद ओढून घेतला होता. कंपनीच्या कॅनडातल्या साईटने आपल्या ऑनलाईन वेबसाईवर भारताच्या तिरंग्याच्या पायपुसण्या विक्रीसाठी टाकल्या होत्या.
अर्थातच हा भारताच्या तिरंग्याचा अपमान होता, सगळ्यात आधी कॅनडातल्या भारतीयांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पण नंतर हा वाद आणखी वाढला. भारतात बॉयकॉट अमेझॉन ट्रेंड व्हायला लागलं, भारतीयांनी माफीची मागणी केली, पण तरी सुद्धा कंपनी माफी मागायला काय भारतीय तिरंग्याच्या रंगाच्या पायपुसण्या आपल्या वेबसाइटवरून हटवायचं नाव सुद्धा घेत नव्हत्या.
शेवटी आपल्या सरकारला या प्रकारात डोकं घालायला लागलं. तात्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालत बरेच ट्विट केले. ज्यात त्यांनी कंपनीला माफी मागण्याची आणि भारतीय झेंड्याचा अपमान करणाऱ्या पायपुसण्या हटवण्याची वॉर्निंग दिली. एवढंच नाही तर सुषमा यांनी कंपनीला थेट धमकीच देऊन टाकली कि, जर कंपनीने त्या पायपुसण्या हटवला नाहीत तर, तुमच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा व्हिसा रोखून ठेवू, आणि आधीच्या व्हिसांवर सुद्धा पुन्हा विचार करू.
सुषमा स्वराज यांच्या या कारवाईला कंपनी घाबरली आणि त्यांनी लगेच आपल्या वेबसाइटवरून त्या पायपुसण्या हटवल्या. कंपनीने या प्रकारांबद्दल माफी तर मागितली नाही पण अमेरिकेतील सिएटल येथील अॅमेझॉन मुख्यालयाच्या प्रवक्त्याने जाहीर केलेलं कि, ही वस्तू त्यांच्या वेबसाइटवर यापुढे उपलब्ध नाही.
त्यानंतर अमेझॉन इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर अमित अग्रवाल यांनी सुषमा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होतेकी,
“मी हे पत्र तुमच्या ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे भारतीय ध्वज असलेल्या उत्पादनांच्या संदर्भात लिहित आहे. अमेझॉन इंडिया भारतीय कायदे आणि चालीरीतींचा आदर करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. कॅनडामधील तृतीय पक्ष विक्रेत्यांद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या या वस्तूंमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल अमेझॉन दिलगिरी व्यक्त करते. भारतीयांच्या भावना दुखावण्याचा आमचा कधीही हेतू नव्हता.”
कंपनीच्या या माफीनाम्यानंतर हे प्रकरण शांत झालं, पण त्यानंतर सुद्धा बऱ्याच कंपन्यांचे असे भारतविरोधी वाद पाहायला मिळालेत. ज्यांना नंतर चांगलाच धडा मिळालेला.
हे ही वाच भिडू :
- भारतीय म्हणतायेत, ‘ह्युंदाईला आता टाटा म्हणायची वेळ आलीये’
- बाकीचे देश बॉयकॉट चायना म्हणतायत मात्र चीननं या देशावर बहिष्कार घातलाय
- सॅमसंग वगैरेंना मागे टाकून एक चायनीज मोबाईल कंपनी भारतात टॉपला गेली