केतकी चितळेवर कोणती कारवाई होणार ; सोशल मिडीयावर व्यक्त होताना कायदा काय सांगतो.
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या सोशल मिडीयाचं वातावरण तापलं आहे. काल दिनांक 13 मे च्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केतकी चितळेच्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली.
या पोस्टखाली केतकी चितळेने ज्या व्यक्तीने मुळ पोस्ट लिहली आहे अशा ॲड नितीन भावे या व्यक्तींच नाव देखील लिहलं आहे.
केतकी चितळेच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठिकाठिकाणी केतकी चितळेवर गुन्हे नोंद करण्यात येतील अस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं व कळवा येथे केतकी चितळेवर पहिला गुन्हा नोंद देखील करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या स्वप्नील नेटके यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यामध्ये. कलम ५००,५०५ (२),५०१ आणि १५३ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पण पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजेच एखाद्या वादग्रस्त किंव्हा अक्षेपार्ह पोस्ट लिहिणे, शेअर करणे किंव्हा लाईक करणे, कमेंट करणं गुन्हा आहे का ? त्याचे कोणते कायदे आहेत का ? केतकी चितळेला अटक होवू शकते का ? याबाबत सायबर पोलीस अधिकारी आणि कायदेतज्ञ काय सांगतात ?
आणि ही केतकी चितळे कोण आहे ? ती कायम वादात का सापडते ?
तिची कारकीर्द पहिली तर तिने हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय..मात्र लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेमध्ये तीचा महत्वाचा रोल असतांनाच तिला त्या मालिकेतून काढण्यात आलं होतं.
केतकीला एपिलेप्सीचा त्रास आहे. केतकीचा असा आरोप होता की, तिला असणाऱ्या एपिलेप्सीच्या त्रासामुळे तिला काढून टाकण्यात आलं आहे. या विरोधात तिने आवाज उठवला होता…यानंतर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह राहिली आणि कायमच काही काही वादात सापडत राहिली..
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करत फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे वादात सापडली. त्यादरम्यान तिला शिवसैनिकांच्या धमक्याही आल्या होत्या.
“एका विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोक केवळ प्रवास मोफत मिळतो म्हणून मुंबई पाहण्याच्या उद्देशानेच मुंबईला येतात असा आरोप तिने केला होता. तेंव्हा केतकीवर ऍट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी झाली होती.
आणखी एक म्हणजे २०१९ च्या दरम्यानची गोष्ट आहे.
केतकीने हिंदीतून फेसबुक लाईव्ह केल्यामुळे तिला अश्लील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी केतकीने एक स्वतंत्र व्हीडिओ शेअर केला जो प्रचंड व्हायरल झाला होता..
तरीही ट्रोलिंग सुरूच होतं मग तिने पोलिसांत तक्रार दाखल केली, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना आदेश दिले होते. त्यानंतर ट्रोलर्सवर कारवाई सुरु झाली, औरंगाबादमधून एकाला अटक देखील करण्यात आली.
इतकंच नाही तर तिने युनिफॉर्म सिव्हिल कोडवर आधारित एक पोस्ट लिहिली ज्यात तिने सगळ्याच धर्मावर टीका केली होती. त्यावर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि भांडुप पोलीस स्टेशनमध्ये केतकीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे सगळे जुने वाद आहेत…
मात्र आत्ताच्या प्रकरणामुळे कोणती कारवाई होवू शकते..
या प्रकरणामध्ये केतकी चितळेला खरंच अटक होऊ शकते का ? याबाबत सायबर adv प्रशांत माळी भिडूशी बोलतांना सांगतात की,
“केतकी चितळेवर जी कारवाई झाली ती ५००, ५०५ (२),५०१ आणि १५३ A अंतर्गत झाली आहे. त्यातील १५३ A कलम आहे त्या कलमाअतंर्गत तीला कधीही अटक होऊ शकते. १५३ अ म्हणजे दोन समूहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठी कृत्ये करणे.
या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.
केतकी चितळेला अटक झाली तर पटकन जमीन मिळणंही मुश्किल आहे. त्यासाठी न्यायालयातून जामीन मिळवावा लागतो. थोडक्यात हे कलम खूप कठोर आहे”.
अशी माहिती प्रशांत माळी यांच्याकडून मिळाली..
आता केतकी चितळेच्या प्रकरणावरून, कायदेतज्ज्ञांनी आणि सायबर एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीवरून तुम्ही मात्र हे पक्कं करून घ्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करतांना, कमेंट करतांना जरा जपून शब्द वापरा नाही तर तुम्ही अडचणीत सापडू शकता…
वकिलांकडून जी माहिती मिळाली त्यावरून वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे केतकी चितळेला तीन वर्षांपर्यन्तचा कारावास देखील होवू शकतो अस लक्षात येत. त्यामुळे सोशल मिडीयावर कमेंट करत असताना, एखादी पोस्ट शेअर करत असताना काळजी घ्यावी लागते.
याबद्दलच बोल भिडूने कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली…
असीम सरोदे सांगतात कि,
“भारतीय संविधान मधील कलम १९ (२) नुसार, आपल्या प्रत्येकांवर वाजवी बंधनं घालून देण्यात आले आहेत. बोलण्याचं, विचार व्यक्त करण्याचं, आपलं म्हणणं मांडण्याचं मूलभूत स्वातंत्र हे मर्यादांमध्ये वापरलं पाहिजे.
आता सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचा आधुनिक प्लॅटफॉर्म आहे.
इथे आपण एखाद्या विषयाबाबत किंव्हा एखाद्या व्यक्तीबाबत व्यक्त होतांना कुणाचीही अब्रुनुकसानी होणार नाही, भाषेचा तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.
भाषा ही सभ्येतेची परिमाण पाळणारी राहील याची खबरदारी घ्यावी.
जर कोणी सोशल मीडियावर या मर्यादा पाळल्या नाहीत, त्या पोस्टमुळे दोन गटांमध्ये तेढ निर्माण होत असेल तर त्या अंतर्गत Information Technology Act ची कलमं लावण्याचे पोलिसांना अधिकार आहेत”
थोडक्यात काय तर सोशल मिडीयावर कोणताही मजकूर पोस्ट करताना,
घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत असताना त्यातून कोणाच्या व्यक्तिगत भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, फक्त पोस्ट करत असतानाच नाही तर वादग्रस्त पोस्ट लाईक करणं, एखाद्या वादग्रस्त पोस्टवर कमेंट करणं हे देखील टाळावं असा सल्ला दिला जातो.
हे ही वाच भिडू
- केतकी चितळे म्हणते, नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात वास्तविक हे खोटं आहे.
- ३० हून अधिक लोकांच्या मृत्यूची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेचीच?