नरवीर तानाजींच्या पराक्रमाचा वारसा आजही मालुसरे घराण्यानं जीवापाड जपलाय
छ.शिवाजी महाराजांना आपल्या पोराच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले तानाजी मांसाहेबांच्या तोंडातून कोंढाण्याची खंत ऐकतात. पोराचं लग्न बाजूला ठेवतात.
भावाला घेऊन “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाच ” म्हणत प्राणपणाला लावून कोंढाणा लढवतात, उदयभान राठोडच्या मोगलाई पकडीतून तो सोडवतात. तिथं तानाजींना वीरमरण येत. गड आला पण सिंह गेला ही वीररस जागृत करणारी कथा आपण सगळ्यांनी ऐकली आहे.
सहाजिकच कधी कधी वाटत की आता कुठं असतील मालुसरेंच्या पुढच्या पिढीतील माणसं? तानाजींच्या पोराचं पुढ काय झालं असेल? उत्तर आहे महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला “किल्ले पारगड.”
रायबाच लग्न स्वतः महाराजांनी आपल्या हातानी लावून दिल. त्याला आपल्या गळ्यातली कवड्याची माळ घातली आणि किल्ले पारगडचं किल्लेदारपद सांभाळण्याची जबाबदारी दिली.
स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला आहे म्हणून या किल्ल्याचं नाव पारगड. गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवायला म्हणून महाराजांनी हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या वास्तुशांतीला महाराज स्वतः हजर होते. तेव्हा त्यांनी किल्लेदार आणि तिथ हजर असलेल्या मावळ्यांना स्फूर्तीदायी आज्ञा दिली,
“चंद्र सूर्य जोवर तळपताहेत तोवर किल्ला जागता ठेवा. “
शिवरायांची प्रेरणाचं म्हणून काय आज तब्बल ३४० वर्षांनी आजही या शूर मावळ्यांच्या वारसानी किल्ला जागता ठेवला आहे.
किल्ल्याचे पहिले सुभेदार रायबाजी मालुसरे आणि त्यांच्यासोबत तिथे आलेल्या शेलार मामाच्या वंशजांनी पुढे अनेक वर्ष हा किल्ला सांभाळला. रायबाजीची समाधी पारगडवरचं आहे.
दक्षिणेला खोल दरीमुळे तिथून किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. ४८ एकर पसरलेल्या या किल्ल्याला पूर्व-पश्चिम उत्तरेला ताशीव कड्यांची तटबंदीमुळे तो अभेद्य आहे. गड बांधतानाच काळजीपूर्वक केलेल्या रचनेमुळे आणि स्वराज्याच्या मावळयांच्या पराक्रमामुळे पारगड अजिंक्य राहिला. म्हणून या किल्ल्याला अजिंक्य पारगड असंही ओळखलं जात.
सन १६८९मध्ये औरंगजेबचा शहजादा मुअज्जम जो पुढे जाऊन हिंदुस्तानचा शेहनशहा बनला. तो आपल्या पाच हजाराच्या खास शाही सैन्यासह पारगड जिंकण्यासाठी तळ ठोकून बसला होता. पण गडावरच्या पाचशे मावळ्यांनी त्याला दाद दिली नाही. त्याला तिथून पळवून लावला.
मुअज्जमचा सरदार खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंतच्या सहायाने परत हल्ला केला पण तो ही अपयशी झाला.
मालुसरेंच्या दहा पिढ्या पारगडावर नांदल्या. तानाजीचा वारसा सांगणारी त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निम्मिताने बेळगाव जिल्ह्यातील अनगोळ येथे त्यांचे स्थलांतर झाली.बाळकृष्ण मालुसरे हे मालुसरे घराण्याचे थेट अकरावे वंशज. त्यांच्या सुनबाई म्हणजेच डॉ.शीतल मालुसरे यांच्याशी आम्हाला बोलता आलं.
शीतल ताईना मालुसरे घराण्याचा धगधगता इतिहास मुखोद्गत आहे. याच विषयावर त्यांची रायबा नावाची कादंबरी येत आहे. अजय देवगन अभिनित तानाजी या चित्रपटाच्या रिसर्च टीममध्ये शीतल ताईचा समावेश आहे. शीतल ताईंनी आम्हाला मालुसरे इतिहास सांगितला.
मालुसरे मुळचे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी जवळच्या गोडावलीचे.
तानाजी मालुसरेंच्या आजोबांनी जावळी खोऱ्यात आदिलशहाच्या हल्ल्यावेळी त्याच्याशी झुंज दिली पण त्यांना त्यात हौतात्म्य आले. तेव्हा त्यांच्या मुलांना कोंढाजी शेलार उर्फ शेलारमामा यांनी महाड जवळील उमरठ गावी आणले. यातल्या काळोजी मालुसरेशी आपली बहीण पार्वतीचं लग्न लावून दिल. त्यांचा मुलगा तानाजी.
पुरातन तनेश्वराच्या मन्दिरावरून तानाजींचं नाव ठेवण्यात आलं.
तानाजींनंतरही शेलार आणि मालुसरे घराण्याने पराक्रमाची शर्थ स्वराज्याची चाकरी केली. आजही पारगड किल्ल्यावर मालुसरे आणि शेलार घराण्याचे वारसदार राहतात.
शीतल मालुसरे यांचे चिरंजीव रायबा हे थेट तेरावे वंशज. ते महाड येथे राहतात. नुसता नावाचाच वारसा नाही तर त्यांच्याजवळ वंशपरंपरागत चालत आलेली तानाजी मालुसरेंची २६ किलो वजनाची तलवार आहे. आणि सगळ्यात महत्वाची ठेव म्हणजे खुद्द महाराजांनी रायबानां लग्नात दिलेली स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ ही मालुसरे कुटुंबीयांनी जीवापाड जपली आहे.
हे ही वाच भिडू.
- राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.
- शिवरायांच्या आरमाराचे खरे वारसदार व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी
- हिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.
उमरठा नसून उमरठ असे आहे आणि ते पोलादपूर या तालुक्यात येतं.
Please sent Sheetal Malusare Contact detail. I want to meet her from Ajmer (Rajasthan) Koli Samaj