कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हा नेता आता भाजपला गाडून टाकण्याची भाषा करतोय
राजकीय वर्तुळात सद्या ५ राज्यांच्या निवडणुकांच्याच चर्चा चालू आहेत. त्यात युपीची निवडणूक म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय असतो…आणि याच निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत आलेच पाहिजेत म्हणून आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याबद्दल…
उत्तर प्रदेशच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. युपीमधील भाजपचा एक मोठा चेहरा असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवला आहे.
शिवाय राजीनाम्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना, “ ‘खुद को तोप समझने वाले बीजेपी नेताओं को ऐसा दागूंगा कि…’ असं म्हणत भाजप नेत्यांना गाडण्याची भाषा देखील केली.
गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षाचे नेते सातत्याने अशा गोष्टी बोलत होते की, भाजपचे अनेक बडे नेते लवकरच सपामध्ये प्रवेश करू शकतात….पण या चर्चाना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे फुलस्टॉप लागला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी श्रम आणि रोजगार आणि समन्वय मंत्री या नात्याने प्रतिकूल परिस्थितीत आणि विचारसरणीत राहूनही मी माझी जबाबदारी अत्यंत तन्मयतेने पार पाडली आहे, पण दलित, मागासलेले शेतकरी, बेरोजगार तरुण या गटाकडे आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे मी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे…. स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले- ” सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते श्री स्वामी प्रसाद मौर्य जी आणि त्यांच्यासोबत सपामध्ये येणार्या इतर सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा!”
असो हे औपचारिता बाजूला ठेवली तर हे तर उघड होतं कि, स्वामी प्रसाद मौर्य हे बऱ्याच काळापासून अखिलेश यांच्या थेट संपर्कात होते.
गेल्या अनेक दिवसांपासून स्वामी प्रसाद मौर्य भाजप सोडून अखिलेश यादव यांच्या सायकलवर स्वार होतील, अशी चर्चा सुरू होती. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पक्ष प्रवेशावर खुद्द अखिलेश यादव थेट लक्ष ठेवून होते, विशेष म्हणजे त्यांच्या पातळीवरच या सर्व गोष्टी घडत असल्याचं बोललं जातंय.
अखिलेश यादव हे काही काळापासून आगामी निवडणुकांसाठी मागासलेल्या जातींना एकत्र करत आहेत. कारण उघड उघड आहे ते म्हणजे, गेल्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्याचे श्रेय मागास जातींना जाते आणि यावेळी अखिलेश यादव मागासलेल्या जातींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच छोट्या पक्षांशी युती सोडून मागासलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. आणि स्वामी प्रसाद मौर्य हे याच मोहिमेचा एक भाग आहेत.
बरं स्वामी प्रसाद मौर्य हे एकटे सपा मध्ये येतायेतेत असं नसून त्यांच्यासोबत ते अनेक नेते ते घेऊनच येतायेत असं एकंदरीत चित्र दिसून येतंय..कारण अशीही चर्चा आहे कि, आणखी दोन मंत्री राजीनामा देऊ शकतात. त्यांच्या शिवाय धरमसिंह सैनी आणि दारा सिंह चौहान या मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा आहे. धरम सिंग आणि दारा सिंग हे दोघेही त्यांच्याच छावणीतील मानले जातात. तिघेही योगी सरकारमध्ये मंत्री आहेत, पण तिघेही बसपचे मोठे नेते राहिले आहेत आणि बसप सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. अशा स्थितीत हे तिघे भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. स्वामी प्रसाद यांनीही मंत्रीपद सोडले आहे.
नुकतेच लखनौच्या कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आणि बदायूंमधील भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांना बोलतांना अडवलं तेव्हा त्यांनी नाराजी दाखवत मुख्यमंत्री आणि सभापतींसमोरचा माईक सोडला, पण नंतर त्यांना भाषण करण्यास सांगितले पण त्यांनी परत येण्यास नकार दिला…थोडक्यात त्यांच्यासाठी हा अपमानच ठरला होता.
आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आपली मुलगी आणि बदायूंमधून भाजप खासदार संघमित्रा यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
पण स्वामी प्रसाद मौर्य यांच्या सपा पक्ष प्रवेशाचे खरे कारण रायबरेलीचा उंचाहार मतदारसंघ असल्याचे बोलले जातेय,
स्वामी प्रसाद मौर्य यांचा मुलगा उत्कृष्ट मौर्य यांनी गेल्या वेळी रायबरेलीच्या उंचाहार मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण ते अगदी कमी फरकाने निवडणुकीत पराभूत झाले होते. पण कितीही कमी फरकाने हा पराभव असला तरी ती सीट भाजपमध्ये राहून जिंकून आणणं शक्यच नव्हतं. अशा परिस्थितीत स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मुलाला ही जागा जिंकायची असेल, तर तो समाजवादी पक्षाकडूनच जिंकू शकतो म्हणून त्यांनी हा पक्षप्रवेश केला असे दवे केले जातायेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप तर स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मुलाला उंचाहार मतदारसंघातून तिकीट देण्याच्या तयारीत आहे पण स्वामी प्रसाद मौर्य हे मानायला तयार नाहीत कारण त्यांचं ठरलाय हि सीट तर समाजवादी पक्षातूनच जिंकता येणार आहे..त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयांनी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. असंच घडलं होत जेंव्हा ते बसपा सोडून अचानक भाजप मध्ये गेले होते तेंव्हा त्यांचा निर्णयाची कुणकुण कोणालाच नव्हती.
२०१७ मध्ये सुद्धा त्यांनी भाजपला असाच झटका मिळाला होता.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी ते बसपा सरकारमध्ये मंत्रीही होते आणि नंतर मायावतींना सोडून भाजपमध्ये आले. मागास जातीचे नेते मानले जाणारे स्वामी प्रसाद मौर्य जेंव्हा भाजपमध्ये आले होते तेंव्हा त्यांचा भाजपमधील प्रवेश हा सोशल इंजिनिअरिंगचा परिणाम असल्याचे मानले जात होते, मात्र आता मागासवर्गीय समाजातील बडे नेते भाजपमधून बाहेर पडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे….बसणारच ना निवडणूक तोंडावर आल्यात अन त्यात मोठा नेता अचानक पक्ष सोडून आणि सोबतच दलित वर्गाची मते देखील घेऊन जातो..
या तडकाफडकी राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करून, त्यांनी घेतलेला निर्णय घाईघाईने घेतलेला निर्णय आणि तसेच त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा. आपण यावर बसून चर्चा करावी असंही ते या ट्विट मध्ये म्हणले आहे.