काळ्या-जादुसाठी चर्चेत असणाऱ्या गुवाहाटीतल्या कामाख्या मंदिराचा असा आहे इतिहास

सणवार जवळ आले की, बायकांमध्ये मासिक पाळी पुढं ढकलण्यासाठी गोळ्यांची देवाण घेवाण केली जाते. त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. तेच ना पाळी आलेल्या स्त्रियांना घरातल्या देवघराजवळ आणि किचन मध्ये एंट्री नसते. आता प्रथा परंपरानुसार मासिक पाळी आलेल्या स्त्रिया या ‘अपवित्र’ असतात असा काहीसा समज आजही ग्रामीण भागात तरी पाहायला मिळतोय. कदाचित शहरांतही असेल.

जी मासिक पाळीची क्रिया हि एक नवीन जीव जन्माला घालणारी सुंदर प्रक्रिया आहे ती अशुभ कशी काय असू शकते ? कितीही डोकं आपटून सांगितलं तरी आपण खातो, पितो, झोपतो तशीच नैसर्गिक क्रिया म्हणजे मासिक पाळी. 

अपघातात मार लागला कि होणारा रक्तस्त्राव नॉर्मल वाटतो तसा मासिक पाळीतील रक्तस्त्राव नॉर्मल समजला जात नाही. आता काही लोकं धर्मांध जर असतील त्यांना कितीही सांगितलं तरी पटत नाही. (एक लक्षात घ्या धर्म आणि धर्मांधता यात फरक आहे जसा कि श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये आहे ) प्रत्येक धर्मात वेगवेगळे नियम आणि बंधनं असतातच असतात.

आता ही गोष्ट न पटणाऱ्यांना एक दंतकथा माहितीच असेल की, स्वतः महादेवाने अर्धनारी नटेश्वरचं रूप घेतलं, त्यांनीच स्त्रियांना मासिक पाळीचं वरदान देत आशीर्वाद दिल्याचंही सांगितलं जातं. तरीही याला विटाळ म्हणणं म्हणजे मूर्खपणा नाहीये का ?

 तुम्ही म्हणाल हा मुद्दा तसा जुनाच आणि रटाळ आहे त्यात वेगळं काय सांगताय.  

एकीकडे मासिक पाळीतील स्त्रियांना देवपूजा करायला मनाई असते आणि दुसरीकडे एक असं मंदिर आहे जिथं योनीची पूजा केली जाते. ते मंदिर म्हणजे कामाख्या मंदिर. असं म्हणतात की, दरवर्षी आषाढ म्हणजेच जून महिन्यात कामाख्याजवळील ब्रह्मपुत्रा नदी लाल होते. या काळात देवीला मासिक पाळी येते असंही सांगितलं जातं.  

या देवीला देवीला पाळी आली कि ३ दिवस हे मंदिर बंद ठेवलं जातं, तीन दिवसात मंदिराचा गाभारा लाल होतो म्हणून देवीचे भक्त देवीच्या पाळीच्या दिवसात देवीच्या योनीची मूर्ती लाल कपड्याने झाकून ठेवतात. मंदिर उघडल्याच्या नंतर भक्तांना ते लाल पाणी प्रसाद म्हणून दिलं जातं जे खूप पवित्र मानलं जातं. पण या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे आढळले नाहीत. 

हे कामाख्या देवीचं मंदिर आसामच्या गुवाहटीमध्ये आहे. हे मंदिर प्रथम कधी बांधले गेले याची ठोस माहिती उपलब्ध नाहीये आणि अशी कोणतीही नोंद नाही ज्यावरून हे कळू शकेल की मूळ कामाख्या मंदिर कधी बांधले गेले असावे. काही संदर्भ सांगितले जातात की, मूळ कामाख्या मंदिर चौथ्या-पाचव्या शतकात बांधले गेले असावे. हुसेनशाही घराण्याच्या काही सुभेदारांनी हे  मंदिर पाडल्याचे देखील संदर्भ आहेत. तर काही संदर्भ १५१५ ते १६३५ पर्यंत कोच घराण्याने आसामवर राज्य केले होते तेंव्हाचा मिळतो. राजा विश्व सिंग हे पहिले कोच राजा होते त्यांनी कामाख्या मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे काही शिलालेख मंदिरात आढळतात. 

पण या मंदिराबद्दल आणि देवीबद्दल अनेक दंतकथा आणि लोककथा आहेत. 

हिंदू पौराणिक कथांमध्ये या मंदिराचे मोठे महत्व आहे. काही प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये,कामाख्या हे कालीचे एक रूप असल्याचं बोललं आहे तर काही ग्रंथांमध्ये  कामाख्या ही शिवाची पत्नी सतीचे रूप मानले जाते. 

पौराणिक कथेनुसार, शिवाची पत्नी सती हिने आपल्या वडिलांनी आपल्या पतीचा अपमान केला म्हणून संतापात यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली होती. सतीच्या आत्मदहनाने शिवाला खूप दुःख झाले. दुःखाच्या आणि रागात शिवाने जगाचा विनाश व्हावा म्हणून तांडव सुरु केलं. आणि ते थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं. 

भगवान विष्णूच्या ‘सुदर्शन चक्राने’ माता सतीच्या शरीराचे तुकडे झाले. सतीच्या शरीराचे अवयव जेथे पडले तेथे तेथे शक्तीपीठे तयार झाली. त्यात देवीच्या शरीराच्या योनीचा भाग आसाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राग्ज्योतिषपूरमध्ये पडली, अशी आख्यायिका आहे.  आणि म्हणूनच देशातल्या एकूण १०८ शक्तिपीठांपैकी महत्वाचे १८ शक्तीपीठ मानले जातात, त्यातील एक म्हणून या कामाख्या देवीच्या मंदिराला मान आहे. गुहेसारखे दिसणाऱ्या मंदिराचे गर्भगृह हे कामाख्या मातेच्या गर्भासारखे असल्याचे मान्यता आहे. 

विशेष म्हणजे मंदिरात नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे माता देवी किंवा पवित्र योनीची प्रतिमा नेहमी ओलसर असते.

या मंदिरात अनेक सण साजरे केले जातात परंतु अंबुवाची मेळा आणि दुर्गा पूजा हे सर्वात प्रसिद्ध सण असल्याचं मानलं जातं. त्यातला सर्वात प्रसिद्ध म्हणजे अंबुवाची जत्रा. कामाख्या देवीच्या मासिक पाळीच्या दिवशी अंबुवाची उत्सव साजरा केला जातो. या अंबुवाची मेळामध्ये मोठ्या संख्येने भक्त येत असतात. तसेच या मंदिरात फक्त स्त्रियांना प्रवेश असतो आणि येथील पुजारी देखील महिलाच आहेत.

थोडक्यात आसामच्या इतिहासात कामाख्या मंदिराचं मोठं महत्व आहे. आणि मातृदेवतेची पूजा करणारा पंथ म्हणून देखील येथील इतिहासाला या मंदिराच्या रूपाने समृद्ध वारसा आहे.

आता बोला मासिक पाळी आल्यावर इथे या देवीची पूजा केली जाते अन दुसरीकडे बाईला मासिक पाळीत देवपूजा करणं वर्ज्य असतंय. 

किती विचित्र विरोधाभास म्हणावा हा. या मंदिरात मासिक पाळीचा सन्मान केला जातो. मासिक पाळीला महान शक्तीचं प्रतीक मानलं जातं.

शेवटचं सांगणं हेच की, मासिक पाळीसारख्या नैसर्गिक क्रियेला आपल्या समाजाने किती तुच्छतेने पाहिले आहे. याच मासिक पाळीमुळे आपल्या समाजाने पिढ्यां-पिढया स्त्रियांची किती पिळवणूक केलेली आहे हे दिसून येते…पण त्या धर्मांध लोकांना या मंदिराचे उदाहरण पुरेसं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.