४५ वर्षात पुण्याच्या J.M. रोडवर एकही खड्डा पडला नाही. हा चमत्कार असा घडला

सकाळी उठल्यावर पोहे खायचे म्हणून बाहेर पडलो होतो. मात्र, रोजच्या रस्त्यांवरुन गाडी चालवताना काही तरी चुकल्यासारखं वाटत होतं. नंतर वाटलं आपण वेगळ्याच शहरात तर आलो नाही ना? कारण रस्त्यावरचे खड्डे जाऊन रस्ते एकदम गुळगुळीत झाले होते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूचे स्पीड ब्रेकर गायब झाले होते. सगळ्या रस्त्यांना रंगरंगोटी करण्यात आली होती. हा बदल एका रात्रीतून झाला होता. त्यामुळे काही कळायला मार्ग नव्हता. थोडा विचार केल्यावर समजलं की, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्घाटनाला येणार आहेत. त्यामुळं पुण्यातले रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. मात्र बाकीचे रस्ते चकाचक करण्याची गरज पडली असली, तरी पुण्यातला एक रस्ता असाय ज्याला कुठलीही डागडुजी करण्याची गरज पडली नाही.

तो रस्ता म्हणजे जंगली महाराज रस्ता. 

शहरातील सर्वात वर्दळीचे रस्त्यांपैकी एक असणाऱ्या जे. एम. रत्यावर एकही खड्डा कसा नाही असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यामागे फार मोठा इतिहास आहे. 

१९७२ मध्ये राज्यात दुष्काळ पडला होता हे आपण ऐकून आहोत. मात्र पुढच्या वर्षी म्हणजे १९७३ पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पुण्यातील शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली होती. याबाबत नागरिकांबरोबर नगरसेवकांनी सुद्धा महापालिकेच्या सिटी इंजिनियरकडे तक्रार केली होती.

मात्र प्रशासनाने नेहमी प्रमाणे रस्त्यावरील पडलेल्या खड्यांचे खापर पावसावर फोडले. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडून आली होती. याभागातून निवडून येणारे नगरसेवक श्रीकांत शिरोळे यांनी मात्र रस्त्यावरील खड्डे हे पावसामुळे पडत नसल्याने ठणकावून सांगितले होते. त्यासाठी त्यांनी मुंबईतील रस्त्यांचा दाखला दिला होता.

श्रीकांत शिरोळे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना वारंवार मुंबईला जावे लागत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, पुणे शहरापेक्षा मुंबईत जास्त पाऊस पडत होता. तरीही तेथील रस्ते खड्डेमुक्त कसे आहेत काय?

महत्वाचे म्हणजे ७० च्या दशकात मुंबईतील रस्त्यावर आता प्रमाणे खड्डे नव्हते. त्यामुळे श्रीकांत शिरोळे यांनी पुणे महापालिकेतील सिटी इंजिनियरला मुंबईच्या रस्त्याचे उदाहरण दिले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईतील रस्ते कुठला ठेकेदार करतो याची माहिती घेतली. त्या ठेकेदारांच्या कंपनीचे नाव होते रेकॉन्डो (Recondo).

रेकॉन्डो ही कंपनी दोन पारशी बंधू चालवत होते. श्रीकांत शिरोळे यांनी पनवेल येथे जाऊन या ठेकेदार बंधूची भेट घेऊन जंगली महाराज रस्त्याची माहिती दिली. तसेच या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्याबद्दल सांगितले. 

यावेळी अडीच किलोमीटरच्या रस्ता तयार करण्यासाठी १० लाख रुपये खर्च येईल असे ठेकेदारांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र पुढे जाऊन हे बजेट वाढेल अशी कल्पना श्रीकांत शिरोळे यांना होती. त्यामुळे त्यांनी ठेकेदाराला सांगितले की, १० लाखांऐवजी १५ लाख घ्यावे आणि चांगला रस्ता तयार करावा अशा सूचना दिल्या होत्या.

यावेळी रेकॉन्डोने पुणे महापालिकेला लिहून दिले होते की, रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांपर्यंत एक जरी खड्डा पडला तरीही तयार करून देण्याची दावा केला होता. १ जानेवारी १९७६ ला जंगली महाराज रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. ३१ डिसेंबर १९८५ पर्यंत हा रस्ता खड्डेमुक्त राहणार असे रेकॉन्डो कंपनीने लिहून दिले होते.

दरम्यान १० वर्षाच्या काळात या रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही.  तसेच २०२१ पर्यंत म्हणजे मागील ४५ वर्ष या रस्त्यावर एकाही खड्डा पडला नाही. अपवाद केवळ २०१३ मध्ये रस्त्या लगतची डागडुजी करण्यात आली होती.

जंगली महाराज रस्ता १९७६ मध्ये तयार करण्यात आला असून अजूनही हा रस्ता चांगला आहे.

आता बोल भिडूच्या वाचकांना प्रश्न पडला असेल की, खड्डा पडला तर पुन्हा रस्ता बांधून देईन असे लिहून देणाऱ्या ठेकेदाराने पुणे शहरातील सगळे रस्ते करायला का दिला नाही नाहीत. त्याच असं झालं की, हॉट मिक्स हे टेक्नोलॉजी वापरून रेकॉन्डो कंपनी रस्ते तयार करत होती. पुणे शहरातील ठेकेदारांनी हॉट मिक्स टेक्नोलॉजी वापरून रस्ते बांधायला सुरुवात केली होती.

महत्वाचे म्हणजे जंगली महाराज रस्ता बांधणाऱ्या रेकॉन्डो कंपनी चालविणाऱ्या दोघा पारशी भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याची नवीन काम घेणे बंद केले होते. त्यामुळे  रेकॉन्डो कंपनीला दुसरे काम देण्यात आले नाही.

विशेष म्हणजे १९७४ मध्ये श्रीकांत शिरोळे हे अवघ्या २१ व्या वर्षी शिवाजीनगर भागातून निवडून आले होते. तसेच २४ व्या वर्षी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. कमी वयात सुद्धा आपल्या कामाची छाप श्रीकांत शिरोळे यांनी पाडली होती.

याबाबत श्रीकांत शिरोळे यांनी बोल भिडूला बोलतांना सांगितले की, अशा प्रकारे पुण्यात रस्ता तयार करण्यात आल्याची बातमी छापून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरावर चव्हाण यांनी मुंबईला भेटायला बोलाविले होते आणि केलेल्या कामाचे कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.