फॉरेनची विमाने यायची भारताच्या एका मोठ्या भागावर आकाशातून हे पोस्टर पाडून निघून जायची…
खालील पोस्टर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की,
तपकिरी रंगाची पगडी असलेला माणूस आपल्याकडे बोट दाखवून रागाने पाहत आहे. अजून जवळून पाहिलं तर, पोस्टरवर अनेक अशी दृश्य दाखवलीत. जसे की ओघळणारे रक्ताचे थेंब, बाजूला मानवी कवटीचे ढीग आणि हत्याकांडांचे मृतदेह आणि तसेच पोस्टरवरील काही तारखा.
पोस्टरवर असणारे संदर्भ इतिहासाची आठवण करून देत आहेत. पण नेमका कोणता इतिहास तर,
१७६५ मधील ढाका येथील हत्याकांड, १९१९ अमृतसर मधील हत्याकांड, १८५७ मधील भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध, आणि १९१८ मधील पहिले महायुद्ध
हे पोस्टर भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणारे आणि ब्रिटिशांच्या भारतातील अपयशावर प्रकाश टाकणारे आहेत.
पोस्टरच्या मध्यभागी एक मजकूर लिहिला आहे जो या पोस्टरचा मुख्य गाभा आहे, त्यावर लिहलय,
“गौरवपूर्ण स्वाधीनता खून की इतिहास का परिशोध”
आत्ता तुम्ही म्हणाल या पोस्टरचं एवढं काय कौतुक आहे. तर भावांनो ही पोस्टर साडेचार हजार किलोमीटर दूरवरून कष्ट घेवून विमानातून भारतात टाकण्यात आली होती.
आजच्या आसाम राज्यात ही पोस्टर जपानच्या सैन्याने विमानातून टाकली होती. ती टाकण्या मागची कारणे, त्याचा हेतू हे सगळच इंटरेस्टिंग आहे.
तर दुसर्या महायुद्धात ब्रिटन आणि जपानी सरकारांनी त्यांच्या बाजूने जनसामान्यांच्या मतांवर परिणाम करण्यासाठी दक्षिण आशियामध्ये तीव्र प्रचार युद्ध केले होते. त्याला Psychological Operation (PSYOP) म्हणलं जायचं.
आसाममध्ये सोडले जाणारे हे पोस्टर आणि जाहिराती याच ऑपरेशन चा भाग होत्या. आता या पोस्टमध्ये नेमकं काय सांगण्यात येत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १९३९ मध्ये जावं लागेल.
३ सप्टेंबर १९३९ रोजी रात्री ८.३० वाजता ऑल इंडिया रेडिओ च्या माध्यमाद्वारे व्हाइसरॉय लॉर्ड लिथलिंगो यांनी घोषणा केली की,
“ब्रिटिश सरकार जर्मनीशी युद्ध करीत आहे आणि त्या सरकारची वसाहत म्हणून भारताने देखील या युद्धात सहभागी व्हायचे आहे. मला खात्री आहे की, भारत मानवी स्वातंत्र्याच्या बाजूने आपले योगदान देईल.”
युद्धात ब्रिटीश भारत सहभागी होईल यासाठी भारतातील कोणत्याही तत्कालीन नेत्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेण्यात आलं नव्हतं. ब्रिटीशांनी परस्पर आपला हा निर्णय जाहीर केला होता. साहजिक भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. दुसर्या महायुद्धात भारताचा सहभाग असावा का? यावर व्हाइसरॉयने सल्लागार समिती किंवा भारतीय नेत्यांशी सल्लामसलत केली नव्हती याचा कॉंग्रेस संताप व्यक्त करत होते.
भारताने ब्रिटीशांकडून महायुद्धात सहभागी व्हायचे का नाही याबाबत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये तीन मतप्रवाह होते.
पहिला मतप्रवाह होता महात्मा गांधीचा. आपल्या अहिंसक तत्वांना धरून त्यांनी कोणत्याही महायुद्धात सहभागी होण्यासाठी विरोध व्यक्त केला होता. दूसरा मतप्रवाह होता तो पंडीत जवाहरलाल नेहरूंचा. त्यांच्या मते भारत महायुद्धात ब्रिटिश सरकारची साथ देईल परंतु युद्धानंतर जर ब्रिटिश भारताला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करत असेल तरच.
आणि तिसरा मतप्रवाह होता तो म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा.
त्यांच मत अस होतं की,
‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. त्यामुळे त्यांना वाटत होतं की जपान आणि जर्मनी सोबत हात मिळवून ब्रिटिशांविरुद्ध युद्धात उतरावे. त्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौज तयार केली.
त्याच दरम्यान काँग्रेस नेते आणि ब्रिटिश राजवटीच्या मध्ये झालेल्या करार बिघडल्यामुळे काँग्रेसने १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ चालू केली. या आंदोलनामुळे जवळपास बऱ्याच काँग्रेस नेत्यांना तुरुंगात जावे लागले होते. यामध्ये महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू देखील होते.
याच कारणामुळे भारतीय सैन्याचा जागतिक युद्धात सामील होण्याचा मार्ग सुकर झाला होता. जपान आणि जर्मनीसारख्या मोठ्या ताकदीच्या देशाला भारताच्या भौगोलिक स्थानाचा, नैसर्गिक आणि आर्थिक संसाधनांची विपुलता आणि सशस्त्र सामर्थ्याचा फायदा युद्धामध्ये होणार होता. म्हणून जपानने उघडपणे भारतात इंटरेस्ट दाखवण्यास सुरवात केली.
यामुळेच जपानचे प्रीमियर जनरल तोजो यांनी जाहीरपणे सांगितले की,
“ब्रिटिशांना भारताबाहेर घालवण्यासाठी भारतीयांनी युद्धाच्या निमित्ताने ही सुवर्णसंधी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी स्वत: चे स्वातंत्र्य मिळवले पाहिजे”.
लंडनमधील नॅशनल आर्मी म्युझियममध्ये अशा अनेक प्रचार पत्रिकांच्या मूळ प्रती आहेत. जपानी भाषेत त्या पोस्टर्स ला डेन्टन म्हणून ओळखले जाते. टिकाऊ, लांब-विणलेल्या जपानी कागदावर छापलेल्या. परंतु हे सर्व पोस्टर लक्ष देऊन वाचले तर, हे स्पष्ट होते की प्रत्येक पोस्टरमध्ये, लेखक आणि कलाकार सुसंगत राहिले आहेत. ब्रिटीशविरोधी पोस्टर्समध्ये, साम्राज्याने पसरविलेला भेदभाव, वंशवाद, झेनोफोबिया आणि असमानता या कल्पनेवर भर दिला आहे.
1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडात मरण पावलेली मृतदेह आणि मृतदेहाच्या ढिगाजवळ उभी असलेल्या एका महिलेची निराशाजनक फोटो आहे. त्या पार्श्वभूमीवर राईफल्स घेऊन आलेल्या गणवेशी माणसांचा पाठलाग करत गर्दीतून गांधींचा, फडफडणारा तिरंगा दाखवला आणि हिंदी आणि बंगाली भाषेत मजकूर लिहिले आहे,
“अमृतसर हत्याकांडाच्या आठवणी येऊन ज्या भारतीयांचे रक्त उसळत नाही, त्यांना भारतीय म्हणता येणार नाही, त्यामुळे सूड घेण्याची ही सुवर्णसंधी आहे”
या पोस्टर्समध्ये भाषेचा आणि ऐतिहासिक प्रतिमेचा एकत्रित वापर करत ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचे सामान्य माणसाला प्रलोभन दाखवण्यात आले होते. भारतीयांच्या भावनांचा हात घालण्याचा हा प्रयत्न होता.
सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी छोट-छोट्या पातळ्यांवर भारतीय संस्कृतीची ओळख टिपून त्याप्रकारे हे पोस्टर तयार करण्यात आले होते. यामुळे एक प्रश्न उरतोच तो म्हणजे जपानने त्या काळात कोणत्या भारतीयांची यासाठी मदत घेतली होती.
मात्र या प्रश्नाचं उत्तर देखील या पोस्टरवरूनच मिळतं. यातील काही पोस्टरवर आझाद हिंदुस्थान लीग ची सही आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढला जातो की आझाद हिंदूस्थान लीगने यासाठी मदत केली असेल.
पण यात सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर जपानची कार्यक्षमता. भारताच्या एखाद्या भागात असंतोषाची वाट मोकळी करुन देणं आणि त्याद्वारे आपला राजकीय स्वार्थ साधणं हे जपान करत होतं. यामध्ये फायदा दोन्ही देशांचा होता. पण महत्वाचं म्हणजे आपणाला छोटी गोष्ट वाटणाऱ्या या गोष्टीसाठी देखील जपान जीव तोडून काम करत होतं.
हे ही वाच भिडू
- औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतली पोरं थेट जपानी भाषेत गप्पा मारतात
- भारतीय क्रांतिकारकांने बनवलेली डिश गेली नव्वद वर्षे जपान मध्ये धुमाकूळ घालत आहे.
- जपानी माणसाने रामायणावर बनवलेला अॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला नव्हता
Nice post