आयुष्यात एकदाच कॅप्टन कुलचा स्वतः वरचा कंट्रोल सुटला होता…
अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या भाषणात नेहमी एक कविता म्हणायचे,
क्या हार में क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
संघर्ष पथ पर जो मिला
यह भी सही वह भी सही।
या ओळी तंतोतंत लागू होणारा क्रिकेटमधला स्माइलींग बुद्धा म्हणजे भारताचा माजी कप्तान महेंद्र सिंग धोनी. कॅप्टन्सीच्या आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये म्हणजे २००७ साली जिंकलेला वर्ल्ड कप असू द्या किंवा २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये तोंडावर कोणतंही टेन्शन न घेता सिक्स मारून मॅच जिंकून देणारा धोनी आपल्या कुलनेस साठी फेमस आहे.
हाच त्याचा कुलनेस भारताला स्लॉग ओव्हर्स मध्ये अत्यंत अडचणीत आलेल्या सामन्यांना जिंकून देण्यात देखील उपयोगी पडला आहे.
पण आयुष्यात एकदाच अशी वेळ आलेली जेव्हा कॅप्टन कुल आपला कंट्रोल गमावून बसला होता. पण हि वेळ भारतासाठी खेळताना नाही तर चेन्नई कडून खेळताना आली होती.
आणि कारण ठरली होती रोहित शर्माची मुंबई इंडियन्स..
पूर्वीपासून आयपीएलवर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने राज्य केलं होतं. पण जेव्हा तरुण रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व आलं तेव्हापासून चेन्नई सुपर किंगच्या साम्राज्याला तडे पडायला लागले. आता पर्यंत मुंबईवर चेन्नईने थोडी फार कुरघोडी केली होती ती सगळी रोहित शर्माने मोडून काढली. मुबई इंडियन्सला नव्या दमाने त्याने उभे केले.
तिथून पुढे जेव्हा जेव्हा धोनी ची टीम मुंबईच्या समोर फायनल ला आली तेव्हा तेव्हा रोहित शर्माच्या टीमे ने त्यांना चारीमुंड्या चीत केले. २०१५ सालचं आयपीएल चेन्नई मुंबईकडून हरली. २०१६-१७ हे दोन सीजन चेन्नईला आयपीएल मधून बाहेर काढलं गेलं होत. २०१७ मध्ये रोहित शर्माच्या टीमने पुण्याच्या टीमला हरवून तिसऱ्यांदा आयपीएल चा करंडक उंचावला. विशेष म्हणजे धोनी यावेळी पुण्याकडून होता.
२०१८ साली धोनीच्या चेन्नईने आयपीएल मध्ये कमबॅक केले तेही थाटात. त्यांनी आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली.
पण २०१९ साली सुरवातीपासून दोन्ही टीमची वाटचाल थोडी डळमळीतचं होती. धोनी च्या टीममध्ये सगळ्या म्हातार्या खेळाडूंचा समवेश होता पण तरी ते प्ले ऑफ पर्यंत पोहचले. तिथे मुंबईने त्यांना हरवले. त्याच वेळी दोन्ही साईडचे फॅन्स खुंखार झाले होते. whatsapp स्टेट्स, एफबी वरील मिम्स मधून एकमेकावर भरपूर चढाचढी झाली होती.
तरी चेन्नई फायनलला आलीच. नेहमी कुल असणारा धोनी या आयपीएल वेळी चिडचिड करताना दिसला. फायनलच्या आधी मुंबई इंडियन्सचा सपोर्ट करणारी फेमस आज्जी पॅव्हेलीयनमध्ये बसलेली दिसत होती.
ही फायनल तर आतापर्यंतच्या फायनलपैकी सर्वात वादग्रस्त ठरली. सुरवातीपासून भरपूर ड्रामा या सामन्यात दिसला. मुंबईची सुरवात काही विशेष झाली नव्हती. रोहित शर्मासह सुरवातीचे पाच खेळाडू नुसता हजेरी लावून गेले होते. मुंबईचा गेल्या अनेक वर्षापासूनचा तारणहार पोलार्ड अखेर धावून आला. त्याने २५ बॉल मध्ये ४१ धावा कुटल्या. त्याच्याच जोरावर मुंबईला चेन्नईपुढे १५० धावाच आव्हान ठेवता आले. या इनिंग मध्ये पोलार्डने अंपायरने वाईड दिला नाही म्हणून केलेला वाद चर्चेचा विषय ठरला.
चेन्नईसाठी १५० धावा म्हणजे सोपे टार्गेट होते. ड्युप्लेसीसं ने चांगली सुरवात देखील करून दिली. काही विकेट पडल्या तरी वॉटसन एका बाजूला विकेट टिकवून उभा होता. त्याच्यासोबत धोनी क्रीझवर होता. मॅच अजून चेन्नईच्या हातात होती. वॉटसन आपला तडाखा देत होता पण धोनीने सावधपणे खेळण्यास सुरवात केली होती.
१२व्या ओव्हरचा चौथा बॉल. सीएसकेच्या ८१ धावा झाल्या होत्या. हार्दिक पांड्या बॉलिंग करत होता. शेन वॉटसनने या बॉलवर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट मारला. तिथे लसिथ मलिंगा फिल्डिंग करत होता. त्याने थ्रो मारला पण मिसफिल्ड झाली. या गडबडीत धोनीने दुसरी रन धावायचा प्रयत्न केला. धोनी तसा आपल्या रनिंग बिटवीन दि विकेट्स साठी फेमस आहे. पण यावेळी तो थोडासा कमी पडला.
थर्ड अम्पायरकडे डिसिजन गेला, धोनीची बॅट लाईनवर दिसत होती. खूपवेळा अँगल चेक करून करून थर अंपायरने धोनीला आउट दिले. थर्ड अंपायरच्या निर्णयावर देखील चेन्नईच्या फॅन्सनी आपत्ती दर्शवली. धोनी आउट नाही असंच मंडळींचं म्हणणं होतं. इकडे टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये प्रकरण हातघाईपर्यंत येऊन पोहचले.
इतक्यात रोहित शर्माने कृणाल पांड्याला ओव्हर देण्याचा डिसिजन चुकला आणि वॉटसनने सामना चेन्नई कडून फिरवला. अखेरच्या ओव्हर पर्यंत उत्सुकता ताणली. यावेळी मात्र रोहित शर्माने शहाणपणा केला आणि यापूर्वी महागड्या ठरलेल्या पण अनुभवी मलिंगाला शेवटची ओव्हर दिली.
चेन्नईला जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलला दोन धावा हव्या होत्या पण रोहित शर्मा आणि मलिंगाने सापळा रचला. मलिंगाने स्लोवर वन चं अस्त्र वापरल आणि चेन्नईचा शार्दुल ठाकूर शेवट बॉलला आउट झाला. व्हिसल पोडू चेन्नई परत मुंबईकडून एक रनने हरली.
जगातला सर्वोत्तम कुल कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा धोनी रोहित शर्मापुढे परत हताश ठरला.
शेन वॉटसन सांगतो कि त्या दिवशी ड्रेसिंग रूममध्ये मी पहिल्यांदा धोनीला चिडलेलं पाहिलं. एक तर कधी नव्हे ते रन आउट झाल्यामुळे धोनी स्वतःवर चिडलेला होता. त्यात तो डिसिजन वादग्रस्त होता. त्यात चेन्नई फक्त १ रनने हरली तेही त्यांच्या सख्ख्या विरोधकांकडून मुंबईकडून. क्रिकेट पंडित म्हणाले कॅप्टन कुलचा सुटलेला कंट्रोल त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाची वाटचाल आहे.
आता या घटनेला दोन वर्षे झाली. आजही धोनी तितक्याच ठामपणे आयपीएल खेळतोय, बघू त्याने आपला कुलनेस गमावला नाही तर अजून एकदा आयपीएल चॅम्पियनचा खिताब पटकवेल आणि आपल्या विरोधकांची बोलती बंद करेल हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने खरोखर युवराज आणि गंभीरचं क्रेडीट मारलेलं काय?
- याच मॅचमूळं दिनेश कार्तिकला वर्ल्डकप टीममध्ये चान्स मिळालाय.
- काही काळाने का होईना, धोनीसारखा निमशहरी नायक मिळाला आहे.