आपल्या दोस्ताला आणि देशाला त्रास झाला म्हणून दिलीपकुमारांनी पाकच्या पंतप्रधानांना झापलेलं..

एका नेत्यासाठी एका अभिनेत्यानं दुसऱ्या नेत्याला झापलं असेल असं कधी घडलं नसावं. पण भिडू लोग हा इंडिया आहे आणि इधर सब कुछ चलता है.

हे झापाझापीच प्रकरण भारतातच घडलं होतं. या किश्श्यातले अभिनेते आहेत दिलीप कुमार. दिलीप कुमारांनी झापलं होतं पाकिस्तानचे नेते नवाझ शरीफ यांना… कुणासाठी….?

अटलबिहारी वाजपेयींसाठी

तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण अटलबिहारी वाजपेयी आणि दिलीप कुमार एकमेकांचे खासम खास दोस्त होते. आपल्या दोस्तासाठी काहीपण अशी यांची मैत्री. या मैत्रीत मग पाकिस्तानचे पंतप्रधान काय चीज आहेत. आपल्या दोस्ताच मन दुखावलं म्हणून झापलं दिलीप कुमारांनी नवाज शरीफांना.

झालं असं होतं की त्यावेळी करगिलच युद्ध सुरू होतं. भारताने याआधी दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडं ते वाकडंच होतं. आता किती नाही म्हंटल तरी युद्ध म्हटलं की नाहक बळी जातात हे समजण्याइतकं मूर्ख आहे पाकिस्तान.

युद्ध होऊ नये ही तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची इच्छा होती. यासाठी वाजपेयींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना म्हणजे नवाज शरीफ यांना फोन केला. फोनच संभाषण सुरू असताना वायपेयींच्या बाजूला दिलीप कुमार उभे होते. अटलबिहारी आधीच रागावले होते. ते नवाज शरीफ यांच्याशी बोलताना आपल्या लाहोरच्या दौऱ्याबद्दल तर बोललेच पण त्यांनी कारगिलच्या युद्धवरून शरीफ यांना खूप खरीखोटी सुनावली.

त्यानंतर वाजपेयींचा राग काही आवरेना म्हणून त्यांनी फोनचा रिसिव्हर दिलीप कुमारांच्या हातात दिला. तेव्हा दिलीप कुमार शरीफांना म्हणाले,

मियां साहब हम आपकी तरफ से ऐसी उम्मीद नहीं करते थे, क्योंकि आपने हमेशा कहा है कि आप भारत और पाकिस्तान के बीच शांति चाहते हैं।

मैं एक भारतीय मुसलमान के तौर पर आपको बताना चाहता हूं कि पाकिस्तान और भारत के बीच तनाव की स्थिति में भारतीय मुस्लिम बहुत असुरक्षित हो जाते हैं और उन्हें अपने घरों से भी बाहर निकलना मुश्किल लगता है। इसलिए हालात को काबू रखने में कुछ कीजिए।

एवढं बोलून घेतल्यावर नवाज शरीफ काय म्हणणार. ज्या मुस्लिमांसाठी आम्ही लढतोय त्याच लोकांना पाकिस्तानच्या कुरापतीमुळे त्रास सहन करावा लागतोय हे ऐकून शरीफांनी तोंडात मारल्यासारखं गप्प ऐकून घेतलं आणि फोन ठेऊन दिला. त्यानंतर बऱ्याच वाटाघाटी नंतर युद्ध थांबल. पण भारताने पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवला होता.

पुढे १९९७ साली अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या लाहोर दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्या बसमध्ये दिलीप कुमार सुद्धा होते. पुढे पाकिस्तानने दिलीप कुमारांना पाकिस्तानचा सर्वोच्च सम्मान ‘निशान ए इम्तियाज’ देऊन सम्मानित सुद्धा केलं होतं.

आता वाचकांना वाटेल हा किस्सा आमच्या मनाचा आहे. तर भिडूनो आम्ही मनचं काहीच देत नाही. हा किस्सा खुद्द पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांच्या ‘नाइदर अ हॉक नॉर अ डव’ या पुस्तकात त्यांनी लिहिला आहे. आज पण जर तुम्ही पाकिस्तानात गेलात ना तर तुम्हाला दिलीप कुमारांचं फॅन फॉलोविंग नक्कीच सापडेल.

बाकी आपल्या दोस्ताला आणि देशाला त्रास दिला म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानाला झापण्याचं काम फक्त दिलीप कुमारचं करू शकतात.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.