कोल्हापूरातल्या या गावात चालतां चालतां सोनं घावतय ! 

काय बोलतयस मर्दा, कुठं ? कोल्हापूरात ! कुठलं गावं ? बीड… 

ख्या ख्या ख्या.. बीड तिकडं मराठवाड्यात. कोल्हापूरात कस बीड येईल.

तर या खतरनाक गोष्टीची सुरवात देखील तितक्याच विरोधीभास गावाच्या नावातून होते. मराठवाड्यातलं बीड माहितच असेल तसच एक बीड नावाच गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या इतर गावांसारखं. गावात नद्या आहे. मंदिर आहेत. विहीरी आहेत, शेत शिवार सगळं काही आहे. फक्त तलाठी आणि ग्रामसेवक आहेत का नाही तेवढं सांगू शकत नाही. बाकी सगळं जस इतर गावाचं असतय तसच या गावांमध्ये आहे. 

पण त्याच बरोबर एक खास गोष्ट देखील आहे ती म्हणजे सोन्याची, ती देखील खऱ्याखुऱ्या सोन्याची ! 

तर मॅटर असाय की, कोल्हापूरातल्या बीडमधल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात सोनं आहे. कुणाच्या घरात सोन्याचा छोटा साप, कुणाच्या घरात सोन्याची नाणी तर छोट्या छोट्या डाळीच्या आकाराचे सोन्याचे तुकडे अस सगळं काही या इथल्या गावकऱ्यांच्या घरात आहे. आणि हे सगळं काय गाडगीळ नायतर रंका मधनं विकत आणलेलं नाही तर या सगळ्यांना ते सोनं आपल्या शेतात घावलय. 

शेतात, म्हसरांच्या गोठ्यात, पांदिला, नदिकाठावर अस कुठेही आणि कधीही सोनं सापडतं. सहज चालता चालता खाली मान गेली की एखादा तुकडा सापडतो. मग गावकरी काय करतात तर हे सोनं संभाळून ठेवतात. देवाचा प्रसाद टाईप सगळा कारभार. 

डिटेलमध्ये स्टोरी काय आहे. 

कोल्हापूर पासून वीस पंचवीस किलोमीटरवर बीड गाव लागतं. भोगावती आणि तुळशी नद्यांचा संगम याच गावात झाला आहे. तर या गावात सोनं सापडत अस म्हणतात आणि ते खरं पण आहे. पण या सगळ्याची दंतकथा नेमकी काय आहे. 

तर बीड हे बाराव्या शतकात शिलाहार राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. पन्हाळा माहिताय न. तर आपला पन्हाळा याच काळात बांधला आणि तो शिलाहार राज्यातल्या राजानं बांधल्याचं सांगितलं जात. आत्ता राजधानी असल्यामुळे या गावात तटबंदी होती. तेव्हा कोल्हापूर सुद्धा बीडपुढं काहीच नव्हत अस हे गाव होतं. याच गावात विरगळ देखील आहे. थोडक्यात जुने जे काय अवशेष आहेत ते सगळे या गावात आहेतच.

बाराव्या शतकात हे गाव भरभराटीला आलेलं. त्याच काळात सोन्याच्या नाण्यांवर टांकसाळी, शिक्के मारायचं काम राजधानीतच चालायचं. याच मुळे इथे असं सोनं विखरुन गेलय अस सांगितलं जात. गावातल्या कल्लेश्वराचा माळ आणि बीड शेड परिसरात तर हमखास काहिना काही सापडत अस गावकरी सांगत असतात. 

पुढं काय… 

काय नाय सोनं शोधायला गावात जावू नका. कसय आपल्याकडे कुठल्यापण गावात दोन वेळा गल्लीतनं गेलं तरी टमकं बसतात. त्यासाठी सोनच पाहीजे अस काय नसतय. त्यामुळे कसय बाकीचा सगळा विषय इतिहास संशोधक आणि गावकरी बघतील आपण आपलं आपट्याच्या पानांनाच सोनं मानू. 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.