पहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाराष्ट्रात उडालेला राजकीय धुरळा आता कुठे सेटल होऊ लागलाय. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विधानसभेच्या सभापतींची निवडणूक देखील पार पडली आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. नार्वेकर यांना 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. १२ आमदार अनुपस्थित राहिले आणि नरहरी झिरवाळ सभापती असल्याने त्यांनी मतदान केलं नाही.
अशा पद्धतीनं नार्वेकर यांनी मोठ्या दणक्यात विजय मिळवला.
त्यानंतर मग चालू झाला नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम. सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आणि मग उभे राहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ते म्हणाले,
आज महाराष्ट्राने एक नवीन रेकॉर्ड देखील केलाय सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच पण ते देशाच्या इतिहासातील देखील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत
त्यावर सभागृहातून वय किती ? असा आवाज आला असताना फडणवीस म्हणाले वय विचारायचं नसतं. त्यामुळं लगेच नार्वेकर यांच वय कळलं नाही आणि सगळ्यांनी फडणवीस जे सांगतायेत तेच सत्य मानलं.
त्यामुळं मग आम्हीच शोधलं राहुल नार्वेकरांचं वय किती?
तर २०११ च्या विधानपरिषेदेच्या इलेक्शन नामांकन भरताना त्यांनी त्यांचं वय ३४ वर्षे असल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळं आत त्यांचं वय ४५ वर्षे क्रॉस करतं.
म्हणजे राहुल नार्वेकर ४५ व्या वर्षे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती झाले आहेत.
आणि खरा गेम इथंच आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण सभापती होण्याचा शिवराज पाटील चाकूरकर यांचा रेकॉर्ड अबाधितच राहतो. ते कसं अगदी पुराव्यानिशी बघू.
लोकसभेच्या वेबसाइटनुसार शिवराज पाटील यांची जन्मतारीख १२ ऑक्टोबर १९३५ आहे.
तर शिवराज पाटील महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले १७ मार्च १९७८ साली. म्हणजे वयाच्या ४३ वर्षे ५ दिवसांनी ते महाराष्ट्राचे सभापतीपदी म्हणून विराजमान झाले.
त्यामुळे इथंच राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष फडणवीसांचा हा क्लेम खोटा ठरतो.
विशेष म्हणजे अजित पवार यांनी देखील फडणवीस यांची री ओढत राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष असल्याचं म्हटलं आणि ते पण मग गंडले. देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारच्या काळातील सभागृहातील पहिल्याच भाषणात त्यांची ही चूक समोर आली.
शिवराज पाटील यांच्या कार्यकाळाबद्दलचे सगळे फॅक्ट बोल भिडूने शिवराज पाटील चाकूरकर यांना संपर्क साधून देखील कन्फर्म केले व त्यांनी देखील याला दुजोरा दिला.
तसेच शिवराज पाटील चाकूरकर बोलभिडू सोबत बोलताना म्हणाले,
”वय या सभापतीपदी निवडून जाण्याचा निकष नसावा तर सभापती निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीला घटनेचं, कायद्याचं आणि सभागृहातील नियमाचं किती ज्ञान आहे यावरून सभापती निवडला जावा.”
४३ व्या वर्षी महाराष्ट्राचे सभापतीपदी झालेल्या शिवराज पाटील यांची कारकीर्द सभापतींपुरतीच मर्यादित राहिली नाही. त्यानंतर ती अजूनच बहरली.
६ डिसेंबर १९७९ लाच त्यांना सभापती पद सोडावं लागलं. मात्र १९८० मध्ये शिवराज पाटील ७ व्या लोकसभेवर निवडून गेले . १९८०-८२ या कार्यकाळात त्यांना संरक्षण राज्यमंत्री म्हणून शिवराज पाटीलांनी काम केलं. १९८९ पर्यंत त्यांच्याकडे मग विविध मंत्रिपदं येत गेली. १९८४ आणि १८८९ या दोन्ही वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते.
त्यांच्या सभागृहातल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांना त्यांना १९८९-९० या कार्यकाळासाठी लोकसभेचा उपसभापती करण्यात आलं.
तर १९९१ मध्ये सलग चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्यानंतर त्यांनी १९९१ ते १९९५ या ५ वर्षांसाठी ते लोकसभेचे सभापती राहिले.
मात्र लोकसभेच्या सभापती झाला म्हणजे राजकारण संपलं असा समाज असताना चाकूरकरांची झेप घेणं मात्र चालूच होतं. १९९९ पर्यंत सरळ ७ वेळा शिवराज पाटील लोकसभेवर पोहचाले होते.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचं नाव काँग्रेसच्या संभाव्य पंतप्रधान पदाच्या यादीतही त्यांचं नाव होतं.
मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचा पराभव झाला वं ते शर्यतीत मागे पडले. तरी पराभवानंतर देखील त्यांना देशाचं गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. २००८ च्या मुबंईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तिथूनच मग त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला फुल्ल स्टॉप लागला.
त्यामुळं अवघ्या ४५ व्या वर्षी सभापती झालेल्या राहुल नार्वेकरांसाठी शिवराज पाटील हे एक चांगलं उदाहरण ठरू शकतात.
हे ही वाच भिडू :
- भाषणात अवघड इंग्लिश शब्द वापरल्याबद्दल शिवराज पाटलांची खरडपट्टी काढण्यात आली होती.
- वाजपेयी लातुरात एक वाक्य बोलले आणि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला.
- सभापतींनी भाषणावर टाळ्या वाजवण्याची प्रथा नव्हती पण त्यांना राहवलं नाही