काँग्रेस पक्षातुन बाहेर पडत गेल्या ७० वर्षांत ७० पक्ष स्थापन झालेत
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासूनच देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावलेला पक्ष ! आत्तापर्यंत देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल घडवणारा आणि आत्तापर्यंतच्या बदलांना साक्षीदार असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस ! पण याच सोबत काँग्रेस पक्षात देखील अनेक बदल घडलेत त्यातला एक म्हणजे या पक्षातून काही गट बाहेर पडून अनेक पक्ष जन्माला आली.
तसा तर काँग्रेस पक्षाचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण आज आपण थोडक्यात याचा आढावा घेऊयात कि, स्वातंत्र्यानंतर मुख्य असलेल्या काँग्रेसमधून बाहेर पडून ७० पक्षांची निर्मिंती झाली. कधी काही घटना कारणीभूत ठरल्या तर काही वैचारिक वाद कारणीभूत ठरले. त्यातलय काही गटांनी फुटीरतावादी भूमिका स्वीकारून दुसरा पक्ष स्थापन केला तरी त्यातले काही पक्ष लवकरच संपुष्टात आले अन इतर पक्षांमध्ये विलीन झाले आहेत. काही मोठे पक्ष बघायला गेले तर जसे कि तृणमूल, एनसीपी आणि वायएसआर काँग्रेस असे पक्ष आजतागायत सक्रिय आहेत.
सुरुवात आता आपण किसान मजदूर प्रजा पक्षापासून …१९५१
स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसमधून बाहेर पडणारी पहिली पार्टी काढली आचार्य कृपलानी यांनी. कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना करण्यात आली. त्यांचे दोन नेते, प्रफुल्ल चंद्र घोष आणि टंगुतुरी प्रकाशम हे अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि मद्रासचे मुख्यमंत्री होते. पुढे जाऊन या पार्टीचे प्रजा सोशिलिस्ट पार्टी मध्ये विलानीकरण करण्यात आले
इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस -१९५६
भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि मोठे काँग्रेस नेते श्री.राजगोपाल चारी यांनी काँग्रेसचे तामिळनाडू मधील नेते कामराज यांच्याबरॊबर पक्षांतर्गत झालेल्या वादामुळे काँग्रेस सोडून या इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेसची स्थापना केली होती.
स्वतंत्र पार्टी – १९५९
स्वतंत्र पक्ष हा एक लिबरल विचारसरणीचा राजकीय पक्ष होता, जो १९५९ ते १९७४ या दरम्यानच अस्तित्वात होता. काँग्रेसमध्ये वाढत्या समाजवादी वर्चस्वाविरोधात जाऊन सी. राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती.
केरला काँग्रेस – १९६४
के.एम जॉर्ज यांनी १९६४ मध्ये सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडत केरळ काँग्रेसची स्थापना केली होती. खरं तर जॉर्ज आणि आर. बालकृष्ण पिल्लई यांनी मन्नत पद्मनाभन यांच्या पाठिंब्याने केरळ काँग्रेसची स्थापना केली गेली होती.
भारतीय क्रांती दल – १९६७
भारतीय क्रांती दल हा भारतातील एक राजकीय पक्ष होता, ज्याची स्थापना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चरण सिंग यांनी केली होती. ऑक्टोबर १९६७ मध्ये लखनौ येथे झालेल्या बैठकीत पक्षाची स्थापना करण्यात आली. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, पक्ष जनता पक्षात विलीन झाला.
बेंगॉल काँग्रेस – १९६७ मध्ये बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अजॉय मुखर्जी यांनी बंगाल काँग्रेस ची स्थापना केली होती.
काँग्रेस (आर) – १२ नोव्हेंबर १९६९ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मग इंदिरा गांधींनी प्रतिस्पर्धी संघटना स्थापन केल्याने शेवटी पक्ष फुटला, ज्याला काँग्रेस (आर) असे नाव पडले. तेंव्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये ७०५ सदस्यांपैकी ४४६ सदस्य इंदिराजींच्या बाजूने गेले.
काँग्रेस (O) – काँग्रेस (आर) मधून उरलेले सदस्य काँग्रेस (O) मध्ये राहिले. काँग्रेस (आर) ला ज्यांचं प्रतिनिधित्व इंदिरा गांधी करत होत्या ज्याला इंडिकेट असं म्हणलं जायचं तर काँग्रेस (O) ला सिंडिकेट म्हणलं जायचं. ज्याचं के कामराज आणि नंतर मोरारजी देसाई हे प्रतिनिधित्व करत होते.
उत्कल काँग्रेस – १९६९
उत्कल काँग्रेसची ओडिशामध्ये १९६९ मध्ये बिजू पटनायक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडल्यावर त्याची स्थापना केली. १९७४ मध्ये उत्कल काँग्रेसचे भारतीय लोकदलात विलीनीकरण झाले.
काँग्रेस फॉर डेमोक्रॉसी -१९७७
काँग्रेस फॉर डेमोक्रसी (CFD) या पक्षाची स्थापना १९७७ मध्ये जगजीवन राम यांनी केली होती. जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी यांनी इंदिरा गांधींच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आणि भारतीय आणीबाणीच्या काळात त्यांच्या राजवटीचा निषेध केल्यानंतर हा पक्ष काढला होता. पक्षाने १९७७ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जनता आघाडीसोबत लढवली आणि नंतर त्याच पक्षात काँग्रेस फॉर डेमोक्रसी हा पक्ष विलीन झाला.
काँग्रेस Urs – १९७९
इंडियन नॅशनल काँग्रेस (U) हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (I) पासून फुटलेला गट होता, जो कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांनी जुलै १९७९ मध्ये स्थापन केला होता. उर्स यांचं पक्षातून बाहेर पाडण्याचं कारण म्हणजे इंदिराजींचे पुत्र संजय गांधी यांचे पक्षात परतणे हे होते.
काँग्रेस A – ए के अँटनी यांनी १९८० मध्ये मुख्य पक्ष काँग्रेस सोडून काँग्रेस A हा पक्ष स्थापन केला.
काँग्रेस समाजवादी पक्ष – १९८१
हा मुख्य काँग्रेस मधून न फुटता काँग्रेस Urs मधून हा पक्ष फुटला. वसंतदादा पाटील यांचं सरकार पडून शरद पवारांनी पुलोद चा प्रयोग केला. पुन्हा हाच पक्ष राजीव गांधींच्या आग्रहामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला.
ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस – १९९४
अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस (तिवारी) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता ज्याची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असंतुष्ट नेते नारायण दत्त तिवारी, अर्जुन सिंग, नटवर सिंग आणि रंगराजन कुमारमंगलम यांनी केली होती. सोनिया गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यावर हा पक्ष नंतर काँग्रेस पक्षात विलीन झाला.
तृणमूल काँग्रेस -१९९७
२६ वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेस मध्ये राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून तृणमूल हा पक्ष स्थापन केला. ज्या पक्षाने आजच्या राजकारणात एक महत्वाचं स्थान मिळवलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -१९९९
शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. शरद पवार, पीए संगमा, तारिक अन्वर यांनी मिळून या पक्षाची १९९९ मध्ये स्थापना केली होती.
जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी –
माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली.
काँग्रेस जननायक पेरावई – २००१
काँग्रेस जननायक पेरावई (काँग्रेस डेमोक्रॅटिक फ्रंट) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक राजकीय पक्ष होता. त्याची स्थापना २००१ मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली होती.
वाय एस आर काँग्रेस – २०११
काँग्रेस पक्षात दुय्यमत्वाची वागणूक दिल्याचा आरोप करत जगनमोहन रेड्डी यांनी वाय एस आर काँग्रेसची स्थापना केली.
पंजाब लोक काँग्रेस -२०२१
अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देत २ नोव्हेंबर २०२१ रोजी पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. हे सर्व मुख्य पक्ष सोडता इतर अनेक गटांनी काँग्रेस सोडून आप-आपली पक्ष स्थापन केले मात्र राजकीय क्षेत्रात जास्त काळ न टिकल्यामुळे त्यांची चर्चा फारशी झाली नाही. पण लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे, या पक्षांनी जरी मतभेदांमुळे पक्षातून बाहेर पडण्याची भूमिका स्वीकारली असली तरीही सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसचा च हात धरावा लागला.