बुट नसल्याने पात्र असूनही भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता?
क्रिडाविश्वात सध्या फुटबॉल फिव्हर आहे कारण यावर्षीचा फुटबॉल विश्वचषक सुरु व्हायला अवघे काही दिवस उरलेत. भारताचा फुटबॉल संघ जरी स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी भारतातील फुटबॉलप्रेमी देखील तितक्याच आतुरतेने या विश्वचषकाची वाट बघताहेत. तसंही भारतीय संघाशिवाय फुटबॉल वर्ल्ड कप बघणं, ही गोष्ट काही भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी नवीन नाही कारण भारतीय संघाला विश्वचषकात खेळताना बघण्याची सवय आजतागायत तरी त्यांना नाही. आत्तापर्यंत तरी भारतीय संघ फुटबॉल विश्वचषकात कधीही सहभागी होऊ शकलेला नाही.
पण १९५० साली मात्र ही संधी भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी उपलब्ध होऊ शकली असती, मात्र स्पर्धेसाठी पात्र ठरून देखील ऐनवेळी भारतीय संघाने विश्वचषकातून माघार घेतल्याने ते शक्य होऊ शकलं नाही. भारतीय संघाने या विश्वचषकातून माघार घेण्यासंबंधित अनेक कारणं सांगितली जातात, त्यापैकी एक खूप चर्चिलं गेलेलं कारण असं की
‘फिफा’ने भारतीय खेळाडूंकडे खेळण्यासाठी बूट नसल्याने भारतीय संघाला विश्वचषकात प्रवेश नाकारला. जाणून घेऊयात खरंच या गोष्टीत काही तथ्य आहे का..? की हे फक्त एक मिथक आहे..?
हा बुटाचा किस्सा नेमका आला कुठून…?
१९४८ सालची ऑलिम्पिक स्पर्धा इंग्लंडमधल्या लंडन शहरात पार पडली होती. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच मोठी स्पर्धा भारत एक स्वायत्त देश म्हणून खेळत होता. या स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. कारण संघातील बहुतांश खेळाडू हे बुटाशिवाय, तर काही खेळाडू हे फक्त सॉक्स घालून खेळले होते. या घटनेनंतर फिफाने भारतीय संघाला बजावलं होतं की, विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला बुटाशिवाय खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.
याच कारणासाठी भारताला प्रवेश १९५० च्या विश्वचषकासाठी प्रवेश नाकारण्यात आला का..?
नाही. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की भारताला प्रवेश नाकारण्यात आला नव्हता तर पात्र ठरून देखील भारतीय फुटबॉल संघटनेने विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मुळात भारतीय संघ विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा किस्साच रंजक होता. १९५० च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया खंडातील एका संघाला प्रवेश द्यायचा होता, आणि आशिया खंडातील इतर राष्ट्रांनी (फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि म्यानमार) स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यामुळे आशिया खंडातून स्पर्धेत सहभागी होऊ शकत असलेल्या एकुलत्या एक संघाला अशा कारणास्तव ‘फिफा’ स्पर्धेत प्रवेश नाकारणार नव्हतीच.
पात्र ठरून देखील भारतीय संघाने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय का घेतला…?
या प्रश्नाच्या उत्तरा दाखल अनेक कारणं सांगितली जातात. पहिलं कारण असं की, हा विश्वचषक ब्राझीलमध्ये होणार होता. भारतातून ब्राझीलपर्यंतचा प्रवास करणे भारतीय संघासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हत. परंतु हे कारण अशा साठी पटण्यासारखं नाही कारण विश्वचषकाचे आयोजक ब्राझीलने प्रवासासाठीचा खर्च उठविण्याची तयारी दर्शविली होती. कारण भारताचा सहभागच स्पर्धेतील आशिया खंडाला प्रतिनिधित्व मिळवून देणारं होता.
त्यावेळच्या भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सैलेन मन्ना यांनी यांनी मात्र ‘स्पोर्ट्स इलुस्ट्रेटेड’ला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या विश्वचषकात न खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत बुटाची थेअरी किंवा आर्थिक कारण या दोन्ही गोष्टी नाकारल्यात. त्यांच्यामते, “त्यावेळी भारतीय फुटबॉल संघटना विश्वचषक स्पर्धेबाबतीत फारशी गंभीर नव्हती आणि सर्व लक्ष १९५२ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीवर देण्यात आलं होतं. आमच्यासाठी ऑलिम्पिकपेक्षा मोठं काहीच नव्हतं.”