श्रीपाद छिंदम कसा निवडून आला ?
धुळे आणि नगर महानगरपालिकांचा निकाल काल लागला. धुळ्यात बीजेपी तर नगरला सेनेला जास्त जागा मिळाल्या. राजकारणात पहिल्यांदाच कोणत्या महानगरपालिकते कोणाची सत्ता बसली याहून अधिक चर्चा एका नगरसेवकांच्या विजयाची झाली.
त्याला कारण देखील तितकच तगड आहे, श्रीपाद छिंदम हा साधासुधा माणूस राहिला नाही. अखंड महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवराय यांच्याबाबात वादग्रस्त विधान करणारा हा माणूस. वास्तविक अशा व्यक्तिस माणूस म्हणणं हे देखील चूक ठरु शकतं हे त्याचं वादग्रस्त विधान ऐकल्यानंतर आपणासही लक्षात येवू शकतं.
तरिही असा माणूस? निवडून कसा येवू शकतो..?
तो देखील ४२३२ इतकी मते घेवून ? हा खरतर चर्चेचा विषय.
त्यासाठी दिलं जाणार पहिलं कारण या वार्डातून भाजपच्या उमेदवाराचा बाद झालेला अर्ज. भाजपचे प्रदिप परदेशी यांचा अर्ज बाद झाल्याचं सांगितलं जात असलं तरी यामध्ये तथ्य नाही. सुरवातीला हा अर्ज बाद व नंतर स्वीकारला गेल्याचं सांगितलं जातं. भाजपचे उमेदवार प्रदिप परदेशी यांना दूसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. २,५६१ मते मिळाली.
विरोधी उमेदवार देण्यात आला मात्र तो सोयीचा होता का? हे स्थानिक मतदारच सांगू शकतील?
जातीच राजकारण.
सोशल मिडीयावर कालपासून हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायलर होत आहे. पद्मशाली समाजाने आपल्या समाजाच्या उमेदवारांच्या पाठींमागे उभा राहण्याचा घेतलेला निर्णय. निवडणुका जात पाहून होतात हे लपून राहिलेलं नाही. वार्ड क्रमांक नऊ मध्ये तोफखाना परिसर येतो तिथे छिंदमला मानणाऱ्यांचा मोठ्ठा समुदाय आहे. या भागातल्या छिंदमने केलेले वक्तव्य याहून अधिक आपल्या समाजाचा उमेदवार म्हणूनच मोठ्या प्रमाणात प्रचार झाला.
निवडणुकीच्या दरम्यान तणाव नको म्हणून श्रीपाद छिंदमला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम हा उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम पहात होता. रविवार सकाळी सव्वासातच्या सुमारास श्रीकांत छिंदम याने रेसिडेन्शल हायस्कुल येथे जावून केंद्र क्रमांक १५८ मध्ये EVM मशीन्सची पूजा केली. त्याच्या सोबत भाजपच्या उमेदवार अंजली वलकट्टी देखील होत्या.
श्रीकांत छिंदम यांच्यावर कारवाई झाली असली. वार्ड क्रमांक ९ च्या ड प्रभागातून उभा असणाऱ्या अंजली वलकट्टी यांची उपस्थिती खूप काही सांगून जाते. श्रीपाद छिंदम हा अपक्ष तर त्याच प्रभागातील ड मधून लढणाऱ्या अंजली वलकट्टी या भाजपच्या उमेदवार. वार्ड मधून एकत्रित होणारा प्रचार हा परदेशी यांच्या बाजूने कमी व छिंदम यांच्या सोयीचा झाल्याच्या संशयाला जागा मिळते.
पद्मशाली समाज पाठीमागे उभा राहिला, पद्मशाली समाजाच्या भावना महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांहून अधिक आहेत का?
सोलापूर आणि अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पद्मशाली समाज आहे. या समाजाची नाळ आंध्रप्रदेशसोबत जोडली जाते. कित्येक दशकांपुर्वी महाराष्ट्रात स्थलांतर झालेला हा समाज महाराष्ट्राच्या मातीसोबत एकरुप झाला. एका स्क्रिनशॉटवरुन संपुर्ण पद्मशाली समाजाला दोषी धरणं हे चुकच. महाराष्ट्राच्या भूमीत सेवा करणारे कितीतरी मोठ्ठी नावे या समाजात आहेत.