ममता दीदींचं सोडा एका प्रचारसभेमुळे बाळासाहेबांचा थेट मतदानाचा अधिकार गेला होता….

सध्या प.बंगालमध्ये इलेक्शनचा धुमाकूळ सुरु आहे. तृणमूल, डावे पक्षांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगालात भाजपने आपला जोर लावला आहे. पंतप्रधानांच्या पासून ते गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारातून ममता दीदींनी बेजार केलंय. अशातच ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचारसभेत सीआरपीएफ जवानांना घेराव घाला असं विधान केलं आणि इलेक्शन कमिशनने त्यांना ऐन निवडणुकीत प्रचारासाठी बंदी घातली.

महाराष्ट्राच्या इतिहासात अशा कित्येक निवडणुका गाजल्या आहेत. फक्त राज्यपातळीवरच नाही तर अगदी एखाद्या मतदारसंघातली निवडून देखील देशाच्या पातळीवर चर्चेला आल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत.

म्हणायला तशी हि पोटनिवडणुकच होती. पण या पोटनिवडणुकीनंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हिंदूत्त्व. या निवडणूकीनंतर सेनेला भाजपसारखा साथीदार मिळाला, बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आणि हिंदू या अस्मितेवर मत मागता येवू शकतं.

देशाच्या राजकारणात हिंदूत्त्वाच नाणं वाजू शकतं हे सिद्ध झालं. 

ते सालं होतं, १९८७ चं. आणि मतदारसंघ होता विलेपार्ले. 

विलेपार्ले मतदारसंघातून आमदार असणारे कॉंग्रेसचे हंसराज भुग्रा यांच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विलेपार्ले येथे पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत कॉंग्रेसने प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली.

प्रभाकर कुंटे हे त्याकाळचं कॉंग्रेसमधलं मोठ्ठ नाव होतं. ते पडतील अशी कोणतीच चिन्ह नव्हती. कॉंग्रेसच काय तर कॉंग्रेसत्तर पक्षांचा देखील त्यांना पाठिंबा होता तो त्यांच्या समाजवादी विचारांमुळे. कॉंग्रेसतर्फे या निवडणुकीत हंसराज भुग्रा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला होता. तर जनता पक्षाने प्राणलाल व्होरा यांना उमेदवारी दिली होती. 

या पार्श्वभूमीवर एक घटना घडून गेली होती. त्याचा उल्लेख इथे करावा लागेल.

त्या वेळी मुंबईचे महापौर म्हणून डॉ. रमेश प्रभू कार्यभार पहात होते. महापालिकेत कामकाज चालू असताना रुस्तम तिरंदाजांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांवर उत्तर देत असताना महापौर रमेश प्रभू म्हणाले की,

होय मी हिंदू मेयर आहे. माझे आईवडिल हिंदू आहेत आणि मला हिंदू म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत नाही.

महापौरांनी स्वत:च्या धर्माचा उल्लेख करणे हा चर्चेचा विषय होता. त्यात त्यांनी स्वत:ला हिंदू महापौर म्हणवून घेतलं होते. त्यांच्या विधानाचे पडसाद संपुर्ण देशभर उमटू लागले. इतकच काय तर कलकत्ता येथे झालेल्या महापौरांच्या परिषदेमध्ये रमेश प्रभू यांचा या वक्तव्याबद्दल सत्कार देखील करण्यात आला. 

याच पार्श्वभूमीनंतर विलेपार्लेची पोटनिवडणूक लागली.

बाळासाहेब ठाकरेंनी तत्पुर्वी औरंगाबादच्या कत्तलखान्याचा प्रश्न उपस्थित करुन हिंदूत्त्वाची एक झलक दिलीच होती. रमेश प्रभूंच्या वक्तव्याच्या निमित्ताने का होईना हिंदूत्वाचा प्रश्न चर्चेत आला आणि बाळासाहेबांनी एक निर्णय महत्वाचा निर्णय घेतला. 

त्यांनी रमेश प्रभू यांनाच विलेपार्ले येथून निवडणूकीच्या मैदानात उतरवायचं ठरवलं. एका दिवसात निर्णय होवू अर्ज दाखल  करण्यात आला. आणि पुढे जो प्रचार झाला त्यातून संपुर्ण भारतात विलेपार्ले १९८७ ची इलेक्शन अजरामर झाली. 

प्रचारासाठी पहिली सभा आयोजित करण्यात आली.

या पहिल्याच सभेला हिंदूत्त्वाचा जाज्वल्य अभिमान असणारे शंभू महाराज उपस्थित होते. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे आणि शंभू महाराज आणि पाठिमागे कृष्ण अर्जूना भगवतगीता सांगतो असे दृश्य होते. या सभेला मोठ्ठा समुदाय उपस्थित राहिला.

मुंबईच्या सर्व भागातून पार्ल्यामध्ये शिवसैनिक एकवटले होते आणि इथेच घोषणा देण्यात आली की, 

गर्व से कहों हम हिंदू हैं !!!  

या घोषणेनंतर वातावरण कमालीच बदललं. सुरवातील एकहाती वाटणारी हि निवडणुक आत्ता तिरंगी झाली. या निवडणुकीत जनता दलातर्फे उभा राहिलेल्या प्राणलाल व्होरा यांनी भाजपने पाठिंबा दिला होता. निवडणूकींचा रंग आत्ता भगवा झाला होता. संपुर्ण मुंबईतल्या शिवसैनिकांनी विलेपार्ले मतदारसंघात तळ ठोकला होता.

जागोजागी हिंदूत्वाचा गजर करण्यात येवू लागला होता. हिंदूत्वाच्या नावावर होणारी हि देशातील पहिली निवडणूक होती. 

या प्रचारानंतर कॉंग्रेसचे धाबे दणाणले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व्यक्तिश: या मतदारसंघात तळ ठोकून होते. एकच पोटनिवडणूक संपुर्ण भारतात चर्चेला येवू लागली.  हिंदूत्त्वाच्या थेट प्रचारामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटना देखील शिवसेनेचा प्रचार करु लागल्या. या काळात भाजपने सेनेच्या विरोधात म्हणजेच जनता दलास साथ देत होती. 

निकाल लागला आणि अपेक्षित परिणाम साध्य झाला. सेनेचे रमेश प्रभू आमदार म्हणून निवडून आले.

ते पहिल्यांदाच आमदार झाले मात्र कॉंग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी या निवडणूकीत झालेल्या प्रचारामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. लोकप्रतिनिधी कायदा १९५२ नुसार धर्माच्या आधारावर मते मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हि निवडणुक रद्द ठरवली. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केले. 

कुंटे यांनी उच्च न्यायलयात जो दावा ठोकला होता त्या बाजूने न्यायालयात भूमिका मांडण्याच काम अॅड. एम.पी.वशी यांनी केलं होतं तर शिवसेनेच्या बाजूने भूमिका मांडण्याच काम राम जेठमलानी आणि अधिक शिरोडकर यांनी केलं होतं. कोर्टाने हि निवडणूक रद्द ठरवलीच पण,

बाळासाहेबांनी धर्माच्या नावावर मत मागितल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. एखाद्या भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची हि दुर्मिळच घटना होती. 

१९९९ ते २००५ या सहा वर्षात बाळासाहेब ठाकरे मतदान करू शकले नाहीत.

मात्र या निवडणुकीमुळे एक गोष्ट झाली ती म्हणजे, हिंदूत्त्वाची राजकिय ओळख सिद्ध झाली. त्यातून अधिकाधिक आक्रमक हिंदूत्वाचा प्रचार सुरू झाला. पुढे प्रमोद महाजन यांनी सेनेची हिच नस ओळखली आणि भाजप शिवसेनेकडे घेवून गेले. त्यातूनच भारतीय राजकारणात जाज्वल्य हिंदूत्वाचा जन्म झाला. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.