श्री कृष्ण मालिकेत कृष्णाचा रोल केला अन् त्यानंतर बॅनर्जींनी सिने इंडस्ट्री कायमची सोडली

आज सगळीकडे दहीहंडीची धुमधाम आहे. पुण्यात मानाचे गणपती आणि मुंबईत मानाच्या दहीहंड्या असं दोन शहरांचं समीकरण जुळलंय. आज टीव्हीवर सगळीकडे दहीहंडीचं वातावरण दिसतंय. अलीकडच्या काळात या दहीहंड्यांचे थर वाढत चाललेत, क्रेझ वाढत चाललीय. जन्माष्टमी म्हणलं की सर्वांना दहीहंडीच आठवते..

पण ज्या भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा आपण उत्सव साजरा करतो तो नेमका कृष्ण कसा होता हे दाखवणारे श्री कृष्ण मालिकेतील सर्वदमन बॅनर्जी यांची आठवण झाली. सर्वदमन बॅनर्जी आज कुठे आहेत हे अनेकांना माहित नाहीत. 

श्री कृष्ण मालिकेत बॅनर्जी यांनी प्रौढ कृष्णाची अतिशय समर्पक भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत कृष्णाची बालवयातील भूमिका अशोक कुमार बालकृष्णनने साकारली होती. तर कृष्णाची किशोर वयातील भूमिका स्वप्नील जोशी या मराठी अभिनेत्याने साकारली होती. 

त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की, ‘श्री कृष्ण’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे तीनही कलाकार आज काय करतात? 

यातला स्वप्नील जोशी तर मराठी सिनेमातच काम करतोय त्यामुळे तो आपल्याला माहित आहे. मात्र कृष्णाची लहानपणीची भूमिका साकारणारा अशोक कुमार बालकृष्णन आणि प्रौढ कृष्णाचे सगळ्यात यथार्थ पात्र साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आज काय करतात. याबद्दल अनेकांना कल्पना नाही. यातील अशोक कुमार बालकृष्णन साऊथच्या सिनेमात काम करतोय.

तर कृष्णाला मनात ठसवणारे सर्वदमन बॅनर्जी यांनी सिने इंडस्ट्रीच सोडून दिलीय त्यामुळे ते आता कुठे राहतात याची अनेकांना माहिती नाही, 

तर सर्वदमन बॅनर्जी सध्या ऋषिकेशमध्ये लहान मुलांसाठी ‘पंख’ नावाची संस्था चालवतात.

सर्वदमन बॅनर्जी यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा कृष्ण म्हणूनच ओळखलं जातं. परंतु कृष्ण म्हणून ओळख निर्माण झालेल्या या बॅनर्जींनी ‘श्री कृष्ण’ मालिकेनंतर काही मालिकांमध्ये काम केलं आणि कायमचीच इंडस्ट्री सोडली.

सर्वदमन बॅनर्जी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच आध्यात्म आणि धार्मिकतेची ओढ होती. आठवीत असतांना सर्वदामं आणि त्यांच्या मित्रांनी सायलेंट शाउट नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. त्या शॉर्ट फिल्ममुळे त्यांच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.

‘सायलेंट शाउट’ ने सर्वदमन यांच्या मनात अभिनयाची इतकी आवड निर्माण केली कि त्यांनी सिनेमात करियर करण्याचा निर्णय घेतला.

कानपूरमध्ये १२ वी पूर्ण केल्यांनतर अभिनयाचं  शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आले. तेथून पस आउट झाल्यांनतर त्यांनी काही चित्रपटात काम केलं. ज्यात त्यांचा पहिला सिनेमा होता आदी शंकराचार्य.

मात्र रामांनद सागर यांच्या श्री कृष्ण मालिकेमुळे त्यांना सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली. त्या मालिकेत सर्वदमन यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना स्वतःच्या नावापेक्षा कृष्ण या नावानेच जास्त ओळखलं जात होतं. ही मालिका करतांनाच त्यांनी आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला होता. 

त्यांनी ठरवलं कि आयुष्याच्या केवळ ४५-४७ वर्षापर्यंत फिल्म इंडस्ट्रीत काम करायचं आणि त्यानंतर  सिने इंडस्ट्री सोडायची.

श्री कृष्ण नंतर सर्वदमन यांनी आणखी काही मालिकांमध्ये काम केलं. ज्यात जय गंगा मैय्या, अर्जुन, ओम नमः शिवाय या मालिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मालिकांमध्ये सुद्धा सर्वदम यांनी कृष्ण किंवा विष्णुंचीच भूमिका साकारली. त्यानंतर ऍक्टिंग करण्यातलं मन उठून गेल्यामुळे त्यांनी सिने इंडस्ट्री सोडून दिली.

पण त्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातं…

रामानंद सागर यांच्या श्री कृष्ण मालिकेप्रमाणेच बी आर चोपडा यांनी महाभारत मालिका बनवली होती. त्यात नितीश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती.

एकदा एका कार्यक्रमात सर्वदमन बॅनर्जी यांना नितीश भारद्वाज यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सर्वदमन बॅनर्जी यांनी नितीश भारद्वाजबद्दल कठोर शब्द बोलले होते.

नितीश भारद्वाजबद्दल बोलतांना सर्वदमन म्हणाले होते कि, “कोणता कृष्ण? ज्याला जगभरातील कोणत्याच कृष्णभक्ताने विचारलं नाही. मला भेटायला बीबीसीची टीम गुजरातच्या स्टुडिओत आली होती. टीएनटीने माझी मालिका खरेदी केली. आज जगातील अनेक देशांमध्ये माझी मालिका चालतेय.” असं म्हणून सर्वदमन यांनी नितीश भारद्वाज यांना बोल लावले होते. 

तर नितीश भारद्वाज यांनी सुद्धा कृष्णाच्या भूमिकेवरून सर्वदमन बॅनर्जी यांना फटकारलं होतं. सिने इंडस्ट्रीत सर्वदमन बॅनर्जी आणि नितीश भारद्वाज यांच्यात कायम ३६ चा आकडा होता असं सांगितलं जातं. 

अखेर सर्वदमन यांनी इंडस्ट्री सोडली आणि ऋषिकेशला जाऊन मेडिटेशन शिकवायला सुरुवात केली.

सर्वदमन यांनी इंडस्ट्री सोडण्याचं कारण कोणतंही असो, इंडस्ट्री सोडल्यांनंतर सर्वदमन गेल्या २० वर्षांपासून ऋषिकेश मध्ये मेडिटेशन शिकवत आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘पंख’ नावाची संस्था सुद्धा सुरु केलीय. ज्यात २०० गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो. तर गरीब महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं.

सर्वदमन बॅनर्जी यांनी इंडस्ट्री सोडली मात्र बाकी दोन कलाकारांनी आपापल्या भाषेतील सिनेमांमध्ये करियर करत आहेत. 

बाळकृष्णाची भूमिका साकारणारा अशोक कुमार बालकृष्णन आज तमिळ सिनेमात काम करायला करतोय. 

नुकताच अशोक कुमार बालकृष्णन याचा तमिळ सिनेमा मायाथिराई रिलीज झालाय.  

१२-१३ वर्षाच्या अशोक कुमारनं श्री कृष्णाची भूमिका साकारल्यांनंतर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २००७ मध्ये आलेल्या मुरुगन नावाच्या तमिळ सिनेमात मुख्य भूमिका साकारली. त्यांनतर आजगायत अशोक कुमारने मागे वळून पाहिलं नाही.  त्याने तामिळ सिनेमांबरोबरच मल्याळम आणि तेलगू सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय. 

आता स्वप्नील जोशींबद्दल मराठी प्रेक्षकांना जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत कारण स्वप्नील बद्दल आपल्याला माहितीच आहे.

श्री कृष्ण मालिकेच्या आधी स्वप्नील जोशीने रामानंद सागर यांच्याच उत्तर रामायणामध्ये कुशचा रोल केला होता. त्या भूमिकेनंतर श्री कृष्ण मध्ये किशोर वयीन कृष्णाची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली होती.

कृष्ण साकारल्यांनंतर स्वप्नील जोशी मराठी सिनेमात काम करायला लागला. आज स्वप्नील जोशी मराठी सिनेमासृष्टीतला टॉप ऍक्टर्स मध्ये गणला जातो. 

श्री कृष्ण मालिकेत कृष्णाचा रोल केल्यांनतर सर्वदमन बॅनर्जी, अधिक कुमार बालकृष्णन आणि स्वप्नील जोशी या तिघांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्यामुळे त्यांचं नाव काढताच त्यांनी साकारलेली श्रीकृष्णाची भूमिकाच सर्वात प्रथम डोळ्यासमोर येते.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.