खरंच महाराष्ट्रात एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते का ?

आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली होती असं पवार यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला असंही पवार म्हणाले.

पुढं  ते म्हणाले की, प्रामाणिकपणे असे वाटते की रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल.

पण या निमित्ताने प्रश्न विचारला जातोय की, 

खरंच महाराष्ट्रात एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते का?

याचा संदर्भ सापडतो गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत. 

नव्वदचं दशक उजाडलं तोपर्यंत बीडच राजकारण प्रचंड बदललं होतं. चाळीस वर्षांपूर्वी शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके, बाबूराव आडसकर, केशरकाकू क्षीरसागर, पंडितराव दौंड यांनी कुशल राजकारणातून सत्तास्थाने काबीज केलेली होती. परंतु आता भाजपचे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी आणि काँग्रेसमध्ये अशोक पाटील या युवा नेत्यांचा उदय झाला.

विशेषतः गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवत बीडमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरात भाजपचे आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याला सुरवात केली होती.  

१९९१ साली राजीव गांधी यांचे निधन झाले. सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्यास इन्कार केला. काँग्रेसमध्ये नरसिंहराव, शरद पवार अशा नेत्यांचा वरचष्मा वाढला. यातूनच ठिकठिकाणी काँग्रेसमध्ये गटातटामध्ये वाढ झाली. बीडमध्ये होत असलेल्या संघर्षाला कंटाळून अशोक पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

१९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नामुळे चक्क रजनी पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळाली. केशरकाकू क्षीरसागर यांना हरवून त्या निवडून देखील आल्या. वाजपेयी सरकार वेळी रजनी पाटील भाजपच्या खासदार होत्या. पण पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 

पुढच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं. सोनिया गांधींचं राजकरणात आगमन झालं होतं. भाजपच्या खासदार असल्या तरी रजनी पाटील यांची नाळ काँग्रेसशी जोडली गेली होती. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी शंकरराव चव्हाण यांच्या सल्ल्याने त्या काँग्रेसमध्ये परतल्या. सोनिया गांधी यांच्या पर्यंत त्यांची ख्याती पोहचली.

संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व, गांधी घराण्याशी असलेले चांगले संबंध या बाबींमुळे रजनी पाटील यांना महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचं अध्यक्षपद अशी अनेक महत्वाची पदे मिळाली.

यातूनच विलासरावांच्या मृत्यू नंतर रिक्त झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेवर रजनी पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर झाली. 

भाजपने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध निवडून देखील आल्या. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे हे शक्य झालं.

पुढच्या दोन वर्षातच दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे तेव्हा केंद्रात मोदी सरकारमध्ये  ग्रामविकास मंत्री होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर बीडच्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घ्यावी लागणार होती.

भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. 

महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे तिथे विरोधकांकडून उमदेवार दिला जाणार नाही असा अनेकांचा अंदाज होता. त्याप्रमाणे राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला नाही. पण त्याकाळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फुटली होती आणि दोन्ही पक्ष वेगळे वेगळे लढत होते. यातूनच काँग्रेसतर्फे अशोक पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अशोक पाटील तेव्हा बीडमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे चांगले मित्र म्हणून देखील ओळखले जायचे. 

तरीही मुंडे यांच्या मृत्यूनंतर अशोक पाटील यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणे हे अनेकांना रुचले नाही. याचा परिणाम मतदानात देखील दिसला.

प्रीतम मुंडे यांनी अशोक पाटील यांचा जवळपास ७ लाख मतांनी पराभव केला. बीडची जनता मुंडेंच्या कन्येच्या पाठीशी उभी ठामपणे राहिली. मात्र तेव्हा एकाच गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे विलासरावांच्या मृत्यूनंतर निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसनं मुंडेंच्या निधनानंतरची पोटनिवडणूक बिनविरोध न करता एकेकाळच्या मुंडेंच्याच मित्राला मैदानात उतरवणं…    

हे ही वाच भिडू.

   

Leave A Reply

Your email address will not be published.