इन्फोसिस स्थापन करताना टाटांनी सांगितलेलं ते वाक्य आजही मूर्ती विसरू शकत नाहीत.

साल होतं १९७९. मुंबई संध्याकाळची वेळ. अंधार पडत आला होता. एक तरुण इंजिनियर आपल्या नरीमन पॉईंटच्या ऑफिस मधून गडबडीत टॅक्सी शोधत होता. त्याला फोर्टला जायचं होतं. तिथ त्याच्या बायकोच ऑफिस होतं. आधीच उशीर झाला होतं त्यात लवकर टॅक्सी मिळत नव्हती. आता बायकोची बोलणी खावी लागणार म्हणून तो खूप वैतागला होता.

अखेर त्याला टॅक्सी मिळाली. सरदारजीना विनंती करून जरा लवकर चलायला सांगितलं . धावत पळत ते फोर्टला पोहचले. बॉम्बे हाउसच्या दाराशीच त्याला बायको दिसली. एका उंच वयस्कर व्यक्तीशी ती बोलत असलेली ती दिसली. धापा टाकत तो तिथे पोहचला. तेव्हा ते आजोबा छानशी स्माईल देत तिथून निघाले. जाता जाता त्याला म्हणाले,

“Young man, dont make your wife wait in the dark  “

त्या तरुणाच नाव होतं नारायण मूर्ती. नुकतच ते मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी आले होते. त्यांची बायको सुधा टाटा कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यांना नंतर कळाल की आपल्या बायको सोबत उभे राहून आपली वाट बघणारे ते आजोबा म्हणजे टाटा समुहाचे प्रमुख जे.आर.डी.टाटा!

नारायण मूर्ती म्हणतात की एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या मालकाने आपल्या ऑफिसमधल्या एका छोट्या कर्मचाऱ्याच्या काळजीने दाखवलेले सौजन्य माझ्यावर आयुष्यभरासाठी परिणाम करून गेलं.

आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असणारे जे आर डी टाटा आपल्या एम्पलोइजना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करायचे. पण त्यांना सुधा मूर्तीबद्दल विशेष अभिमान होता कारण टाटा कंपनी जॉईन करणाऱ्या त्या पहिल्या महिला इंजिनियर होत्या. तेही भांडून.

झालं असं होत की जेव्हा सुधा मूर्ती कॉलेजमध्ये होत्या तेव्हा त्यांना टेल्कोची कम्पस मुलाखतीची जाहिरात दिसली ज्यात लिहिलं होत की स्त्रियांनी अर्ज करू नये. तरुण सळसळत्या रक्ताच्या सुधा मूर्तींनी तावातावान स्त्री मुक्तीच्या विचारांनी भारावलेल पत्र टाटा कंपनीच्या मालकाच्या नावाने लिहिलं होतं. ते पत्र जेआरडीच्या हातात पडलं आणि त्यांनी टेल्कोला आपले नियम बदलायचे आदेश दिले. यामुळेच टेल्कोमध्ये शॉपफ्लोअरवर काम करणारी सुधामूर्ती ही पहिली इंजिनीअर बनली.

पुढे काही वर्षांनी सुधा मूर्तीनी दिलेल्या कर्जाऊ रकमेतून नारायण मूर्तीं व त्यांच्या मित्रांनी पुण्यात इन्फोसिसची स्थापना केली. या सगळ्यांना मदत करायची म्हणून सुधा मूर्तींनी टाटाचा राजीनामा देऊन पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा हे जेआरडीनां कळाले तेव्हा त्यांनी तिला आपल्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवले आणि कंपनी सोडण्याचे कारण विचारले. सुधा मूर्तींनी इन्फोसिस बद्दल सांगितलं. ते ऐकल्यावर जेआरडीनी पहिलाच प्रश्न विचारला,

” तुमची ही कंपनी यशस्वी झाली तर तुम्ही काय करणार?”

सुधा मूर्ती म्हणाल्या सर आम्हाला अजून माहित नाही की आम्ही यशस्वी होईन का नाही ते. जेआरडी म्हणाले,

“सुरवात नेहमी आत्मविश्वासाने करावी. आणि जेव्हा तू  यशस्वी होशील तेव्हा आपण समाजासाठी देन लागतो हे कायम लक्षात ठेव. जे काही कमावशील त्याचा एक वाटा त्यासाठी ठेव.”

जेआरडी टाटांचे हे विचार सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती कधीच विसरले नाहीत. पुढे जेव्हा इन्फोसिस खरोखर यशस्वी झाली तेव्हा त्यांनी सुधा मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील विविध स्तरातील लोकांच्या मदतीसाठी इन्फोसिस फौंडेशनची स्थापना केली. आजही इन्फोसिसमध्ये सर्वात मोठा फोटो जेआरडी टाटांचा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.