पत्री सरकारमधील महिला पलटणीच नेत्तृत्व एका खानदेशी रणरागिणीकडे होतं

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी” असं म्हणत पुरुषप्रधान व्यवस्थेन महिलांना अनेक पिढ्या ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतच मर्यादित ठेवलं.  स्वातंत्र्य आधीच्या काळातील रूढी परंपरेत अडकून पडलेला समाज, त्या समाजातील स्त्री स्वातंत्र्यलढ्यात उतरते.  गांधीजींच्या नेतृत्वात ‘चले जाव’ लढ्यात भाग घेते,   पत्री सरकारमध्ये महिला पलटणीचे नेतृत्व करते, कमरेला पदर खोचून हाती बंदूक घेऊन थेट पोलिस ठाण्यावर हल्ला चढवते. ती  एवढ्यावरच थांबत नाही तर नगरपालिका, विधानसभा सभागृहात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवते.  उण्यापुऱ्या ६३ वर्षांच्या आयुष्यात तब्बल चौदा वर्षे तुरुंगवास भोगते. महात्मा गांधीजी ते इंदिराजी अशा दोन पिढ्यांसोबत  काम करून आपल्यासोबतच कुटुंबाचं नावही मोठं करते.  तरी तिच्या नावाच्या ना  कुठे चिरा असतो ना पणती !

ही कहाणी आहे एका कर्तबगार मराठा स्त्रीची अर्थात  खानदेशी रणरागिनी लीलाताई उत्तमराव पाटील यांची.  उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील साकोरे खेड्यातील  सत्यशोधक वामनराव पाटील यांच्या घरी लीलाताईंच्या  जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार केले गेले. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकार अर्थात प्रतिसरकार मधील तुफान सेनेच्या त्या सेनानी राहिल्या.  फारसे शिक्षण नाही परंतु श्रीमंत व सुखवस्तू मराठा कुटुंबात जन्मलेल्या लीलाताई यांचा १९३७ मध्ये उत्तमरावांसोबत विवाह झाला.  लीलाताईंनीचा विवाह हातात रिकामी पिशवी तेवढीच इस्टेट असलेल्या एका देशभक्त तरुणाची झाला.  एकही पारंपरिक विधी न करता, जाड्याभरड्या खादीच्या साडीवर, एका दलिताच्या पौरोहित्याखाली, गळ्यात मंगळसूत्र न घालता हा विवाह पार पडला.  एका दलितांच्या  केलेले विवाहाचे पौरोहित्य आणि पंगतीला झुणका भाकर हे विवाहाचे वेगळेपण ठरले.

खान्देशातील त्या पंचक्रोशीत अशाप्रकारचा सत्यशोधकी विवाह समारंभ पहिल्यांदा संपन्न होत होता.  लीलाताईंना त्यांच्या विवाहातील बंडखोरीमुळे भावकीतील नातलगांकडून सुरुवातीला सामाजिक बहिष्कारला सामोर जावं लागलं.  लीलाताईंच्या डोक्यावर पदर न घेणे,  पतीसोबत हातात हात घालून चालणे गावकऱ्यांना पसंत पडले नाही.  सख्ख्या चुलत सासरची मंडळी त्यांना दलिताच्या  हातून लग्न लावून घेतल, अशी हेटाळणी करून विहिरीवर पाणी सुद्धा भरून देत नसायचे. मात्र घरातील सासू, दीर,  पती यांच भक्कम पाठबळामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टींवर मात केली. 

नंतर हे जोडपं नगरला आलं.  याच काळात लीलाताईंनी खाजगी मास्तरकडे  आपलं शिक्षण घेतलं,  मात्र लीलाताईंचे खरे शिक्षण तुरुंगातच झाले तिथेच त्या हिंदी इंग्रजी शिकल्या.  या काळात तुरुंग हीच सत्याग्रहींची शाळा झाली होती

लीलाताई पाटील त्यांच्याबरोबर त्याचं सगळं कुटुंबच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत.  लीलाताईंच्या वृद्ध सासु सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेल्या तुरुंगातच त्यांचे निधन झाले.  उत्तमराव पाटील यांचे भारत छोडो आंदोलनातील व प्रति सरकार चळवळीतील योगदान स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगं आहे.

लीलाताईंचे दोन्ही धाकटे दीर शिवाजीराव पाटील आणि दशरतराव पाटील स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या त्यांच्या योगदानामुळे तुरुंगात होते. शिवाजीराव पाटील म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री व अभिनयसम्राज्ञी स्मिता पाटील यांचे वडील.  एकंदरीत लीलाताईंचे कुटुंबच स्वातंत्र्यसैनिकांची खान होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.  एकाच मोठ्या कुटुंबाच्या उज्ज्वल देशभक्तीचे असे दुसरे उदाहरण भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आढळत नाही. 

विवाहाआधी फारसे शिक्षण नसलेल्या लीलाताईंनी डॉक्टर पतीच्या मार्गदर्शनातून नर्सिंगचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर  १९३९ ला अंमळनेर  येथे गोरगरिबांसाठी त्यांनी दवाखाना सुरू केला.  मात्र इंग्रजांच्या जाचामुळे १-२ वर्षात त्यांना हा दवाखाना  बंद करावा लागला.  मात्र त्यांनी खेडोपाडी दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे त्यांच्या भावकीतील  व परिसरातील अनेक जणांनी त्यांच्या कुटुंबावर घातलेला सामाजिक बहिष्कार नाहीसा झाला.

महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या लीलाताईंना वयाच्या अठराव्या वर्षीच १९४० साली ब्रिटिशांनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या आरोपाखाली धुळे इथल्या तुरुंगात टाकलं. १९३७ ते १९४५ या कालावधीत लीलाताईंनी खादी, काँग्रेस विचार, सभासद नोंदणी, प्रभात फेरी, ग्रामसफाई,  संडास सफाई,  मजूर शेतकरी संघटना इत्यादी सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेतला.

१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात गांधीजींनी सर्व देशवासियांना दिलेली ऑगस्ट क्रांतीच्या आंदोलनाची हाक लिलाबाईंपर्यंत पोहोचली. आणि  पाच महिन्यांच्या गर्भवती असूनही त्यांनी  या आंदोलनात उडी घेतली.  १५ ऑगस्ट १९४२ ला लीलाताई,  उत्तमराव व इतर सहकाऱ्यांनी अमळनेर येथील न्यायालय, पोस्ट ऑफिस व स्टेशन या ब्रिटिशांच्या मर्म स्थानावर मोर्चा काढून या तीनही इमारतींची राखरांगोळी केली. ब्रिटिश  सरकारसाठी हा खूप मोठा धक्का होता.  यामुळे या आंदोलनादरम्यान शिपायांनी गोळीबार सुद्धा केला. 

इंग्रजांनी उत्तमरावांनविरूद्ध या कारनाम्यासाठी डेथ वॉरंट काढल्याने  १५ ऑगस्टच्या  रात्री ते अंडरग्राउंड झाले, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांनी लावलेला मार्शल लॉ तोडण्याचे लीलाताईनी धाडस केले. दीर  दशरथ पाटील आणि काही मैत्रिणींच्या साहाय्याने त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले. लीलाताई हातात तिरंगा झेंडा घेऊन या पाच- सहा तरुण आंदोलकांचे नेतृत्व करीत होत्या.

आदल्याच दिवशी केलेल्या कारनाम्यामुळं भडकलेल्या  इंग्रज शिपायांनी या  गटावर झडप घातली आणि मारहाण केली.  ‘ऑगस्ट क्रांती जिंदाबाद, इंग्रजी राजवट मुर्दाबाद’ अशा घोषणा देत असताना आणि लीलाताईंनी तिरंगा झेंडा छाती पोटाशी कवटाळलेला असताना तो ताब्यात घेण्यासाठी शिपायांनी  त्यांच्या पाठीवर दांड्यानं  प्रहार केले.  पण लीलाताईंनी तिरंगा काही सोडला नाही हे बघून चिडलेल्या शिपायांनी लीलाताईंच्या कमरेवर व ओटीपोटावर रायफलच्या दस्त्याने  प्रहार केले.  त्यांना फरफटत नेत तुरुंगात डांबले गेले या मारहाणीत झालेल्या दुखापतीमुळे लीलाताईंचा गर्भपात झाला.

अमळनेर येथील शासकीय कार्यालयाची जाळपोळ करण्यासाठी साडेसहा आणि मार्शल लॉ भंगासाठी साडेसात  वर्षांची अशी १४ वर्षांची  शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. दरम्यान नंतर  येरवडा तुरुंगात स्वातंत्र्यलढ्याची शिक्षा भोगत असताना कडक पहाऱ्याच्या या तुरुंगात अंगात १०१ डिग्री ताप असताना लीलाताईंनी इंग्रज शिपायांच्या हातावर तुरी दिल्या. 

येरवड्यातून सुटल्यानंतर लीलाताईंनी अंडरग्राउंड होत क्रांतीसिंह नाना पाटलांच्या चळवळीत नवऱ्यासोबत  प्रतिसरकार चळवळीत तुफान सेनेच्या महिला सैनिकांची सेनानी म्हणून नेतृत्व केले.  या चळवळीत त्यांनी  खांद्यावर बंदूक ठेवून नाना पाटलांची ग्रामराज्य संकल्पित चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला.

१९४६ पर्यंत उत्तमराव आणि लीलाताई यांच्या नावे असलेले सरकारी सर्च वॉरंट रद्द होईपर्यंत या जोडप्याने भूमिगत राहून महाराष्ट्रभर सामाजिक क्रांती पेटवण्याचा प्रयत्न केला. नंतर हे सर्च वॉरंट  रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या जोडप्याचे सत्कार झाले.  मात्र पत्री सरकारच्या या यशामुळे महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांना पत्री सरकारच्या या नेत्यांचा जनतेने केलेला हा सत्कार आणि सन्मान मानवला नाही. 

 बाळासाहेब खेर  व मोरारजी देसाई यांच्या मुंबई सरकारचा तर  जळफळाट झाला.  त्यामुळे उत्तमराव आणि लिलाताईंवर  सभा बंदी,  भाषण बंदीचे हुकूम काँग्रेस नेत्यांकडून बजावण्यात आले.  प्रतिसरकार बाबत काँग्रेसी नेत्यांमध्ये असलेला द्वेष यामुळे पुढे या जोडप्याने समाजवादी पक्षाची कास धरली.  मात्र १९४८ नंतर समाजवादी पक्षाच्या ध्येय,  उद्धिष्टांच्या प्राधान्याबाबत त्यांचे मतभेद निर्माण झाले, आणि त्यांनी इथूनही बाहेर पडत  शेतकरी कामगार पक्षासाठी काम केले. 

स्वातंत्र्योत्तर काळात लीलाताईंनी स्त्री शिक्षण,  स्त्री मुक्ती,  सहकारी संघटना स्त्री होमगार्ड इत्यादी सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले.  लीलाताईंनी १९४७ सली अमळनेर येथे जनता शिक्षण मंडळाची स्थापना करून  शेतकरी बोर्डिंग आणि ट्रेनिंग कॉलेज सुरू केले.  त्या शिरपूर नगर परिषदेच्या सलग नऊ वर्षे नगरसेविका देखील  होत्या.  स्थायी समितीच्या महिला अध्यक्ष होण्याचा महाराष्ट्रातला पहिला मान त्यांनाच मिळाला.

१९७२ ते ७८ या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेच्या शिंदखेडा मतदार संघाच्या जागृक आमदार म्हणून लिलाताईंनी काम केलं. उत्तमरावांच्या  खांद्याला खांदा लावून लढलेल्या लीलाताई पाटील अफाट कामगिरी करून खानदेशातील रणरागिनी ठरल्या. मात्र , १ मे १९८५ साली या क्रांतिवीरांगनेचं  कर्करोगाने निधन झालं. 

दरम्यान फितूर होऊन किंवा ब्रिटिशांची माफी मागून स्वातंत्रद्रोह करणाऱ्या अनेक महाभागांवर  पुस्तक, कादंबऱ्या,  नाटकं, चित्रपट निर्माण होत असताना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘क्रांतिपर्व’ या ग्रंथाच्या खेरीज इतरत्र कुठेही लिलाताईंबद्दल विशेष माहिती नाही,  हे दुर्दैवाने नमूद करावं लागेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.