हे तर काहीच नाही एकदा तर अर्णबला बिहारच्या बाहुबलीने किडनॅप केलेलं…

अर्णब गोस्वामीला पोलीसांनी अटक केली. सकाळ सकाळी मित्र फटाके फोडू लागला. एका पत्रकाराच्या अटकेनंतर खुश होणारे पत्रकार ही बहुतेक पहिली केस असावी. नाहीतर आजपर्यन्त पत्रकारावर सरकारने दडपशाही केली की तात्काळ सर्व पत्रकार एक होऊन परिषदा घेतात, आंदोलन करतात, मोर्चे काढतात..

पण अर्णबच्या अटकेनंतर मात्र इतर माध्यमांचे पत्रकार आनंदातच आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमार्फत अटकेविरोधात रान उठवलं जातं आहे.

आत्ता कारणे परंपरा आणि अर्णब आज पत्रकारांकडून बहिष्कृत का झाला याची कारणे तर तुम्हाला माहितच आहेत,

पण याच पार्श्वभूमीवर अर्णबचा एक जुना किस्सा सांगावा म्हणलं,

हा किस्सा आहे अर्णब गोस्वामीच्या किडनॅपींगचा….

खुद्द अर्णबने एका मुलाखती मध्ये हा किस्सा सांगितला आहे.

गोष्ट आहे 1996 सालची. भारतात लोकसभा निवडणुका होत होत्या. नव्यानेच सुरू झालेल्या न्यूज चॅनल्समध्ये लगबग सुरू होती. ऑक्सफर्डमध्ये शिकून आलेला अर्णब गोस्वामी तेव्हा ndtv मध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी करत होता.

अवघ्या 22 वर्षाच्या अर्णबला बिहारमधल्या पुर्निया मतदारसंघाला कव्हर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

पुर्निया म्हणजे बिहारमधील अति दुर्गम प्रदेश. अशिक्षितपणा आणि गरिबीमुळे खूपच मागास राहिलेल्या या मतदारसंघाची राष्ट्रीय राजकारणात चर्चा होती याला कारण होते,

तिथला तरुण खासदार पप्पू यादव.

सहा फूट 3 इंच उंची 140 किलो वजन असा तगडा पप्पू यादव पुर्निया भागात बाहुबली म्हणून फेमस होता. त्याचं वय तीस वर्षे सुद्धा नसेल पण त्याच्या गुंडगिरीची दहशत पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होती.

पप्पू यादव अपक्ष उभा राहूनही मागच्या निवडणुकीत जिंकला होता. मात्र यावेळी त्याचा विजय अवघड आहे अस बोललं जातं होतं.

अशाच तापलेल्या वातावरणात अर्णब गोस्वामी त्याची मुलाखत घेण्यासाठी पुर्निया मध्ये पोहचला.

आता तुम्हाला वाटेल की अर्णबने सवयीप्रमाणे या पप्पूला पण आरडाओरड करून प्रश्न विचारले असतील, तर तसं काही झालं नाही. अर्णबने साधे प्रश्न विचारले, पप्पूने सुद्धा नॉर्मल उत्तरे दिली. मुलाखत संपली.

अर्णब परत दिल्लीला जाण्यासाठी निघाला. पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या साठी काय वाढून ठेवलं आहे. दारात पप्पू यादवच्या राक्षसाप्रमाणे दिसणाऱ्या बॉडीगार्ड्सनी त्याला अडवलं.

पप्पूजी की परमिशन जे बगैर आप यहां से जा नहीं सकते.

अर्णबला काही कळेना. त्याच्या कॅमेरामन ने सांगितले, आपण किडनॅप झालो आहे. पुर्नियामध्ये फिल्मी स्टाईल रुल होता,

“पप्पु के इलाखे में आप आते अपनी मर्जीसे हो मगर जाते के लि पप्पूजी के मर्जीसे.”

अर्णबची तंतरली. आपली चूक काय झाली ते सुद्धा त्याला कळेना. आजवर बघितलेले सगळे सिनेमे आठवू लागले. पप्पू यादव सारखा बाहुबलीच्या तावडीतून आपण काय सुटत नाही असेच त्याला वाटत होतं.

पण पप्पू यादवने त्याला किडनॅप करण्याचं कारण देखील खूप मज्जेशिर होतं.

अर्णबचा कॉन्फिडन्स त्याच ऑक्सफर्ड इंग्लिश त्याचे स्मार्ट कपडे हे त्याला आवडलं. त्याचा वापर प्रचारासाठी करायचा असं पप्पूच्या डोक्यात होतं.

पप्पू यादवची जिथे जिथे सभा असेल तिथे अर्णबला नेण्यात येई. पप्पू यादव अर्णबकडे बोट दाखवून सांगायचा,

क्या आप जानते हो ये लडका कौन है? दुनिया का सबसे बडा न्यूज चॅनल बीबीसी का ये रिपोर्टर है. क्या आपको पता है बीबीसी क्या कहेती है?

बीबीसी केहती है पुर्नियासे इस बार पप्पू यादव जितेगा”

सगळी जनता अर्णब कडे पाहू लागायची. भेदरलेला बिचारा अर्णब कोणाला सांगू पण शकत नव्हता की तो बीबीसीचा नाही तर ndtv चा रिपोर्ट आहे.

कायम आरडाओरडा करणाऱ्या अर्णबचा आवाज म्युटवर व्हायचा आणि पप्पू यादव जे सांगेल त्याला तो खाली मान घालून होकार द्यायचा.

जवळपास दोन दिवस हा प्रकार चालला. त्यांनंतर अर्णबची सुटका झाली.

अर्णबचा प्रचारात केलेला वापर पप्पू यादवला प्रचंड फायदा झाला. निवडणूक फिरली आणि पप्पू यादव परत खासदार बनला.

अर्थात ही गोष्ट अर्णबने स्वतः सांगितलेली आहे. त्याने हजारो मुलाखती घेतल्या, अनेकांना घाम फोडला मात्र पप्पू यादवने त्याचे केलेले हाल तो आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kishor says

    Nice article, really interesting

Leave A Reply

Your email address will not be published.