सातारच्या पेढ्यांना ‘कंदी पेढे’ हे नाव इंग्रजांमुळे नाही तर छत्रपतींमुळे मिळालं.

मधल्या काळातील राजकीय उलथापालथ होण्यापूर्वीची गोष्ट. सातारच्या उदयन महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बद्दल मिडीयाने काहीतरी प्रश्न विचारला. उदयन महाराज कॉलर उडवून म्हणाले,

“कोण मोदी? आमच्या इथे सातारला मोदी कंदी पेढेवाले आहेत.” 

अशी आहे सातारच्या कंदी पेढ्यांची हवा. अख्ख्या भारतात कोणी सातारला जाणार असेल तर त्याला येताना कंदी पेढे घेऊन ये असे सांगितले जात. तो आता एक खाद्यपदार्थ उरला नाही तर तो एक ब्रँड बनलाय.

पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?

अहो मग भिडू कशासाठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.

या गोष्टीबद्दल दोन दाखले दिले जातात. पहिली कथा सांगितली जाते ती ब्रिटीशांची. ती गोष्ट खालीलप्रमाणे. 

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं.

हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.

काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.

त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.

पण या गोष्टीत तथ्य नसल्याचं काही मंडळी सांगतात. मोदी पेढ्यांसाठी ब्रॅण्डमुळे प्रसिद्ध असणारे सातारचे प्रशांत मोदी मात्र या गोष्टीचं खंडण करतात. 

ते म्हणतात,

जी गोष्ट आपल्या इतिहासाशी संबधित आहे त्यांच क्रेडिट ब्रिटीशांना का द्यावं. कंद म्हणजे भाजण्याची पद्धत. खव्याची पक्की पक्की भाजणी म्हणजेच कंदी पेढा. सुरवातीला ही खवा भाजणी पद्धत छत्रपतींच्या वंशंजाना आवडली म्हणून त्यांनी सातारी पेढ्यांना कंदी पेढे असं नाव दिलं. 

ब्रिटीशांनी कंदी पेढे हे नाव दिलं हे साफ खोटं असून हे नाव छत्रपतीं घराण्याच्या वंशजांनी दिलेलं आहे. 

मोदी या आडनावाबाबत देखील ते सांगतात की,

मोदी हा छत्रपतींनी दिलेला किताब आहे. ज्याप्रमाणे पाटीलकी दिली जात तशाच प्रमाणे हा किताब छत्रपतींकडून देण्यात आला आहे. 

छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल.

याचबरोबरीने मोदी पेढेवाले प्रशांत मोदी यांनी माहिती दिली की, 

जेव्हा पहिल्यांदा साताऱ्यात पेढा तयार होवू लागला, तेव्हा साताऱ्याजवळील कास येते म्हशीच्या दुधाची प्रत चांगली असल्याने शेतकऱ्यांना खवा बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले. कास चा परिसर वनसमृद्धिने भरलेला असल्याने  कंदमुळे इत्यादीचे प्रमाण जास्त होते. कास येथून आलेल्या खव्याला कंदयुक्त खवा असे ओळखू जावू लागले. त्यालाच कंदी पेढा असे नाव छत्रपती घराण्याचे नववे वंशज यांनी दिले.

कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते तुळजाराम मोदी या हलवायांनी.

त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.

आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई  मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.

म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.

भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय.

या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shree says

    गंगाखेड ची कलम खाल्ली आहे का?

Leave A Reply

Your email address will not be published.