मंकडींग: एक रनआऊट, अनेक वाद आणि मुलानं बापासाठी दिलेली झुंज

बँगलोर व्हर्सेस लखनौ मॅच झाली, २१२ रन्स करुनही बँगलोरनं ही मॅच हरली. शेवटच्या बॉलला लखनौला एक रन करायचा असताना, बँगलोरचा बॉलर हर्षल पटेलनं नॉन स्ट्राईकवरच्या रवी बिष्णोईला रनआऊट करायचा प्रयत्न केला. क्रीझ सोडलेल्या बिष्णोईला आऊट करण्याचा चान्स पटेलनं घालवला आणि पुढं बँगलोरनं मॅच हरली.

पटेलचा चान्स हुकला असला तरी अशा पद्धतीनं रनआऊट करण्यावरच जोरदार टीका झाली आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला नॉन स्ट्राईकवरचा रनआऊट योग्य की अयोग्य.

आपण गल्ली क्रिकेट खेळताना कुठलाही नॉन स्ट्राईकर बॉल पडायच्या आधीच पळत सुटतो, आपण त्याला कचकून शिव्या देतो पण गडी आपलाच मित्र असल्यानं त्याला फरक पडत नाय. पुढं एखादा चोरटा रन घेऊन हाच आपला पळणारा गडी स्ट्राईकवर येतो आणि आपल्या बॉलिंगला सणकून फटके हाणतो. हे एवढं झालं की, पोरं आपल्याला ३ बॉलची बेबी ओव्हरही देत नाहीत.

भारताचा स्पिनर आर अश्विन याबद्दल नेमकं हेच म्हणाला होता, ‘जर नॉन स्ट्राईकवरचा बॅट्समन पुढं पळाला आणि क्रीझवर आला तर त्याचा फटका बॉलरला बसतो. त्यामुळं इतर कुठलाही विचार करण्याऐवजी पुढं सरकलेल्या बॅट्समनला बिनधास्त रनआऊट करा.’

आता अश्विन अण्णा असं का म्हणलेला, हे तुम्हाला कदाचित माहिती असेलच. २०१९ च्या आयपीएलमध्ये अश्विननं बॉल टाकण्याआधीच क्रीझ सोडलेल्या जोस बटलरला रनआऊट केलं आणि सगळ्या क्रिकेट जगतात वाद झाला.

परदेशी खेळाडूंनी अश्विनची ही कृती क्रिकेटच्या नियमांविरोधात आणि स्पोर्टींग स्पिरीटला धक्का देणारी आहे, असं रडगाणं गायला सुरुवात केली. तर बोटावर मोजण्याइतक्या भारतीय खेळाडूंनी अश्विनला पाठिंबा दिला. मात्र ज्याप्रकारे परदेशी मीडिया अश्विनवर तुटून पडलं, ते बघून फ्युजाच उडाल्या.

पण अशा प्रकारच्या रनआऊट नंतर परदेशी मीडियानं भारतीय खेळाडूला लक्ष्य करणं याची ती पहिलीच वेळ नव्हती, याआधीही असं झालं होतं, तेही १९४७ मध्ये.

ते खेळाडू होते, भारताच्या ग्रेटेस्ट ऑलराऊंडर्स पैकी एक म्हणून ओळखले जाणारे विनू मंकड.

१९४७, भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सुरू असलेल्या सराव सामन्यांदरम्यान एक किस्सा झाला, ऑस्ट्रेलियन बॅट्समन बिल ब्राऊन यांनी नॉन स्ट्राईकवर असताना बॉल टाकण्याआधीच क्रीझ सोडली आणि बॉलिंग करणाऱ्या मंकड यांनी त्यांना वॉर्निंग दिली. मात्र सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये ब्राऊन पुन्हा क्रीझ सोडून पुढे गेले आणि यावेळी मात्र मंकड यांनी बेल्स उडवल्या.

सगळ्या ऑस्ट्रेलियन मीडियानं विषय उचलून धरला आणि अशा प्रकारच्या रनआऊटला नाव पडलं.. मंकडींग.

हे प्रकरण इतकं गाजलं आणि चर्चेत राहिलं की, अजूनही विनू मंकड यांचं नाव ऐकल्यावर कित्येकांना मंकडींगचं आठवतं.

या प्रकरणामुळं काय झालं, तर मंकड यांच्या करिअरमधले अनेक माईलस्टोन्स झाकोळले गेले.

भारताला पहिलीवहिली टेस्ट मॅच जिंकून देण्याचे हिरो विनू मंकड होते. १९५२ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेली, टेस्ट भारत आठ विकेट्सनी हरला. पण भारताच्या पराभवातही १८४ रन्स आणि ५ विकेट्स घेणारे विनू मंकड चमकले आणि ती टेस्ट ‘मंकड टेस्ट’ अशीच ओळखली जाऊ लागली… पण दुर्दैव म्हणजे ही माहिती फार लोकांना माहीतच नाही.

नॉन स्ट्राईकवर असलेल्या बॅट्समनला बॉल टाकण्याआधीच रनआऊट करणं हे सुरुवातीला आयसीसीच्या ‘अनफेअर प्ले’ या लॉमध्ये येत होतं. त्यामुळं मंकड यांनी केलेल्या रनआऊटवर स्पोर्टींग स्पिरिटमध्ये नसल्याची टीका करणं सोपं होतं. मंकडच नाही, तर त्यांच्यानंतर भारताचे लेजंडरी ऑलराऊंडर कपिल देव, आर. अश्विन, मोहमद शमी, दीप्ती शर्मा यांनाही या रनआऊटनंतर प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं.

या सगळ्यात त्या ‘अनफेअर प्ले’ मधल्या रनआऊटला मंकडींग हे नाव चिटकलं ते कायमचंच. अगदी अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही अशाप्रकारे रनआऊट झाल्यानंतर मंकडींग असंच म्हणलं जातं आणि तेवढ्यापुरते विनू मंकड ट्रेंडिंगमध्ये येतात.

भारताच्या सगळ्यात भारी ऑलराऊंडर्सपैकी एक असलेल्या मंकड यांना एकाप्रकारे अन्यायच सहन करावा लागत होता. क्रिकेट विश्व त्यांचं नाव आदरानं कमी आणि कुत्सितपणे जास्त घेत होतं.

मात्र आता ही सगळी परिस्थिती बदललीये, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरीलिबोन क्रिकेट क्लबनं (एमसीसी) नुकताच असा रनआऊट हा पूर्णपणे बरोबर आणि क्रिकेटच्या नियमांमध्ये असल्याचं जाहीर केलं.

आणि यासाठीची लढाई लढली होती.. राहुल मंकड यांनी.

राहुल हे विनू मंकड यांचे पुत्र. राहुलही क्रिकेटरच, आपल्या वडिलांप्रमाणं तेही राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट आर्म बॉलर होते. राहुल मंकड यांची मुंबईच्या रणजी संघात वर्णी लागली. जवळपास अकरा वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळूनही राहुल यांना भारतीय संघाचे दरवाजे खुले करता आले नाहीत. त्यांच्या नावापुढं अचाट विक्रमही जमा झाले नाहीत.

Rahul Mankad
राहुल मंकड

पण राहुल मंकड यांनी मैदानाबाहेर आपल्या वडिलांच्या कामगिरीला आणि महानतेला न्याय मिळवून दिला… जे आतापर्यंत बीसीसीआयलाही जमलं नव्हतं.

नॉन स्ट्राईकर एन्ड सोडलेल्या बॅट्समनला रनआऊट करणं हे चुकीचं नाही, हे राहुल मंकड यांनी लाऊन धरलं. त्यांनी हा मुद्दा एमसीसीकडे नेला. सातत्यानं पाठपुरावा करत, एमसीसीला थेट नियमच बदलायला लावला. एमसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या नियमांमध्ये अशाप्रकारचा रनआऊट पूर्णपणे योग्य असल्याचं आणि तो अनफेअर प्लेमध्ये नसल्याचं जाहीर केलं.

मंकड यांनी १९४७ मध्ये केलेला रनआऊट, त्यानंतर झालेले वाद, कपिल पाजी आणि अश्विन अण्णानं केलेल्या रनआऊट नंतरचे वाद, स्पोर्टींग स्पिरीटला धक्का पोहोचवल्याच्या अनेक टीका आणि अखेर मिळालेला न्याय… वडील विनू मंकड यांच्यापासून सुरू झालेली स्टोरी, मुलगा राहुल मंकड यांच्यामुळं थांबली आणि एकाचा खेळ आणि एकाचे प्रयत्न अजरामर झाले.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.