निधीचं राजकारण संपेना अन् आदिवासी पाड्यांवर गर्भवतींना झोळीतून दवाखान्यात न्यावं लागतंय….

नाशिक जिल्ह्यातल्या ईगतपूरी तालुक्यात जुणवणेवाडी हे एक छोटंसं गाव आहे. या गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गावातल्या वनिता भावडू भगत या महिलेला मध्यरात्री अडिच वाजता प्रसृती वेदना होऊ लागल्या. वेदना खूपच जास्त होत असल्यामुळे तिला दवाखान्यात दाखल करणं अत्यावश्यक होतं. जुणवणेवाडी हि एक आदिवासी वस्ती आहे.

तिथं अजूनपर्यंत चांगले रस्ते बांधण्यात आलेले नाही. त्यातच सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे वाट चिखलमय झाली आहे. त्यामुळे वाहनाने वनिताला दवाखान्यात नेणं शक्य नव्हतं. वणिताच्या नातेवाईकांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वणितासाठी एक डोली केली.

मध्यरात्री अडिच वाजता वणिताला डोलीतून दवाखान्यात नेण्यासाठी चिखलात पाय तुडवीत प्रवास सुरु झाला. 

तब्बल अडिच किलोमीटर पायपीट करत वणिताच्या नातेवाईकांनी तीला कसंबसं घोटीला आणलं. पण तोपर्यंत वनिताची प्रकृती खूपच खालावली होती. घोटीतून वणिताला नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होतं. पण वाटेतच वणिताचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत वणिताच्या पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर वणिताचा मृतदेह पुन्हा एकदा डोलीतूनच तिच्या गावी न्यावा लागला.

या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. सरकारकडून राज्यात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले जातात. पण राज्यातल्या काही गावांमध्ये साधे रस्तेसुध्दा उपलब्ध नाहीत. हे रस्ते बांधण्यासाठी, हॉस्पिटल उभारण्यासाठी जो निधी दिला जातो त्यात मात्र राज्यात राजकारण सुरु आहे. आमदारांना खुश करण्यासाठी, त्यांना आपल्या गटात ओढण्यासाठी, नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी निधी वाटप चालू असल्याचं राज्यात चित्र आहे. त्यामुळे हा राज्यातला मोठा दुर्गम पट्टा नेहमीच निधीपासून वंचित राहत आला आहे. 

अशावेळी मग रस्ते नसताना गावकरी गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण त्यांचे प्रयत्न शेवटी व्यर्थ जातात. परिणामी गर्भवती महिला व तिच्या पोटातील बाळाला जीव गमवावा लागतो. एकीकडे महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ सारख्या योजना राबवल्या जातायेत, तर दुसरीकडे काही गावांमधील रुग्णांना दवाखान्याच्या दारात पोहोचणं अवघड झाल्याचं दिसून येतंय. मात्र महाराष्ट्रात नाशिकसारख्या घटना सातत्याने घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा नाईक घटना सांगता येतील ज्यामध्ये राज्यसरकारचं अपयश समोर आलं आहे. 

१५ ऑगस्ट २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. 

पालघरमधल्या बोटोशी गावात असणारा मरकटवाडी हा आदिवासी पाडा मुलभूत सुविधांपासून वंचित होता. या आदिवासी पाड्यात आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी झोळीचा वापर गावकरी करतात. रस्ता उपलब्ध नसल्याने वाहन मरकटवाडीपर्यंत पोहोचू शकत नाही. 

वंदना बुधर या महिलेला प्रसृती वेदना होऊ लागल्यानंतर तीला डोली करुन गावकऱ्यांनी दवाखान्यात दाखल केलं. डोली घेऊन वंदनाच्या नातेवाईकांना दवाखाना गाठण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. दवाखान्यात पोहोचल्यानंतर वंदनाच्या समोर तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. दवाखान्यात वंदनाला आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. 

१५ ऑगस्ट रोजी एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु होता तर दुसरीकडे वंदनाच्या बाळांनी आरोग्य सुविधा नसल्याने त्यांच्या आईसमोरच प्राण सोडले होते. 

या घटनेमुळे वंदनाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे मरकटवाडी या गावात याआधीही दोन-तीन अशा घटना घडल्या आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे वंदनाला तिच्या २ बाळांना गमवावं लागलं. पालघरमधल्या मनमोहाडी, भाटीपाडा आणि इतर पाड्यातील गरोदर महिला प्रसृतीची वेळ तारीख जवळ आली की तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन राहतात. 

तारीख १४ सप्टेंबर २०२२. गडचिरोली जिल्ह्यातल्या दामरंचा ग्रामपंचायतहद्दीत चीटवेली हे गाव वसलेलं आहे.

 चीटवेली या गावात १०० टक्के आदीवासी कुटुंब राहतात. या गावात जाण्यासाठी मुख्य रस्ताच नाही. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा रस्त्याची मागणी केली. पण प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गावकऱ्यांना आरोग्य सुविधांसाठी १० किमी जंगलातून पायपीट करावी लागते. १४ सप्टेंबर रोजी चीटवेलीतल्या झुरी दिलीप तलांडी (वय २६) या गर्भवती महिलेला प्रसृती वेदना होऊ लागल्या. 

रुग्णालयात जाण्यासाठी या महिलेला जंगलातून पायपीट करावी लागली. 

अखेर एका ट्रॅक्टरमधून तिला रुग्णालयात नेण्यात येत होतं. पण पावसामुळे झालेल्या चिखलात ट्रॅक्टरचं चाक फसलं. त्यामुळे गर्भवती झुरीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. निवडणुका आल्या की लोकप्रतिनीधी ग्रामस्थांना भरघोस आश्वासनं देतात, पण गावकरी मात्र मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, रस्त्यासाठी गावकरी तरसत आहेत, असं चीटवेलीतील ग्रामस्थ त्यावेळी म्हणाले होते.     

तारीख १८ जुलै २०२३. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी या गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. 

गावातल्या लालबाई मोतीराम पावरा या महिलेला प्रसृतीकळा होत होत्या. त्यावेळी गावात रस्ताच नसल्यानं महिलेला रुग्णालयात कसं न्यावं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. त्यावेळी बांबुला झोळी बांधून त्यात गर्भवती महिलेला बसवण्यात आलं. तब्बल ६ किमीची पायपीट करुन गावकऱ्यांनी अखेर महिलेला गुऱ्हाळपाणी इथे आणलं. तिथून नंतर महिलेला रुग्णवाहिकेने वकवाड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. आरोग्य केंद्रात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सुदैवाने महिला व बाळ सुखरुप होते. पण या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली होती. रस्ता उपलब्ध नसल्यानं तब्बल ६ किमीचा प्रवास महिलेच्या नातेवाईक व गावकऱ्यांना करावा लागला होता. गावातून किमान रस्त्याची सोय करुन द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी या घटनेनंतर प्रशासनाला केली होती. 

तारीख ४ ऑगस्ट २०२२. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली.

 कुवरखेत पाड्यावरील हिरा भाईदास वळवी या महिलेला प्रसृती कळा जाणवू लागल्या. कुवरखेत पाडा हा डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे. त्यामुळे महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी तीच्या नातेवाईकांना झोळी करावी लागली. त्या झोळीत महिलेला बसवण्यात आलं. महिलेच्या नातेवाईकांनी बांबूला अडकवलेली झोळी खांद्यावर घेऊन २ किमी पायपीट केली. त्यानंतर महिलेने वाटेतच बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर कुवरखेत पाड्यावरील नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडे रस्त्यांची मागणी केली. मात्र एका दिवसाच्या बातमीनंतर त्याचं पुढं काय झालंच नाही.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.