पक्षाने त्यांचं तिकीट कापलं पण निकालानंतर त्यांना थेट मुख्यमंत्रीच केलं.

तावडे, खडसे आणि बावन्नकुळे यांना तिकीट नाकारल्याची चर्चा या आठवड्यातील सर्वात हॉट टॉपीक होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत या नेत्यांनी मंत्रीपद भूषवलं होतं. विनोद तावडे आणि बावन्नकुळे तर मंत्रीपदावर उत्तम काम करत असल्याचं सांगण्यात येत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही त्यांच्या भाषणात उर्जा मंत्रालय व शिक्षण मंत्रालयामार्फत झालेल्या कामांची यादी वाचत असतात.

अस असताना देखील त्यांना पक्षाने साध तिकीट देण्याच सौजन्य दाखवलं नाही म्हणून आश्चर्य व्यक्त केलं जावू लागलं. अस सांगितलं जात की विनोद तावडे आणि एकनाथ खडसे तर थेट मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे तिकीट कापले. कारणं काहीही असोत पण,

इतिहासात आम्हाला असाच एक किस्सा सापडला,

पक्षाच्या हायकमांडने त्यांना आमदारकीला तिकीट देखील दिलं नव्हतं. पण निकाल लागल्यानंतर त्यांना थेट महाराष्ट्राच मुख्यमंत्री केलं. 

काळ होता १९८० चा.

महाराष्ट्रात शरद पवारांनी पुलोद स्थापन केल होतं. इंदिरांनी पुलोदचा कार्यक्रम केला. यशवंतराव, शरद पवार अशी मात्तब्बर मंडळी एस कॉंग्रेसमध्ये होती. तर कॉंग्रेसमध्ये वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, प्रतिभाताई पाटील अशी मंडळी होती. प्रतिभाताई तेव्हा विरोधी पक्ष नेत्या होत्या तर अंतुले कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभेचे खासदार होते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुकींचे पडघम वाजू लागले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रेमला काकी चव्हाण संभाव्य उमेदवारांची यादी घेवून इंदिरा गांधींना भेटण्यासाठी गेल्या. सोबत बॅरिस्टर अंतुले देखील होते.

इंदिरा गांधींनी ओळीने नावे वाचली. श्रीवर्धन मधून उमेदवारांच्या यादीत अंतुले यांच नाव होतं. इंदिरा गांधींनी अंतुलेंना विचारलं,

“तुम्ही तर राज्यसभेचे खासदार. मग आमदार होण्यात काय इंटरेस्ट”.

अंतुलेंना प्रश्नाचा योग्य रोख कळल्यानं अंतुले शांतच बसले असावेत.

तात्काळ इंदिरांनी श्रीवर्धनच्या जागेवरुन अंतुलेंच नाव खोडलं आणि अंतुलेंच्या पसंतीचा उमेदवार तिथून उभा करण्याचे आदेश दिले.

यादी डिक्लेर झाली. अंतुले श्रीवर्धन मधून लढणार याची माहिती माध्यमांना होती. पण यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. अंतुलेंचे पंख कापण्याच काम कॉंग्रेसच्या हायकमांडने केल्याची चर्चा सुरू झाली. 

निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. प्रचाराच्या काळातला एक किस्सा सांगितला जातो. दाभाडी मालेगाव मधून डॉ.बळीराम हिरे कॉंग्रेसचे उमेदवार होते. ते प्रचार करत असताना लोक त्यांना म्हणत. तुम्हाला मत दिलं तर अंतुले मुख्यमंत्री होतील. मग मालेगावचे मुस्लीम आम्हाला त्रास देतील. या काळात अंतुलें केंद्रात आहेत. पक्षाने त्यांच तिकीट कापलं. आत्ता महाराष्ट्राशी त्यांचा दूरदूर संबध नाही हे सांगण डॉ. बळीराम हिरेंना सोप्प जात होतं.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तेव्हा वंसतदादा पाटील आणि प्रतिभाताई होत्या. अंतुले राज्यसभेवरच असल्याने त्यांचा राज्याच्या निवडणुकीत सहभाग राहिला नाही. दादांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने लढाई लढली. सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो अंतर्गत विरोध वाढण्याचा पण अंतुलेच नसल्याकारणाने निवडणुकांचा प्रचार हायकमांडच्या इच्छेप्रमाणे पार पडला.

प्रचार संपला. निकाल लागला. देशाप्रमाणे राज्यात देखील इंदिरा सरकार चाललं. कॉंग्रेस आय ने कमाल केली. पण आत्ता महत्वाचा प्रश्न होता,

तो मुख्यमंत्री पदाचा.

पुढचा मुख्यमंत्री मीच म्हणून वसंतदादांनी शड्डू ठोकला होता. प्रतिभाताई पाटील देखील रेस मध्ये होत्या. वसंतदादा तेव्हा जाहिरपणे सांगत,

“तो अंतुले मुख्यमंत्री होत नसतो”.

वसंतदादा आणि प्रतिभाताईंचा समझोता झाला. दोघांनी एकत्र इंदिरा गांधींना भेटायचं. एकमेकांच्या नावांना पाठिंबा द्यायचा.

तुम्ही किंवा मी.

दादा इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले तर अंतुले दिल्लीवरुन मुंबईला आले. दादांनी इंदिरांना सांगितलं प्रतिभाताईंना मी मुख्यमंत्री झालो तर काहीच अडचण नाही. त्या झाल्या तर मला अडचण नाही. इंदिरा म्हणाल्या तुम्ही दोघं झालात तरी मला अडचण नाही फक्त एक काम करा, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या आमदारांच अनुमोदन आणा.

दादा तातडीने मुंबईला आले. पण नशिबाने म्हणा किंवा कमनशिबाने अंतुलेंच विमान दिल्लीवर त्यांच्या अगोदर लॅंण्ड झालं होतं. अंतुलेंनी पुरेसं संख्याबळ आपल्या पारड्यात जोडून तसा मॅसेजच हायकमांडकडे पोहचवला होता.

इंदिरांनी थेट संख्याबळाचा मॅसेज दिला होता,

पण दादा पार्टी हायकमांडच्या मताचा विचार करत संख्याबळाच राजकारण करण्यातच मागे पडले.

अंतुले मुख्यमंत्री झाले. पण चर्चा रंगली ती मुस्लीम माणसाला महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्री कस करण्यात आलं याची. इंदिरा गांधींनी अगोदरच अंतुलेंना लढायला लावलं असत तर दादा गटाबरोबर मराठा व इतर समाजघटक देखील नाराज झाले असते. पण गांधींनी अंतुलेंना शांत डोक्यानेच पहिला मुस्लीम मुख्यमंत्री करायचं ठरवल्याच बोललं जातं. कधीकधी चांगल्या गोष्टीसाठी देखील तिकीट कापलं जावू शकतं इतकच.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.