१९८३ पासून चालत आलेला रेकॉर्ड अखेर मोहम्मद शमीने मोडला
साऊथॅम्पटनमध्ये सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये भारतीय संघानं अनोखी कामगिरी केलीये. मॅचच्या पाचव्या सामन्यात भारतान न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या २४९ धावांवर गुंडाळलाय. दरम्यान, न्यूझीलंडला या धावसंख्येवर आणण्यात मोहम्मद शमीच्या बॉलिंगनं जादुई कामगिरी केलीये.
शमीन या अंतिम सामन्यात ७६ धावा देऊन न्यूझीलंडच्या ४ बॅट्समनला पॅव्हिलियनमध्ये परत पाठवलं. त्यानं रॉस टेलर, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रँडहोम आणि काएल जेमिसन यांच्या विकेट घेतल्या, ज्यामुळं न्यूझीलंडला कमी धावांत अडवता आलं. दरम्यान, टेलेंडर्सनं न्यूझीलंडला ३२ रनांची लीड देऊन शमीची हि कामगिरी जरा खराब केली, पण यानंतरही शमीच्या या कामगिरीचं सगळीकडून कौतुक होतंय.
अनोखा रेकॉर्ड
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शमीने मिळवलेले ७६-४ हे आकडे कोणत्याही आयसीसी इव्हेन्ट फायनलमध्ये भारतासाठी बेस्ट बॉलिंग आहे. शमीच्या आधी कोणत्याही भारतीय बॉलरन आयसीसी इव्हेन्टच्या फायनलमध्ये तीनपेक्षा जास्त विकेट घेतल्या नव्हत्या.
याआधी मोहिंदर अमरनाथच्या नावे बेस्ट बॉलिंगच्या रेकॉर्ड होता. अमरनाथनं १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये १२ धावा देऊन तीन विकेट घेतल्या होत्या. त्याला या कामगिरीबद्दल फायनलला मॅन ऑफ दि मॅच देखील मिळवला होता. आता मोहम्मद शमीने हा रेकॉर्ड मोडलाय, ज्याची भारतीय क्रिकेटप्रेमी किती वर्षांपासून वाट बघत होते.
Mohammad Shami is the first Indian to take a 4-wkt haul in ICC finals.
Previous best: Mohinder Amarnath’s 3/12 in 1983 WC final. #INDvsNZ #ICCWTCFinal
— Bharath Seervi (@SeerviBharath) June 22, 2021
इरफान पठाण, हरभजन सिंहला टाकले मागे
तसं पाहायचं झालं तर १९८३ नंतर भारतीय संघ आतापर्यंत एकून ८ आयसीसी फायनल खेळलाय. २००० च्या आयसीसी वनडे चॅम्पियनशिप फायनलमध्ये वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादनं २७ रन देऊन ३ विकेट घेतल्यात. यानंतर २००२ ला भारत पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलला गेला. यावेळी हरभजन सिंहने २७ तर जहीर खानने ४४ धावा देऊन ३-३ विकेट घेतल्या.
यानंतर पुढचा आयसीसी फायनल २००७ मध्ये खेळला गेला. या फायनलमध्ये इरफान पठाणने १६ धावा देत ३ विकेट घेतल्या. विशेष म्हणजे याच फायनलमध्ये आरपी सिंहने २६ धाव देऊन तीन विकेट आपल्या नावावर केल्या. यानंतरही भारत फायनलमध्ये गेला, पण काही खास कामगिरी करू शकला नाही.
एकाच मैदानावर दुसऱ्यांदा केलीये कमाल
दरम्यान, शमीसाठी साऊथॅम्पटनच ‘द एजेस बाउल’ मैदान स्पेशलच आहे. त्यानं याआधीही तिथं हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यानं एकाच दिवशी म्हणजे २२ जूनला आपली जादू दाखवली होती.
त्या मॅचमध्ये शमीनं एकूण ४ विकेट घेतल्या होत्या. ९.५ ओव्हरमध्ये ४० धाव देऊन ४ विकेट त्यानं आपल्या नावे केल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघ २२३ धावांवर आउट झाला होता. पण शमीच्या या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघानं अफगानिस्तानचा ११ धावांनी पराभव केला होता. शमीने त्याच दिवशी एक खास रेकॉर्ड केला होता, तो म्हणजे शमी वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताकडून हॅट्रिक घेणारा चेतन शर्मानंतर दुसरा खेळाडू ठरला होता.
हे ही वाच भिडू :
- युवराजने फक्त धोनीलाच नाही तर कैफला देखील वर्ल्ड कप जिंकून दिला होता..
- दोन दशकं उलटून गेली अजूनही सुनील जोशीचं रेकॉर्ड तोडणं कुठल्याही बॉलरला जमलेलं नाही.
- २३ वर्षांपूर्वी देखील भारतीय क्रिकेट टीम एकाच वेळी दोन सिरीज खेळली होती..