या पंतप्रधानांच्या मुलाला राजकारणात यायचं होतं, त्यांनी मुलाला घर सोडून जायला सांगितलं.

कुठला देश. हेडलाईन वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आला असेल. आपल्याकडे सरपंचसुद्धा आपली जागा पोरासाठीच फक्त सोडतो आणि इथे तर थेट पंतप्रधान. पण हि गोष्ट भारताच्या पंतप्रधानांचीच आहे. झालेलं अस की एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीच्या  मुलाने राजकारणात भविष्य करायचा विचार केला. त्यासाठी एक लोकसभा मतदारसंघ देखील हेरून ठेवला. आपल्या गट तयार करुन वडिलांना तिकीट मागण्यासाठी गेला. तेव्हा वडिल म्हणाले, राजकारण करायचं असेल तर माझ्या घरातून चालता हो…. 

त्या पंतप्रधानांच नाव चंद्रशेखर.

चंद्रशेखर भारताचे नववे पंतप्रधान होते. नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ इतका अल्पकाळ त्यांना मिळाला. विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीव गांधीची हेरगिरी केल्याच्या आरोपातून राजीनामा द्यावा लागला होता. कॉंग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेताच चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. 

चंद्रशेखर हे उत्तरप्रदेशातील बलियाचे. या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी १९७७ ते २००४ अस आठ वर्ष प्रतिनिधित्त्व केलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानभूतीच्या लाटेत त्यांचा पराभव झाला होता. १९८४ सालचा हा पराभव सोडला तर त्यांचा कधीच पराभव झाला नाही.  

चंद्रशेखर यांच्या मुलाच नाव होतं पंकज. आपल्या घरातल्या पक्षातून अर्थात समाजवादी जनता पार्टीतून त्याला राजकारणात एन्ट्री करायची होती. वडिलांच्या परस्पर त्याने बिहारच्या महाराजगंज लोकसभेच्या जागेवरुन तयारी करण्यास सुरवात केली. चार पाच महिने त्याने या मतदारसंघात भेटी वाढवल्या आणि पक्षाचे अध्यक्ष व आपले वडिल चंद्रशेखर यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी उभा राहिला. चंद्रशेखर यांनी त्यांनी इच्छा ऐकताच त्याच्यापुढे दोन अटी ठेवल्या.

पहिली अट म्हणजे त्यांच घर सोडून जायचं. मूलगा म्हणून असणारे संबध तोडून टाकायचे. आणि दूसरी अट म्हणजे पाच वर्ष त्या मतदारसंघात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राबायचं. त्यानंतर त्या मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना तूझ काम आवडलं तरच तूला तिकीट द्यायचं का नाही ते पक्ष ठरवेलं.

राजकारणात करियर करायची घाई असणाऱ्या पंकजला या अटी परवडणाऱ्या नव्हता. वडिलांच्या इच्छेला मान देवून अखेर त्याने राजकारणात न पडण्याचाच निर्णय घेतला.

पंकजच्या लग्नाच्या बाबतीला किस्सा देखील असाच प्रसिद्ध आहे. चंद्रशेखर यांनी आपल्या मित्रत्वाची जाणिव म्हणून पंकजचा विवाह आपल्या मित्राच्या विधवा मुलीसोबत लावून दिला होता. 

१९७१ ते ७७ च्या काळात चंद्रशेखर आणि ओम मेहता शेजारी रहात होते. दिल्लीस्थित राजकारणात ओम मेहता हे इंदिरा गांधींच्या मंत्रालयात गृहमंत्री होते. ओम मेहता आणि चंद्रशेखर यांचे मैत्रीचे संबध. मात्र आणिबाणीच्या काळात मेहता यांनी इंदिरा गांधींना संशय येवू नये म्हणून चंद्रशेखर यांच्यासोबतचे संबध तोडून टाकले होते. तरिही चंद्रशेखर यांच्याकडून कुठेच या मैत्रीत कटूता निर्माण झाली नव्हती. ओम मेहता यांच अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांच्या विधवा असणाऱ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न उभा राहीला. अशा वेळी मित्राची मुलगी म्हणून चंद्रशेखर धावून गेले आणि त्यांनी त्यांनी आपल्या मुलाचा विवाह तिच्यासोबत लावून दिला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.