देवाला खुश करण्यासाठी या पठ्ठ्यानं चढवला 101 दारूच्या बाटल्या आणि चिकनचा प्रसाद
देव आम्हाला पावावा. आमच्यावर खुश व्हावा. त्याची आमच्यावर कृपादृष्टी रहावी म्हणून आम्ही कमी धंदे करतो व्हंय. अन् त्यात देव नवसाला पावणारा असेल तर मग विचारूच नका. पार लोक जिव ओवाळून टाकतेत. तसं टाकायलाही हवा कारण प्रत्येकाची आपआपली श्रद्धा असते बाबा देवापायी.
मात्र, एका पठ्ठ्यानं आपल्या देवाला खुश करण्यासाठी देवाला चक्क 101 ओल्ड माॅक दारूच्या बाटल्याचा आणि चिकनचा प्रसाद चढवला असल्याची बातमी वाचली.
देवाच्या मंदिरात पान,फुलं, नारळ, पेढा. वाटलं तर पैसा किंवा कपडे चढवतात असं पाहिलं होतं आणि ऐकलं होतं. मात्र इथं सगळा खेळ उलटाच होता की, त्यामुळे या भक्तानं असं कावून केलं असेल असा प्रश्न आम्हाला भी पडला. आम्ही ते शोधून काढलं.
झालं असं की, केरळ राज्यातल्या कोलम जिल्ह्यातल्या एक्काड या गावात दुर्योधनाचं मंदिर आहे. पोरुवझी पेरुवथी मलनाड दुर्योधन असा या मंदिराचं पुर्ण नाव आहे.
महाभारतात ज्या दुर्योधनला व्हिलन म्हणून पाहिलं जातं. त्याचं दुर्योधनाचं भारतातील एकमेव असं मंदिर केरळमध्ये आहे. या दुर्योधनाची इथं लोकं भक्तीभावानं पुजा करतात त्याला पुजतात. दारूचा आणि चिकनचा नैवेद्य चढवतात.
नुकताच या मंदिराचा वार्षिक उत्सव सुरू झाला आहे. याच उत्सवाचा पहिल्या दिवशी या भक्तानं चक्क 101 ओल्ड माॅक दारूच्या बाटल्या आणि चिकन देवाला अर्पण केलंय.
दुर्योधनाच्या या मंदिरात दारू, चिकन, बकरी, पान आणि सिल्क चढवण्याची प्रथा आहे.
याबद्दल तीथलंच्या लोकांमध्ये एक आख्यायिका आहे. ते सांगतात,
दुर्योधन एकदा या गावात आला होता. चालून चालून तो थकला असल्यामुळे त्याला प्रचंड तहान लागलेली असते. तो पाण्यासाठी व्याकुळ होता. तेव्हा या गावातल्या एका घरात पिण्यासाठी पाणी मागतो. मात्र त्याला पाण्याऐवजी ताडी देण्यात येते.
पाण्याने व्याकुळ झालेल्या दुर्योधनाला त्या ताडीची चव आवडते. तेव्हापासूनच या मंदिरात दारू चढवली जाते. या लोकांची श्रद्धा आहे की, देवाला दारू चढवल्यानं तो आमच्यावर खुश राहिल. संकटात आमच्या पाठीशी उभा राहिल. त्यामुळे वर्षोनुवर्षे ही प्रथा इथं चालत आलीय.
या मंदिरातील पुजारी सांगतात की, प्रत्येक जाती धर्मातील लोक इथं मनोभावानं येतात पुजा करतात. मंदिरातील पुजारीही वेगवेगळ्या जातीतल आहेत. प्रत्येक जण आपल्या परीनं देवाला नैवेद्य अर्पण करतात. मात्र पुर्वी इथं अर्क चढवलं जायचं मात्र त्यांच्य़ावर बंदी आल्य़ापासून ते बंद करण्यात आलं आहे.
सध्या फक्त विदेशी दारू आणि मासं चढवलं जातं. या भागातील जे लोक परदेशात राहतात ते येतांना आपल्या देवासाठी हमखास विदेशी दारू घेऊन येतात.
इथलंचं मंदिर जुनं असल्या कारणानं या रूढी परंपरा इथं अजूनही कायम आहेत. मात्र 1990 च्या अगोदर या मंदिराच्या वार्षीक उत्सवात फटक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात यायची मात्र 1990 साली फटक्यामुळे इथं 26 लोकांना आपला जिव गमवावा लागला होता. तेव्हापासून ती फटक्यांची आतिषबाजी बंद करण्यात आली. इथं साध्यापणानेच वार्षिक उत्सव केला जातो.
आपण नेहमीच म्हणतो भारत हे विविधतेनं नटलेला देश आहे. इथं अनेक जात-धर्म-पथं आहेत. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहे. त्याला वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. हे केरळमधील दुर्योधनाचं मंदिर म्हणजे भारतातल्या विविधतेचं जितंजागतं एक प्रतिक आहे.
हे ही वाच भिडू
- नाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही !
- महाराष्ट्रातल्या या गावात हनुमानाचं नाव घ्यायलाही लोक घाबरतात!
- हिमालयातल्या कुशीतलं असं गाव, जिथे फक्त महादेवाच्या शपथेवर मिळतं कर्ज !