प्लेगबाधित रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली त्यातच त्या गेल्या.
चीनमधील एका डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झाला.
काही वर्षांपुर्वी केरळमध्ये इबोलाग्रस्त रुग्णाची सेवा करत असताना एक पारिचारिकेचा मृत्यू झाला होता.
कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या या व्यक्तिंनी आपल्या प्राणाची बाजी लावून अखेरपर्यन्त रुग्णसेवा केली.
पण सहसा क्रांन्तीज्योती सावित्रीबाईंबद्दल आपणाला माहिती नसते. त्या गेल्या अशाच प्रसंगात.
प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करत करता त्यांनाही प्लेगची बाधा झाली व त्यांतच त्यांचा मृत्यू झाला.
जोतिरावांकडून घेतलेला शिक्षणाचा वारसा सावित्राबाईंनी पुढे नेला. आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून लढणारी ती स्त्री. ज्योतिबा फुलेंच्या पश्चात देखील त्या काम करत राहिल्या. त्यांचे दत्तक चिरंजीव डॉक्टर झाल्यानंतर मिलेट्रीत नोकरीस लागले. त्याला नोकरिनिमित्त बाहेर जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी यांच ६ मार्च १८९५ रोजी निधन झालं.
त्यानंतर सावित्रीबाई एकट्याच घरी रहात होत्या. पण ज्योतिबांनी दाखवलेल्या वाटेवरून त्या एकट्याने लढत राहिल्या.
झालं अस की १८९६ साली दुष्काळ पडल्यानंतर सावित्राबाई गोरगरिबांना अन्न मिळावं म्हणून प्रचंड राबल्या. त्यानंतरच्या एकाच वर्षात म्हणजे १८९७ साली प्लेगची साथ आली. पुणे परिसरात शेकड्याने माणसं मरू लागली. पुण्यात प्लेग आला म्हणता म्हणता माणूस दगावू लागला. सर्वत्र मृत्यूने थैमान घातलं होतं. रँड या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याच काम चालू होतं.
याचवेळी सावित्राबाईंनी काय केलं तर आपल्या डॉक्टर असणाऱ्या यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्याच्या माळरानावर त्याला दवाखाना घालायला लावला. प्लेगबाधित रुग्णांना त्या स्वत: घेवून येत असत.
हा रोग शिवल्याने पसरतो हे माहिती असून देखील त्या रुग्णांची सेवा करत होत्या. अविरत रुग्णांची सेवा चालू होती.
अशातच मुंढवा गावाच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात असणाऱ्या पांडुरंग गायकवाड या लहान मुलाला प्लेगची बाधा झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या धावत पळत महारवाड्यात शिरल्या. प्लेग झालेल्या मुलाला चालता येणं देखील अशक्य होतं. त्यांनी त्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि थेट माळरानावरच्या दवाखान्यात पोहचल्या.
त्यातच सावित्राबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ साली त्यांच प्लेगमुळे निधन झालं.
आज आपण जेव्हा देशभरातली उदाहरणं पाहतो तेव्हा आपल्याच मातीतलं आपल्याचं माणसांच रुग्णसेवेच हे उदाहरणं आपणाला माहिती असायला हवं इतकीच सावित्रीबाईच्या जन्मदिनी अपेक्षा.
हे ही वाच भिडू.
- महात्मा फुलेंना मारायला आलेला मारेकरी त्यांचा विद्यार्थी बनला.
- प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.
- जगभरात धुमाकूळ घालणारा प्लेग कोल्हापूरात शिरू शकला नाही ते शाहू महाराजांमुळे