खरंच अटलजींनी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात बैलगाडीतून मोर्चा काढला होता…?
अटलजी गेले आणि मागे अनेक किस्से देखील सोडून गेले.
अटलजींनी मागे सोडलेल्या अनेक किस्स्यांपैकीच एक किस्सा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यात असं सांगण्यात येतंय की अटलजी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात संसदेवर बैलगाडीतून मोर्चा घेऊन गेले होते. राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी अटलजींनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता.
आम्ही या गोष्टीची उलटतपासणी केली त्यावेळी या मोर्चाविषयी आम्हाला जी माहिती मिळाली ती वाचकांशी शेअर करतोय !
हा किस्सा आहे १९७३ सालातील.
तत्कालीन जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले होते. त्यांच्या पाठोपाठ अन्य खासदार देखील सायकलवरुन संसदेत पोहचले होते.
१२ नोव्हेंबर १९७३.
इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षातील जनसंघाचे प्रमुख नेते होते. जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’ या संघटनेने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
ओपेकच्या या निर्णयाचा फटका अर्थातच भारताला देखील बसला होता. कारण इंधनासाठी भारत पूर्णतः मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. मध्य-पूर्वेतून होणारा तेलाचा पुरवठा कमी झाल्याने भारताला अभूतपूर्व तेल संकटाचा सामना करावा लागत होता.
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तेलांच्या किमतीमध्ये जवळपास ८० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. सरकारविरोधी जनमत तयार करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांसाठी ही एक आयातीचं संधी चालून आली होती.
नोव्हेंबर १९७३ मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार होतं. या अधिवेशनात तेलांच्या वाढत्या किमतीवरून सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांची व्यूहरचना होती. हा विरोध करण्यासाठी काहीतरी प्रतीकात्मक मार्ग निवडावा असा विचार करत असतानाच एक भन्नाट कल्पना समोर आली. त्या कल्पनेचाच परिपाक म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनसंघाचे प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी आपल्या अन्य दोन साथीदारांसह चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले. शिवाय अन्य काही खासदार सायकलवरून संसदेत पोहचले.
इंधन तेलाच्या भाववाढीचा विरोध करण्यासाठी विरोधकांनी निवडलेल्या या भन्नाट कल्पनेची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने यासंबंधीचे वृत्त छापले होते. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीची लिंक.
https://www.nytimes.com/1973/11/13/archives/both-right-and-left-assail-mrs-gandhi.html
राजीव गांधींच्या संगणकीकरणा बाबतीत भाजप आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोधाचीच भूमिका घेतली होती यात अजिबात दुमत नाही. पण या मोर्चाचा आणि भाजपच्या संगणकविरोधी भूमिकेचा काहीही संबंध नव्हता. अशा पद्धतीने हा मोर्चा संगणकीकरणाच्या विरोधात नव्हता हे आमच्या उलटतपासणीत सिद्ध झालंय.